Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Jun 24, 2014

"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

Gazal

 "माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा 

दिनांक : २९ जून २०१४                                                           स्थळ : पत्रकार भवन, पुणे

                "गझल हा काव्यप्रकार ऐकायला जितका गोड आणि मनाला भुरळ घालणारा तो तितकाच लिहायला कठीण" हे साहित्यातील अनेक जाणकारांनी वेळोवेळी आपले मत व्यक्त केले आहे. गंगाधर मुटे यांची व माझी ओळख ही गेल्या काही वर्षातील. शेतकरी संघटनेचे ते सक्रीय कार्यकर्ते आणि मराठी संकेतस्थळावरील एक लेखक एवढीच होती. पण त्यांचा 'रानमेवा' हा काव्यसंग्रह जेव्हा वाचला तेव्हा जाणवले की अरे हे उत्तम कवी देखील आहेत. नंतर मागच्या वर्षी त्यांनी जेव्हा त्यांच्या काही गझला वाचण्यासाठी दिल्या तेव्हाच त्या आवडल्या व या सर्व गझलांचे एक देखणे पुस्तक प्रकाशित करावे असे ठरवले. नोव्हेंबर २०१३ ला "माझी गझल निराळी" या गझलसंग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली व मे २०१४ पर्यंत पहिली आवृत्ती हातोहात संपली देखील.

            रसिक वाचकांच्या हाती "माझी गझल निराळी" या गझलसंग्रहातची ही दुसरी आवृत्ती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

                                                                                                                        निवेदिता राज
                                                                                                                शब्दांजली प्रकाशन, पुणे
-------------------------------------------------------------------------------------------

समकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल

समकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल

            "माझी गझल निराळी" हे अगदी तंतोतंत पटावे असेच शीर्षक आहे. खरोखर आपली गझल निराळी आहे. तिच्यात संवेदने सोबतच सामूहिक वेदना आहेत आणि त्यांचे स्वरूप पराकोटीचे प्रामाणिक आणि कळकळीचे आहे.

            सूर्य, चंद्र, चांदण्या, बहरलेली फुले, उमलता पारिजात, नदी, तलाव, रंगीत शहर इत्यादी बहुप्रसवं विषय ती सर्वश्रुत पद्धतीने न मांडता खरेखुरे ८० टक्के लोकांचे दैन्यघटीत जीवन अभिव्यक्त करते. हाडाचा शेतकरी ( दोन्हीही अर्थाने ) जेव्हा एक कवीही असतो तेव्हाच तो फुलांचं दुःख शब्दातून सांडू शकतो. कळ्यांची काळजी अर्थातुं वाहू शकतो.

            गझलेला कुठलाही आशय-विषय अमान्य नाही. नसावाही...... निर्मिती अवस्थेत कुठलीही गोष्ट (कलासुद्धा) अपरिपक्व आणि संस्कारप्रतिक्षच असते--सातत्यपूर्ण प्रयोगशीलता व अभ्यासू संस्कार पुढे स्थिरमान्यता आणते. मला वाटतं गझल हे मुळातl काव्य आहे, पण ते तंत्रबद्ध असल्यानेच ती विधा आहे. तंत्रमागणीच्या निकषावर पूर्ण उतरली आणि आशयाची संपुर्क्तता--प्रासादिकता--गरजेनुरूप चमकृती या व इतर सर्व आंतरिक मागण्यासह जर ती अभिव्यक्त होत असेल तर तिला गझल मानायला हरकत नसावीच. विषयाचे तर बंधन नाहीतच. अगदी अरब-इराण-फारसी -रेख्ता-उर्दू-असा प्रवास करताना गझलेचा हा आशय, विषय आणि अभिव्यक्तीबदलाचा प्रवास सतत चालूच राहिला, पुढेही राहीलच. शेवटी सृजनशीलता आणि साहित्य विषयक सर्जनाला परिमाणlचा परिणाम लागू होत नसतो. "अजं जनाना गुफ़्तन" या स्त्रीयांशी बोलणे, या अर्थाचाही पुढे स्त्रियांविषयी बोलणे हा बदल झालाच. आता त्या एकल्या प्रेमाची जागा जागतिक प्रेमव्याप्तीत बदलली. अहमद फ़राज़ म्हणतात,

"ग़में दुनियामे ग़मेयार भी शामिल कर लो;
नश्शा बढ़ता है शराबे जो शराबो में मिले

            "तात्पर्य, जर संपूर्ण जग कवेत घेणारी विधा उपलब्ध असेल तर तिच्यावर आशय-विषयाचे बंधने लादण्याचा कोतकरंटेपणा आम्ही का करावा? आणि कशासाठी...... परंतु कलेसाठी कला, जीवनासाठी कला की जगवण्यासाठी कला.... हा त्या कलावंताच्या चिंतनाचा विषय असतो. तुमच्यासाठी तो जगणे आणि जगवणे असा असावा.... मला तो खचितच वास्तववादी वाटतो.

            आशावादी; स्फूर्तिकाव्य गैर नाहीच; मात्र वास्तव - निराशा याकडे डोळेझाक करणे कसे शक्य आहे? इत्यादी बाबत विचार करिता आपली गझल, आपले काव्य, आपले लेख निराळे आहेतच. तुमच्यातला सोशल कवी अलाहिदा म्हणायला तयार नाही आणि कार्यकर्ता तर डोळेझाक का करावी? हा प्रश्न नेहमीच स्व:ताला विचारताना दिसतो. डोळेझाक करूच नये हे उत्तर तो कवीला देऊन तसं करण्यास बाध्यच करीत असावा.

            शेती; शेती समस्या; त्यावर काय व्हावं त्यासाठी चिंतन प्रपंच या करिता जळणारा आणि लेखनी जाळणारा कवी कदाचित तुमच्या शेतकरी चळवळीचे फलित असावा. रूढार्थाने आणि काव्यार्थाने वेगळी वाट जोखणारा हा कवी; गझलकार निष्ठुर शासन, शासकीय धोरण आणि यंत्रणेसोबतच कृषिप्रधान देशातच होणारी शेतकऱ्याची कुचंबणा ( अमानवीय मुस्कटदाबी) इत्यादीवर धाडसी भाष्य करतो.

            "कांदा मुळा भाजी.... " म्हणणारी सश्रद्ध संत कविता तत्कालीन समृद्धी बयाण करते तर तुमची धाडसी गझल शासकीय अनिच्छेने आलेली बकाली कथन करते. अश्या अर्थाने ती परंपरा नाते विशद करीत जाते. मानवी मनाची सूक्ष्मातिसूक्ष्म मनोचिकित्सा न करिता मानवी समूहाच्या दुःखाची सूक्ष्म चिकित्सा तिला अधिक जरूरीची वाटते हे समकालीन काव्याहून तिचे (गझलेचे) वेगळेपण होय.

            अशी ही आगळीवेगळी "माझी गझल निराळी" निश्चितच निराळी आहे. जी समकालीन कवितेत/गझलेत वेगळेपण दाखवते. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने "माझी गझल निराळी" ला माझ्या अनंत शुभेच्छा आणि आपले मनाच्या गाभाऱ्यातून मनपूर्वक अभिनंदन......!

                                                                                                     आपला गझलकार स्नेही
                                                                                                     अनंत नांदुरकर "खलिश"
------------------------------------------------------------------------------------------------------------

Jun 22, 2014

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून
पूजा अर्चा करायचा ....

खडकू काही आले नाही
दवापाणी झाले नाही
गरिबीच्या सत्तेपुढं
डोकं काही चाले नाही
अंती मात्र देवच आला
प्राणज्योती घेऊन गेला ....

नियोजनपंडितांना भयावह क्षय आहे
पोशिंदा भयभीत; ऐद्यांना ’अभय’ आहे
शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही!
शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?

                               - गंगाधर मुटे ’अभय’
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==

Jun 15, 2014

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

              "येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट "पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल," असा आकाशवाणी/दुरदर्वशनर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे, अशी स्थिती आहे.

             एकदा तर "पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले - शेतकरी चिंताग्रस्त" असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.

           आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.

       कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या  संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेती करणारा प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेतीपुरता हवामान शास्त्रज्ञच असतो. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो असे त्याने वर्नुषावर्षे अनुभवातून हवामानाचे दर्शन घेतलेले, त्यामुळे त्याचा या बाबीवर विश्वास असतो. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधिक विश्वासाहार्य नक्कीच असतात.

        हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.

        पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.

मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:

१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
---------------------
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
---------------------
३) foreca
http://www.foreca.com
-------------------
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
------------------
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
-----------------------
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
-----------------------
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
-------------------------------
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
--------------------------------
        यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असतात. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.

         या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्‍याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास "शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस" असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. "पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे" हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशाचाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत? एवढा तरी विचार करायला आपण शिकणार आहोत की नाही?
            मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.
        हवामानशास्त्राच्या बाबतीत आपण इतर देशांपेक्षा शेकडो वर्षांनी मागे आहोत, हे दिसतेच आहे. हरकत नाही पण; इतर देशांच्या पुढे जाण्याचा, बरोबरी करण्याचा किंवा महाशक्ती बनण्याचा मुद्दाही सोडा, शेतीला थोडाफ़ार हातभार लागेल  एवढे तरी हवामानशास्त्र विकसित करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि वेळोवेळी निव्वळ पुस्तकी ज्ञानाच्या आधारे शेतीविषयात नको तेव्हा, नको ती लुडबुड करणारी विद्वान मंडळी काही हातपाय हालवणार आहेत की नाही, हाच कळीचा मुद्दा आहे.

      स्वातंत्र्योत्तर भारतातील शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि पुस्तकी ज्ञानाच्या महामेरू विद्वान मंडळींना स्वातंत्र्याचे हवामान मानवणार नाही, याचा अदमास जर महात्मा गांधींना जर तेव्हा आला असता तर त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला असता किंवा नाही, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

( क्रमश: )
                                                                                                                    - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रकाशित दि : 22/07/2011

Jun 11, 2014

अस्थी कृषीवलांच्या

अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या
करतील आमरस्ता मागून चालणारे

देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे

                             - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------ 

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं