Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Mar 28, 2014

लोकशाहीचा सांगावा

लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

नशापाणी फुकटाची । आणि खानावळी शाही ।
होते अशा करणीने । कलंकित लोकशाही ॥

धर्म-पंथ-जाती-पाती । यांना देऊ नये थारा ।
मतदान करताना । फक्त विवेकाला स्मरा ॥

पाच वर्ष जनतेची । करू शकेल का सेवा ।
पात्रता नी योग्यतेचा । नीट अदमास घ्यावा ॥

कुणी आला शुभ्रधारी । ढग पांघरुनी नवा ।
आत कलंक नाही ना । गतकाळ आठवावा ॥

कधी गाळला का घाम । त्याने मातीत राबून ।
स्वावलंबी की हरामी । थोडे घ्यावे विचारून ॥

पूर्ती केलेली नसेल । पूर्वी दिल्या वचनांची ।
द्यावे हाकलुनी त्यास । वाट दावा बाहेरची ॥

नको मिथ्या आश्वासने । बोला गंभीर म्हणावं ।
कशी संपेल गरिबी । याचं उत्तर मागावं ॥

कृषिप्रधान देशात । नाही शेतीचे ’धोरण’ ।
कच्च्या मालाच्या लुटीने । होते शेतीचे मरण ॥

शेती रक्षणाकरिता । नाही एकही कायदा ।
फुलतात घामावरी । ऐदी-बांडगुळे सदा ॥


शेतीमध्ये जातो जो जो । मातीमोल होतो तो तो ।
अशी अनीतीची नीती । कोण धोरणे आखतो? ॥

सत्ता लोभापायी होतो । हायकमांडचा नंदी ।
प्रश्न शेतीचे मांडेना । करा त्यास गावबंदी ॥

पाचावर्षातुनी येते । संधी एकदा चालुनी ।
करा मताचा वापर । अस्त्र-शस्त्र समजुनी ॥

स्थिर मनाला करून । 'अभय' व्हा निग्रहाने ।
मग नोंदवावे मत । सारासार निश्चयाने ॥

                                     - गंगाधर मुटे 'अभय'
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0==

Mar 25, 2014

सूर्य थकला आहे

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई
अनुतापे बुजवत न्यावी
’अभय’तेचे एकेक एकक
ठिणगी शोधत आहे
अनर्जितांच्या पाडावाला
शिक्षा योजत आहे!
श्रमदेवाच्या उत्थानास्तव
शिक्षा योजत आहे!!

                         - गंगाधर मुटे ’अभय’
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0==

Mar 22, 2014

रंग आणखी मळतो आहे

रंग आणखी मळतो आहे

रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे

गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे

मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे

पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !

भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे

बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे

ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे

'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे

                              - गंगाधर मुटे
==‍^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍^=0=‍^=0=^=0=‍=

Mar 17, 2014

हिमालय की गोद मे

*  H  *  A  *  P  *  P  *  Y  *   *  H  *  O  *  L  *  I *

"face Black" न झालेल्या सर्व "facebook" मित्रांना/मैत्रीनींना 
'Block'  न झालेल्या सर्व "Blogger" मित्रांना/मैत्रीनींना 

भांगविरहित अजिबात "ओल्या" नसलेल्या कोरड्या ठणठणीत भयंकर रंगीबिरंगी हार्दिक शुभेच्छा.

*  H  *  A  *  P  *  P  *  Y  *   *  H  *  O  *  L  *  I *

हिमालय की गोद मे

दिनांक १६ जानेवारी ते २७ जानेवारी २०१४ या दरम्यान मी पूर्वभारताची भ्रमंती करून आलो. कोलकोता, गंगासागर, दार्जिलिंग, काठमांडू, अयोध्या, खजूराहो असा सुमारे ५७०० किलोमिटरचा प्रवास आणि तोही ११ दिवसात. या प्रवासातील वृत्तांताचे सविस्तर वर्णन लिहायचे असे ठरवले होते पण वेळेअभावी काही शक्य झाले नाही. त्यामुळे वाचकांसाठी आता केवळ चित्रवृत्तांत.
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
काकव्दीप – येथून गंगा सागरात विलीन व्हायला सुरुवात होते.
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  Gangasagar
*    *    *    *
गंगासागर – सारे तिरथ बार बार, गंगासागर एक बार
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
गंगासागरात स्नान करण्याचा आनंद काही औरच.
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
गंगासागरच्या तीरावर असलेले कपीलमुनी मंदीर 
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
कोणार्कचे जगप्रसिद्ध सुर्यमंदीर 
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
जानेवारी २०१२ मध्ये आम्ही नागपूर-कलकत्ता फ़्लाईटने गंगासागर, कोणार्क, जगन्नाथपुरीला गेलो होतो. तेव्हाचे एक विमानातील छायाचित्र.
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
जय महाकाली – काली कलकत्तेवाली
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
कोलकात्याचा जगप्रसिद्ध हावडा ब्रीज
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
नयनरम्य दार्जिलिंग
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
दार्जिलिंग – जापानीज बौद्धमंदीर
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
निसर्गरम्य धबधबा
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
 *    *    *    *
 अस्वल 

=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
दार्जिलिंगच्या टायगरहील वरून दिसणारा सुर्योदय. सुर्याचे पहिले किरण कांचनजंगा शिखराच्या अग्रभागी पडायला सुरुवात होते आणि समोरील निसर्गरमनीय दृष्य फ़ारफ़ार मनोहारी असते.
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
कांचनजंगा शिखर – माऊंट एवरेस्ट नंतरचे जगातील तीन नंबरचे सर्वोच्च शिखर
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
आसमंत सोनेरी करून टाकत हळुवारपणे होणारा सुर्याचा उदय
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
काठमांडू – श्रीविष्णू मंदीर
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
काठमांडू - भगवान श्रीविष्णूची ५ मिटर उंचीची झोपलेली मुर्ती
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
पशुपतीनाथ मंदीर – काठमांडू - बागमती नदीच्या तीरावरील पशुपतीनाथ मंदीर
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip
*    *    *    *
पशुपतीनाथ मंदीर – काठमांडू
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
अयोध्या – जय श्रीराम
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
अयोध्या – प्रमूरामचंद्राच्या मंदीर निर्माणाची अशी जय्यत तयारी सुरू आहे.
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
: अयोध्या :
“मंदीरासाठी जन्मभूमीस्थळी चार तासात आम्ही जागा मोकळी करून दाखवली त्याप्रमाणेच योग्यवेळ येताच संधी साधून फ़क्त २४ तासात राममंदीर उभे करून दाखवू” असे एक अयोध्येचा रामभक्त म्हणाला. तो बढाया मारत नव्हता. मंदीराला लागणारी सर्व शिला-सामुग्री तयार करण्याचे कार्य जोरासोरात सुरू आहे. एकदा सर्व सामुग्री तयार झाली की एकावर एक शिला रचणे तेवढे बाकी आहे. सिमेंट किंवा अ‍ॅडेजिव्ह पदार्थ न वापरताच केवळ शिला रचून मंदीर उभारायचे डिझायनिंग तयार आहे. संधी मिळताच दगडावर दगड रचत नेले की जन्मभूमीस्थळी भव्यदिव्य मंदीर तयार. (कदाचित अक्षरश: २४ तासात)
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
 बोलो प्रभूरामचंद्र की जय!
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip
*    *    *    *
सर्वात महागडे अन्नधान्य म्हणजे धान/तांदुळ/भात.
पण गरिबी भात उत्पादक शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाही.
आणि तरीही भारतीय सुशिक्षित, सुजान जनमानसाला "अन्नसुरक्षा" हवी आहे व ती सुद्धा कमीतकमी मोबदल्यात. ऐताखाऊंना एका रुपयात पाच-दहा किलो धान्य मिळाले तर हवेच आहे.
शेतकऱ्याच्या कमरेला धडुतं शिल्लक राहिलं काय, नाही राहिलं काय, पर्वा आहेच कुणाला? धान्याचे भाव जरासे जरी वाढले तरी "महागाई" वाढली म्हणून बोंबलायला मोकळे!
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==
kakdwip 
 *    *    *    *
Farming Of Amethi - 1
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==  kakdwip 
 *    *    *    *
Farming Of Amethi - 2
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip 
*    *    *    *
Farming Of Amethi - 3
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip
*    *    *    *
Farming Of Amethi - 4
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==kakdwip
*    *    *    *
देशविदेशातील पर्यटकांना कायम भूरळ पाडणारे
व शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - १ =‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip
*    *    *    *
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - २ 
मध्य प्रदेशातील छतरपुर ज़िल्ह्यात असलेले  खजुराहो प्रख्यात पर्यटन स्‍थळ आहे.
भारतात ताजमहल नंतर सर्वात जास्त पर्यटकांना आकृष्ट करणारे असे हे स्थळ आहे.
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip
*    *    *    *
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ३ =‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip
*    *    *    *
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ४ =‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip
*    *    *    *
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ५ =‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== kakdwip
*    *    *    *
शिल्पकलेने समृद्ध असलेले जगप्रसिद्ध खजुराहो मंदीर - ६ =‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o== 
आम्ही जावून आलो, 
आता तुम्ही जावा, 
एकदा दर्शन करून यावा.!
=‍^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==

Mar 10, 2014

"माझी गझल निराळी" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम

कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले……..!

कोणताही साहित्यप्रकार हा त्या-त्या साहित्यिकाच्या स्वभावानुरूप आकार घेत असतो. मग ती कथा असो, कादंबरी असो, वा कोणताही काव्यप्रकार असो... कथा वाचूनही लेखकाच्या स्वभावाचे पैलू कळतात की हा लेखक कोणत्या धाटणीचा आहे. आणि कवितेत तर त्या कवीचे अंतरंगच उलगडून ठेवलेले असतात. शिवाय कवी हा इतर कोणत्याही साहित्यिकाहून अधिक संवेदनशील असतो. अगदी झाडावरून गळणारं पिकलं पान पाहून सुद्धा त्याचं मन हेलावून जातं. केवळ कविता वाचूनच जातीवंत कविचा जीवनपट नजरेसमोर उभा ठाकतो.

गझल हा तसा तंत्रानुगामी काव्यप्रकार... यात मात्रांचे, वृत्ताचे बंधन असल्यामुळे फार कमी कवी या प्रकाराकडे वळले आहेत. आणि या प्रकाराकडे वळलेल्यांमध्येही फार कमी लोकांनी चांगली गझल मराठी साहित्याला दिली आहे. गझलकारांचा आकडा शेकड्यांनी असला तरी सकस गझल लिहिणा-यांची संख्या उणीपुरीच आहे.

गंगाधर मुटे हे असेच एक उल्लेखनीय नाव आहे. मातीचं गाणं लिहिणार्‍या या कवीची नाळ मातीशी कायम जुळलेली आहे. रानमेवा हा त्यांचा काव्यसंग्रह आधीच प्रकाशित झाला आहे. मुळात शेतकरी असल्यामुळे मातीशी तसेही नाते जडलेले. शिवाय गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळे शेतक-यांच्या अडी-अडचणींना, व्यथांना त्यांच्या लेखणीतून वाचा फुटलेली दिसते.

पुसतो सदा आसवांना तो पदर भुमिचा ओला
आसू पुसता हळूच पुसतो आली जाग शिवारा

अशी रचना त्यांच्या लेखणीतून सहज साकारते. अनेकदा त्यांची लेखणी पीक, पेरणी या विषयावर मार्मिक टीप्पणी करते. अशावेळी व्यथा सांगत असतानाच ते पुसटसे बंडखोर देखील होताना दिसतात... त्यांची ही एक गझल पहा...

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?

जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी भिते ना कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

’अभय’ काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन् वसावे कसे..!

(खुरटणे = वाढ खुंटणे, तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत, ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे)

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नव्या पिकांची नवीन भाषा, मरणे कठीण झाले, भुईला दिली ओल नाही ढगाने, भाजून पीक सारे पाऊस तृप्त झाला, आत्महत्या बळीच्या तू रोख वामना, गहाणात हा सातबारा... या त्यांच्या रचना विशेषत्वाने शेतक-यांच्या व्यथा मांडणा-या आहेत. पण गंगाधर मुटे हे कुठेही एकाच विषयात अडकून पडलेले दिसत नाहीत. मातीचं गाणं लिहिणारा हा कवी शृंगार देखील काव्यात तितक्याच खुबीने मांडताना दिसतो... आणि...

ती बोलली तरी का शब्दास नाद येतो
त्या बोलक्या स्वरांचे झंकार चित्तवेधी

असा एखादा शेर आपल्याला वाचायला मिळतो.

मक्ता या गझलेतील एका परंपरेची कास गंगाधर मुटे यांनी धरलेली दिसते. मक्ता म्हणजे कवीचे नाव अथवा टोपणनाव असलेला शेवटचा शेर... गंगाधर मुटे हे काव्यात आपले अभय हे टोपणनाव वापरतात. मक्ता लिहिताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे मक्त्यामध्ये आपले नाव लिहिताना तेथे एखाद्या मौल्यवान शब्दाची जागा वाया तर जाणार नाही ना ? किंवा हे नाव त्या शेराच्या अर्थाला पूरक आहे ना ? या गोष्टींची काळजी घेणे. आणि अशी काळजी गंगाधर मुटे यांनी घेतलेली दिसते... मक्ता असलेले त्यांचे काही शेर पहा...

संचिताचे खेळ न्यारे... पायवाटा रोखती
चालता मी अभय रस्ता काळही भारावला

अभय एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुईसंग जगणे... भुईसंग मरणे... भुईसंग झरणे... वगैरे वगैरे

आता अभय जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी निघावे ही वाट चालताना

नको रत्न मोती, न पाचू हिरे ते
अभय ते खरे जे मिळाले श्रमाने

आत्मह्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतके मागून पाहिले

घे हा अभय पुरावा त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती जी कोहिनूर झाली

गंगाधर मुटे यांना कवितेच्या, गझलच्या रुपाने जगण्याचे संचित गवसले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात...

वृत्तात चालण्याचे शब्दास भान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

खूप काही चांगले लिहिण्याची क्षमता असणा-या गंगाधर मुटे यांना पुढील गझल लेखनासाठी शुभेच्छा...

जागतिक दृष्टिदान दिन                                           सुधाकर कदम
सोमवार, १० जून २०१३                                    जेष्ठ गझलगायक, संगीतकार
                                                                                      पुणे
=‌^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= ० =‌^= ० =^= ० =^= ० =^= ० =^= 

परिघाबाहेरची गझल - किमंतु ओंबळे

परिघाबाहेरची गझल

आनंदऋतू ई-मॅगझिनच्या निमित्ताने दर्जेदार कविता आणि गझल शोधता शोधता गंगाधर मुटे साहेबांची कविता नजरेस पडली. कविता, व्यंग, नागपुरी तडका आणि गझल अशा विविध माध्यमातून चौफेर स्वैर साहित्य भ्रमंती करणाऱ्या एका संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्वाशी ओळख होण्याचा योग जुळून आला. आनंदऋतू ई-मॅगझिनमध्ये दर महिना कविता आणि गझल प्रकाशित करण्याची मुटे साहेबांनी परवानगी दिल्याने नव्याने झालेली ओळख परिचयात बदलली. तशी प्रथमदर्शनीच वेगळी वाटणारी त्यांची गझल पण परिचयाची वाटू लागली.

सुरेश भट साहेबांनंतर काही काळापुरती गझल ही चार लोकात आणि चार गावात कैद झाली होती. तेच तेच, त्याच त्याच भाषेत आणि शैलीत लिहणारे लोक स्वत:ला गझलकार समजू लागल्याने, गझल त्याच त्याच साच्यात गुदमरली होती. कल्पना करून वृत्तांमध्ये बसवलेली कपोलकल्पित दु:खे! वास्तवाशी सुतराम सोयरसुतक नसलेल्या स्वप्नाळू प्रतिमा आणि अलंकारांनी गझल गुदमरली होती. शहरी भागाचा आणि एका ठराविक वर्ग समाजाचा गझलेवर ठसा स्पष्टपणे दिसू लागला होता. काही काळापुरती तर गझल एका ठराविक समाज विशेषाची मक्तेदारी बनून गेली होती. एका ठराविक समाज विशेषाबाहेरचं किंवा ठराविक परिघा आणि भूगोला बाहेरचं काही लिहणं किंवा मांडणं हे गझलेला वर्ज्य मानलं गेलं होतं. कोणी तसा प्रयत्न केलाच, तर त्याला गझलेच्या व्याकरणात रक्तबंबाळ करून, शाब्दिक कसोट्यांमध्ये जेर करून स्वत: होऊन गझल लेखानातून बहिष्कृत करण्यासा भाग पाडलं जाऊ लागल्याने, गझलेमध्ये तोच तोच पणा आला. त्यामुळे साहजिकच सुरेश भटांनी नावारुपाला आणलेली आणि लोकाश्रय मिळवूने दिलेली गझल लोकांपासून दुरावली आणि एका आम्ही म्हणजे मैफिल मानणाऱ्या एका वर्तुळात सिमटली गेली.

हे सर्व सांगण्याचे प्रयोजन म्हणजे गंगाधर मुटे साहेबांची गझल. ती वाचता क्षणीच, परिघाबाहेरची वाटते. तिच्यामध्ये कदाचित ती गझलेची नजाकत नसेलही, पण जी गझलेची रग आहे, ती मात्र सोळा आणे अस्सल आहे. प्राचार्य प्र. के. अत्रेंनी उत्कृष्ट आणि सकस साहित्य कसं असावं? यासंबंधी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की, "ऊस जसा ज्या जमिनीत रुजून येतो, त्या जमिनीची त्याला गोडी येते. तसं खरं साहित्य ज्या जमिनीतून फुलून येतं, तिचा त्याला गंध यावा." गंगाधर मुटे साहेबांची गझल या परिमाणाला पुरेपूर उतरते. त्यांची कोणतीही गझल वाचली, तरी तिच्यामध्ये प्रथमच जाणवतो तो तिचा अस्सल गावरान बाज आणि शेतकरी साज! या गझलेमध्ये एक बंडखोरपणा आहे. पण त्यात उर्मटपणाचा लवलेशही नाही हे या गझलेचं मोठं वैशिष्ट्य आहे. वाचकाना या गझलेमध्ये चंद्र तारे, ऊन वारे, प्रेमाचे शिडकावे आणि प्रियकर प्रियेसीचे शृंगारमय बारकावे कमीच सापडतील, पण शेतकऱ्यांचा आक्रोश आणि पीडितांच्या व्यथा मात्र भरभरून मिळतील. कारण ही गझलच लिहली गेली आहे, शोषितांच्या आणि श्रमकऱ्यांच्या ऊपेक्षेला वाट करून द्यायला! श्रमिकांची दु:खे कधी गझलेमध्ये सांडलेली दिसत नाहीत, कारण गझलेमध्ये मांडण्याइतकी ती सुवासिक आणि अलंकारिक नसतात, असा एक अघोषित वृथा समज पसरवण्यात आला आहे. गंगाधर मुटे साहेबांची वास्तववादी गझल या गैरसमजाला छेद देण्याएवढी पूर्ण सक्षम नक्कीच आहे.

"माझी गझल निराळी" या गंगाधर मुटे साहेबांच्या गझल संग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा!

                                                                                     किमंतु ओंबळे
                                                                                          संपादक
दिनांक: ५ मे २०१३                                                       आनंदऋतू ई-मॅगझिन
                                                                                          ठाणे

== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == 

Mar 9, 2014

’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : राज पठाण

गझलविश्वाची परिभाषा बदलणारा 

गझलसंग्रह : ’माझी गझल निराळी’


              मागच्या विजयादशमीलाच 'माझी गझल निराळी' हा गंगाधर मुटेंचा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि लागलीच दुसरी आवृत्ती. “वाह! हार्दिक शुभेच्छा गंगाधर मुटेजी !!” असेच उद्गार निघाले, जेव्हा ही बातमी ऐकली. या गझलसंग्रहाची प्रकाशनापूर्वीच अनेकांना प्रतीक्षा होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो. शेतकर्‍यांच्या वेदनांची कैफियत मांडण्यासाठी त्यांनी गझल हा काव्यप्रकार निवडावा हेच मुळी धाडसाचे काम आहे. हा गझलसंग्रह विषयाच्या अनुषंगाने अद्वितीय असाच आहे. “शेतकर्‍यांचा आसूड” या महात्मा फुलेंच्या पुस्तकानंतर शेतकर्‍यांच्या जीवनाला समग्र स्पर्श करणारे लिखाण माझ्या वाचनात आले नव्हते. ही पोकळी गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीने भरून काढली आहे.

           मी तसा या प्रांतात नवखाच. दोनशेच्या आसपास गझला लिहिल्यानंतर मला अद्यापही हे उमगले नाही की नेमके मी कोणासाठी लिहीत आहे. परंतू गंगाधर मुटेंकडे मात्र याचे स्पष्ट उत्तर आहे. त्यांचे लेखन त्या तमाम कष्टकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे या उद्दाम राज्यकर्त्यांनी युगानुयुगे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे.
           असेच एकदा फेसबुकवर पडणार्‍या शेकडो गझलांच्या पावसाचा आनंद लुटत आणि अधून मधून एखादा शेर लिहीत बसलो होतो. अनेक विषय होते - हृदय आणि त्याच्या विविध विकारांचा आशय असलेले, 'उमदा खयाल' वाले. तेवढ्यात मेसेज बॉक्स मध्ये प्रसिद्ध विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले माझे स्नेही, अमर हबीब यांचा मेसेज डोकावला. तो असा होता- “काय हो, आपल्याला परिचित एखादा शायर आहे का, जो शेतकर्‍यांच्या दयनीय स्थितीवर लिहितो?” मला सुरुवातीला वाटले अमर हबीबजींना असे म्हणावयाचे आहे की “काय हो, तुम्हाला काही उद्यागबिद्योग नाही का? कसल्या गझला लिहिता? जरा ज्वलंत सामाजिक विषयाचे भान ठेवून लिहीत चला.” परंतू त्यांना खरेच कुठेतरी याच विषयावर व्याख्यान द्यायचे होते. मी विचारात पडलो 'गझल आणि शेतकरी'! बापरे!! याप्रसंगी वीज चमकल्यागत गंगाधर मुटे हे नांव माझ्या डोळ्यासमोर आले आणि लागलीच मी त्यांना गंगाधर मुटें हेच एकमेव व्यक्तिमत्त्व शेतकर्‍यांची गार्‍हाणी गझलेतून मांडते हे बिनदिक्कतपणे सांगितले होते..

       एकंदर काय तर हजारोंच्या घरात आज महाराष्ट्रात मराठी गझलकारांची संख्या गेली असूनही, कास्तकारांच्या मूक वेदनांना समाजासमोर मांडणारे गंगाधर मुटे हेच एकमेव नांव! हा स्तंभ मला टाळताही आला असता परंतू मुद्दाम लिहितोय. गझलेचे अध्वर्यू सुरेश भट यांनी मराठी गझलेचे दालन येणार्‍या पिढ्यांसाठी खुले केले हे अंतिम सत्य. सुरेश भटांनंतर सर्वार्थाने मराठी गझलेचा झेंडा अटकेपार रोवणारे दोन व्यक्तिमत्त्व मला ज्ञात आहेत, एक इलाही जमादार व दुसरे भीमराव पांचाळे! याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही निव्वळ सुमार लिहितो...!

           काय आहे ही गझल? फक्त दोन ओळींची पूर्ण कविता? तरीही अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम. आज माझ्यासारख्या पामराकडेही १९४ अक्षरगणवृत्तं आणि ४६ मात्रावृत्तांची यादी का यावी? अर्थातच मराठी मातीत गझलेची पाळेमुळे आता अगदी खोलवर रुजू लागली आहेत. गंगाधर मुटेंच्या 'माझी गझल निराळी' या गझलसंग्रहाची पहिली आवृत्ती हातोहात संपणे हे त्याचेच द्योतक आहे!

         काव्यलेखनाचा हा प्रपंच समाज घडवण्यासाठी केलेला पाहून आनंद होतो. शेतकर्‍यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या संघर्षाची मशाल सदैव तेवती ठेवण्याचे कठीण काम गंगाधर मुटेंजीनी लीलया पेलले आहे. ८८ गझलांचा हा संग्रह गझलविश्वाची परिभाषा बदलणारा असा आहे.

घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी
तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी

या मतल्याने त्यांनी आपली गझल सुरू करून पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उठसूट गझलेचे वाटोळे करत सुटलेल्या बाजारबुणग्यांना खालील शेर बरेच काही सांगून जातो.

शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा
निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी

अस्मानी सुलतानीच्या फेर्‍यांत अडकलेला शेती व्यवसाय अधोरेखीत करताना ते म्हणतात,

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

वातानुकूलित काव्य आणि रणरणत्या उन्हात कष्टकर्‍यांच्या घामातून झरणारे काव्य, इंडिया आणि ग्रामीण भारतातील फरक स्पष्ट करून जाते. हा गझलसंग्रह त्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण वाटतो.

तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली सुकून गेली
तरी निसर्गा ! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो ?

अशा या दुर्दम्य इच्छाशक्तीचा आधार घेत गंगाधर मुटेंची गझल उभी राहते आणि ती जगण्याचे बळही निर्माण करते... नव्हे बेसूर जीवनाला सुरात आणते..

वृत्तात चालण्याचे शब्दांस ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले!!

वाह! क्या बात है!

             खरे तर गंगाधरजींची गझल सर्वच मानवी भावनांना स्पर्श करताना दिसते. त्यांची गझल बेमालूमपणे एखादवेळी गझलप्रांताच्या मूळगावी सुद्धा लाजतमुरडत जाऊन येते आणि हळुवार यौवनसुलभ वंचनांचा ठाव घेते. मग हे वेगळेपणही रसिकमनाचा ठाव घेणारे ठरते. त्यांची प्रेमरसाने ओतप्रोत भरलेली एक गझल मला बरीच भावली...

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणे वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळुवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

ही गझल शृंगार रसाने ओतप्रोत भरलेली तर आहेच शिवाय ती गंगाधर मुटेंच्या समर्थ लेखणीची साक्ष देणारीही आहे. बहोत बढिया, लाजवाब आणि जबरदस्त गझलियत असलेली गझल म्हणजे ही गझल. त्यानंतरचे शेर तर शायराला शब्दांची पकड मिळाल्याने लाभलेली समाधी अवस्थाच.......... अव्वल नंबर गज़ल आहे ही.

ही गझल वाचली की मला हसरत मोहनीच्या गझलेची आठवण होते... उर्दू मराठीची गज़लियत समपातळीवर येत असल्याचे पाहून आनंदही वाटतो. तीच ती गझल जी गुलाम अली ने गायीली. चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है। मधील हा शेर पहा-

खेंच लेना वो तेरा परदे का कोना दफ़तन
और दुपट्टेसे तेरा वो मुँह छुपाना याद है!

       देशाचा पोशिंदा हा राजकारणात चेष्टेचा विषय होवून बसला आहे. शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी उभ्या महाराष्ट्रात कुचकामी व्यवस्थेविरुद्ध संघटनेच्या माध्यमातून एल्गार पुकारला तेव्हा मी अंबाजोगाईत महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. भाईंच्या त्या बोलबाल्याच्या लढ्यात माझ्या सख्या भावाला तेव्हा शिक्षण सोडून स्वतःला झोकून द्यावे लागले होते. त्यांना प्रेरित करणारे आजही त्या सुखद क्षणांना जपतात, हा सत्याच्या जपणुकींसाठीचा आदर्श असावा. माझ्या तरुण मनाला तेव्हा वाटले होते माझा शेतकरी बाप आता युगानुयुगांच्या जोखडातून मुक्त होईल. परंतू दुर्दैवाने तो लढा पुढे कमजोर होत गेला. त्याला बळ देण्याचे काम गंगाधर मुटेंनी गझलेच्या माध्यमातून नक्कीच केले आहे. ही आशा पल्लवित करणारी 'अन्नधान्य स्वस्त आहे' ही गझल मनाचा ठाव घेणारी आहे...

कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे!

वाह! किती सुंदर अभिव्यक्ती आणि किती सखोल आशयगर्भता!!

मिर्झा ग़ालिब आणि बहादूर शाह जफ़र यांचे जीवन आणि गझल वेगळे केले जाऊ शकत नाहीत. गझल जगावी लागते तेव्हाच निपजते. गंगाधरजींच्या बाबतीतही ही उक्ती मला योग्य वाटते. ज्यांना मातीच्या कळांची जाण नाही, ते या काळ्या आईवर काय लिहिणार? प्रत्यक्ष राबते हातच राबणार्‍यांच्या जाणिवांची सशक्तपणे अभिव्यक्ती करू शकतात. गंगाधरजींचा हा मतला हे सिद्ध करण्यासाठी स्वयंसिद्ध आहे;

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे ?

वाह.....!! अगदी साक्षात कास्तकारच ही खंत व्यक्त करू शकतो!

              अण्णा हजारेंनी निर्माण केलेली चळवळ भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी नक्कीच नोंदवली जाईल. “गोरे गेले काळे आले ! देशाचे वाटोळे झाले !!” असे म्हणत दिल्लीच्या तख्ताला पळताभुई थोडी करणार्‍या या आंदोलनाच्या प्रभावाखाली कोण येणार नाही? गंगाधरजींसारखे व्यक्तिमत्त्व, ज्याला अन्यायाची चीड व चाड आहे, ते तर न आले तर नवलच! त्यांची 'वादळाची जात अण्णा' ही गझल म्हणजे ज्वलंत सामाजिक परिस्थितीवर जळजळीत प्रहार करण्याच्या प्रक्रियेतून साकारलेले एक सुंदर शिल्पच जणू-

धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला ?
भ्रष्ट नेते मोकळे अन् , कोठडीच्या आंत अण्णा !
* * *
भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे,
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा!
* * *
आस अण्णा श्वास अण्णा, 'अभय' तेचा ध्यास अण्णा.
अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा !!!!!

गझलेचे एक दिलखुलास रूप म्हणजे हझल. 'माझी गझल निराळी' मधील एकूण ६ हझल अतिशय विनोदी तथा हझलविश्वाला समृद्ध करणार्‍या अशाच आहेत. त्यातील मला अतिशय आवडलेले ५ शेर मी इथे मुद्दाम अधोरेखीत करतो आहे-

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरणीच्याच जबड्यात गेला ससा
* * *
भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा
* * *
करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी
* * *
उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे, टुकार घोडे हजार आहे
* * *
बघा जरा हो बघा जरासे, कसा भामटा फुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे..

वाह वा! माझी हझल निराळी !!

         गझलकाराचे व गझलेचे वय जसजसे वाढत जाते तसतसे ते दोघेही तरुण होत जातात असे माझे गुरु तथा सुरेश भटांचे शिष्य आदरणीय प्रा. सतीश देवपूरकर म्हणतात. याचा प्रत्यय हा गझलसंग्रह वाचून येतो. गंगाधर मुटेंची गझल विविध खयालांना एकत्र घेऊन पुढे पुढे अधिकच संपन्न होत गेलेली आहे. गझल निर्मितीत चिंतनाला अतिशय महत्त्व आहे. शिवाय एखाद्या शेराच्या परिपूर्णतेसाठी तास न् तास चालणारा रियाज ही तेवढाच महत्त्वाचा असतो. वृत्तबद्ध रचनांची बांधणी म्हणावी तेवढी सोपी नाही परंतू रियाजाअंती ती सहज साध्य आहे मात्र कमीतकमी शब्दांत दांडगा विचार मांडणे तसे जिकिरीचेच काम आहे. वैचारिक प्रगल्भतेचे प्रतिबिंब तेव्हाच गझलांतून अगदी सहज उतरत जाते, जेव्हा एखादा गझलकार एखाद्या रचनेत रात्रंदिवस अडकून पडतो. दोन मिसरे एका सेकंदातही सुचू शकतात किंवा त्याला दोन दिवसही लागू शकतात. अशावेळी चिंतनाच्या विविधपैलुंची झलक एखाद्या शेरामध्ये एकाचवेळी दिसून येते. गंगाधरजींचा काही गझलांचा या अंगाने विचार केला तर त्यांची वैचारिक ठेवण गझलकार म्हणून प्रथम श्रेणीची वाटते. गझलकार हा प्रथम दर्जाचा विचारवंतही असायलाच हवा. त्यांचा हा मतला आणि काही शेर या बाबीची प्रचिती नक्कीच करून देतात. पाहा

घमासान आधी महायुद्ध होते !!
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते !!

किती सुंदर विचार मात्रांची कसलीही सूट न घेता मांडलेले आहेत! 'रूप सज्जनांचे' ही गझल सुद्धा तितकीच नितांत सुंदर झाली आहे. नमुन्यादाखल एक शेर......

लेऊन फार झाले, हे लेप चंदनाचे !!
भाळास लाव माती, संकेत बंधनाचे !!

असे सुंदर शेर सहज साध्य असत नाहीत. यासाठी करावा लागतो तास न् तास रियाज. यासाठी जगावी लागते गझल. याचसाठी शायर लिहीत राहतो तहयात. गझल साधनेत गंगाधरजी कुठेच कमी पडलेले नाहीत हेच यातून स्पष्ट होते.

'माझी गझल निराळी' च्या दुसर्‍या आवृत्तीत नवीन दोन गझलांची भर पडत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. 'टिकले तुफान काही' आणि 'अमेठीची शेती' या दोन्ही गझला परत शेतकर्‍याच्या डोक्यावरील फाटक्या आभाळाची जाणीव करून देतात. खरे आहे आपले, गंगाधरजी, अपूर्णतेची खंत घेऊन पोशिंदा आजही हळहळतो आहे.

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही !!
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही !!
* * *
निद्रिस्त चेतनेचे, सामर्थ्य जागवाया,
पोटात सागराच्या घुसले तुफान काही !!

                      या दोन्हीही गझलांतील एकूण एक शेर दर्जेदार आहेत. नवचैतन्य जागवणारे आहेत. न्याय्य हक्कांच्या लढ्याची तुतारी फुंकणारे आहेत. पिढ्या न् पिढ्या अंधारात खितपत पडलेल्यांना आशेचा किरण दाखवणारे आहेत. आपल्या लेखणीच्या ताकदीची चुणूक दाखवणारे आहेत. त्याच त्या राजकारणाचा वीट आलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार्‍या आहेत. हा गझलसंग्रह वाचून 'साये में धूप' या दुष्यंत कुमारांच्या गज़लसंग्रहाची आठवण झाली. त्यांची एक गज़ल गंगाधर मुटेंच्या विचारांशी मिळती जुळती आहे, त्यातील दोन शेर येथे देणे मला क्रमप्राप्त वाटते.

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक़सद नही,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।
* * *
मेरे सीने में नही तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकीन आग जलनी चाहिए।

               यापुढेही पिढ्यानपिढ्यांच्या अबोल आवाजाला गंगाधरजींनी असेच बोलते करत राहावे. त्यांचे चळवळीतील कार्य यशस्वी व्हावे, यासाठी विधाता त्यांना सर्वतोपरी बळ तथा उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा!


गंगाधर मुटे यांना 'माझी गझल निराळी' च्या दुसर्‍या आवृत्ती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!


                                                                                                 - राज पठाण
                                                                                             अंबाजोगाई, जि. बीड.
                                                                                              दि. ०६ मार्च, २०१४
== ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == 

’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : तुषार देसले

मनाला थेट भिडणारी गझल


        “माझी गझल निराळी” हा अत्यंत देखणा,  उत्तम बांधणी,  मांडणी आणि मुखपृष्ठ असलेला हा संग्रह नक्कीच निराळा वाटतो. आपल्या गझलचा मीपण एक फॅन आहे. लगेच वाचून ही टाकला... आजवर मायबोली व फेसबूक-वर आबांकडून नेहमीच तुमच्या गझल व त्याविषयी वाचत होतो.  या गझल  संग्रहातही  नेहमीसारखीच  मनाला थेट भिडणारी  गझल  वाचून  आनंद  वाटला. मला  आपली गझल  का आवडते  हे आबांना  सांगताना  मी  म्हटले  की  "त्यांची गझल ही कल्पनेच्या विश्वात भरकटण्यापेक्षा वास्तव जगण्याचा जो ठाव घेते त्यामुळे ती जास्त भावते. काल जेव्हा मी गझल वाचत होतो तेव्हा हातात पेन्सिल होती आणि  आवडत्या  शेरांवर  टिकमार्क  करत  होतो पण बघता बघता सगळ्या पुस्तकावरच टिकमार्क झालेत..... 

काका, सामान्य कष्टकरी, शेतकरी हा मला जगातला सगळ्यात मोठा सृजक वाटतो. आपल्या रक्तात ती सृजन शिलता आहे. आणि तीच गझलेत उतरली आहे म्हणून गझल जीवंत वाटते. जब गझल का इतिहास लिखा जायेगा......  तेव्हा गझल कल्पनेच्या कोषातून बाहेर काढण्यात आपल्यासारख्या गझलकाराचे योगदान फ़ार मोठे आहे, याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल.  खरं तर मी आत्ताच गझल प्रकाराशी परिचित होतो आहे.  त्यामुळे  माझं  रसग्रहण कदाचित बालिश वाटेलही परंतु आपल्या गझला मला मनापासून आवडल्यात इतकंच!
                                                                                                                     तुषार देसले
                                                                                  झोडगा (माळेगाव)
== ० == ० == ० == ० == ० == ० ==  == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == 

’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर


 ’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर


                                                                                                       प्रमोद गुळवेलकर
                                                                                                       स्टेट बॅंक ऑफ़ हैदराबाद
                                                                                                       शहाजंग शाखा, औरंगाबाद
                                                                                                       दि : ०२-०२-२०१४
प्रिय श्री गंगाधर मुटे ’अभय’
यांस स. नमस्कार

      आपली दोन्ही पुस्तके दोन दिवसात वाचून काढली. समाधान वाटले.
     गझल संग्रहातील "दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे, कुठे लुप्त झाले फ़ुले-भीम-बापू, ते शिंकले तरीही" या गझल खूप उत्तम झाल्या आहेत. कवीचे तरल संवेदनाक्षम मनाचे प्रतिबिंब या रचनांतून उमटले आहे. "माझी ललाट रेषा, मजला फ़ितूर झाली’ ही एक अप्रतिम गझल.
    पुन:पुन्हा ही गझल वाचतांना कै. सुरेश भटांचा वसा चालवणारा कुणी एक भेटल्याचा आनंद वाटला. तुम्ही भटांची नक्कल करता, असे नव्हे पण त्यांच्या रचना वाचतांना येणार्‍या तरल अनुभूती, मोजक्या शब्दयोजनेतून मिळणारी चपखल अभिव्यक्ती आणि जगावेगळी फ़किरीवृती तुमच्या साहित्यकृतीत सम्यकपणे आढळतात.

तुमचा हात असाच लिहीता राहो, हि सदिच्छा व्यक्त करून हा लेखनप्रपंच थांबवतो.

अमर वांग्याविषयी नंतर लिहीन. औरंगाबादला कधी येणं केलंत तर भेटीमुळे स्नेह वृद्धिंगत होईल.

                                                                                                                            आपला
                                                                                                                    प्रमोद गुळवेलकर
== ० == ० == ० == ० == ० ==  == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==

’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे


’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे

          अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि आशयगर्भ गझलांनी ’माझी गझल निराळी’ हा संग्रह दखलपात्र बनला आहे. ग्रामिणतेचे अस्तर फ़ार सुरेख आहे. 

             “वांगे अमर रहे” हा चिंतनशील आणि कृषी-ग्राम निर्भर लोकसांस्कृतिक लेखांचा संग्रहसुद्धा अतिशय आवडला. या संग्रहातील अनेक लेखामागेतुमच्या व्यथावेदनांची संवेदनशीलता आहे. 

          ’भोंडला, हादगा, भुलाबाईची गाणी – महिलंच्या व्यथा’ आणि ’भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन’ हे लेख अतिशय आवडले. 

            ’गझल : सुरेश भटानंतर’ या संग्रहात तुमच्या तीन गझलांचा समावेश हा तुमच्या प्रतिभेचा सन्मान आहे. आपले हार्दिक अभिनंदन!


                                                                 डॉ. मधुकर वाकोडे
                                                                      अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
== ० == ० == ० == ० == ० ==  == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==

’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ.विकास आमटे


’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ.विकास आमटे

               कवितेचे माध्यम हाताळणे काहीसे कठीण असले तरी निवडक काव्यपंक्तीतून योग्य तो आशयघन वाचकापर्यंत पोहचविण्याचे सामर्थ्य त्यात नक्कीच आहे. याचे भान आपण राखलेत आणि म्हणूनच आपल्या कवितांना वास्तवाचा परिसस्पर्श लाभला आहे. कविता वाचनीय झाल्या आहेत. वास्तव कितीही भडक असले, बोचणारे सत्य असले तरी ते कसे मांडायचे हा ज्या लेखकाचा अधिकार आहे. आपण जे लिहितोय ते वाचण्यायोग्य असावे, त्यातून निखळणार्‍या भावना प्रामाणिक असाव्यात.... एवढेच! एक खरे की आपल्या बहुतांशी कवितांना अनुभवाची किनार लाभलेली आहे, उत्तम बाज साधलेला आहे.

             आमच्या आनंदवन वाचनालयात ठेवण्यात आलेले हे संग्रह इथे येणार्‍या वाचकांच्या पसंतीस उतरतील अशी आशा बाळगावयास हरकत नाही.

सानंद आभार! आनंदवनी सदैव स्वागत. सुमंगल शुभकामनासह....!

                                                                                                       आपले शुभाकांक्षी

                                                                                                       डॉ.विकास आमटे
                                                                                                       भारती आमटे
                                                                                           महारोगी सेवा समिती, वरोरा

== ० == ० == ० == ० == ० == ० == == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० == ० ==० == 

’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. अभय बंग

Dr. Abhay Bang
SEARCH
Society for Education,
Action & Research in Community Health


प्रिय श्री गंगाधर मुटे,
स. न.

’रानमेवा’  व  ’माझी गझल निराळी’ मधील काही गझला वाचल्या. श्री शरद जोशी व किंमतु ओंबळे यांनी अतिशय सुयोग्य शब्दात तुमचे मुल्यांकन केले आहे असे वाटले. वर्ध्याच्या मातीत या गझला उगवल्या असल्याने अजूनच आपुलकी वाटली.

शुभेच्छासह

                       - अभय बंग
= o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o = = o =

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं