Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 19, 2017

Nov 21, 2017

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.

या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

या संमेलनात "आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण", "स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?", "शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, "सावध! ऐका पुढल्या हाका", अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.
संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-to-host-4th-shetkari-sahitya-sammelan/articleshow/61691919.cms

Jul 7, 2017

संपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण?

संपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक २ : मार्च २०१७

खरा शेती साहित्यिक कोण?

शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर धरल्याची अनुभूती असणे नक्कीच महत्त्वाचे असले तरी अनिवार्य नाही. एखाद्याच्या नावाने सात-बारा असला किंवा तो प्रत्यक्षात शेतीत राबत असला म्हणजे तो शेती आणि शेतकर्‍यांचा हितचिंतकच असतो, असेही समजण्याचे कारण नाही. इथे स्वार्थ आणि परमार्थाचे व्दंद उभे राहते. शेतीची बाजू घेऊन लढायचे असेल तर निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कटिबद्धता महत्त्वाची असते. स्वत: शेतीवर राबून शेतीवर उपजीविका असणार्‍याला शेतकरी म्हणता येईल; नव्हे तोच खराखुरा शेतकरी. पण शेतकरी असला म्हणजे तो समग्र शेतीच्या भल्यासाठी वैश्विकतेच्या भावनेतून सद्भावना बाळगून असतोच, शेतीचे प्रश्न सुटून समग्र शेतकर्‍यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे जीवन खेचून आणणारे व्यवस्था परिवर्तन व्हावे असा व्यापक विचार करत असतोच, असा गैरसमज करून घेण्याचेही कारण नाही. शेती कसणे हा त्याचा व्यवसाय आहे, कदाचित अन्य कोणतेच पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध नसल्याने नाईलाजाने उपजीविकेचे साधन म्हणून शेती कसत राहणे व मरता येत नाही म्हणून जगत राहणे अथवा जगण्याच्या सर्व वाटा समाप्त झाल्या तर स्वत:चे जीवन संपवण्यास सिद्ध होणे, हीच एकंदरीत शेतकर्‍याची जीवनशैली झाली आहे, असेही म्हणता येईल. 
मात्र शेतीची बाजू मांडायची असेल तर शेतकरी असणे किंवा नसणे फारसे महत्त्वाचे नाही. मागील ३० वर्षाचा इतिहास तपासला तर नेमके हेच आढळून येते. ज्यांच्याकडे सातपिढ्यापासून शेती नव्हती, शेतीच्या उत्पन्नावर उपजीविका अवलंबून नव्हती, शेतकर्‍यांच्या पोटी जन्मही घेतला नव्हता तरी त्यांनी "शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडावा" म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते, अनेकांनी स्वत:च्या आयुष्याची होळी आणि संसाराची राखरांगोळी केली होती, हजारो तुरुंगात गेले होते, हजारोंनी निधड्या छातीवर पोलिसांच्या लाठ्या झेलल्या होत्या. शेकडोंनी बंदुकीच्या गोळ्यांसमोर स्वत:ची छाती आडवी धरली होती. मात्र त्याच वेळी स्वत:ला शेतकरी म्हणवणारे करोडो शेतकरी पुत्र मात्र शेतकरी आंदोलनाशी प्रतारणा करत आपापल्या जातीच्या पुढार्‍यांचे धोतर धूत बसले होते. हा अगदी ताजा इतिहास आहे.
विषय शेतकरी आंदोलनाचा असो किंवा शेती साहित्य चळवळीचा. वास्तव कटु असले तरी ते स्वीकारलेच पाहिजे. शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतला असला किंवा नावाने सात-बारा असला तरी हा निकष लावून कोणत्याच निष्कर्षाप्रत पोचता येत नाही. फक्त सातबारा नावाने असला म्हणजे तो शेतकरी आंदोलक ठरत नाही; तद्वतच शेती साहित्यिकही ठरत नाही. संबंधित व्यक्तीची शेती विषयासोबत असलेली बांधिलकी, शेतीच्या अर्थवादाचा अभ्यास, कटिबद्धता आणि प्रसंगी त्यासाठी सर्वस्व पणाला लावू शकणारी त्यागी वृत्तीच इथे महत्त्वाची; भले मग तो शेतकर्‍याच्या घरात जन्मलेला असो अथवा नसो! लेखणीतून व्यक्त होणारा आशय शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आहे की शेतीचा प्रश्न आणखी किचकट करून शेतीच्या शोषकांना पोषक ठरणारा आहे यावरूनच साहित्यिकाची जातकुळी ठरवली गेली पाहिजे.

- गंगाधर मुटे
   २०/०२/२०१६

************************************************
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
***********************************************
अंगारमळा वार्षिक वर्गणी - रु.१५०/-
वर्गणी ऑनलाईन भरण्यासाठी:
A/c Name - ANGARMALA
A/c No - 0202002100027538
Punjab National Bank Branch - Hinganghat (Wardha)
MICR Code - 442024005 IFSC Code - PUNB0020200


वर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:
अंगारमळा
मु.पो.आर्वी (छोटी)
ता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड - ४४२३०७


Jul 1, 2017

४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन

४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन

नमस्कार मंडळी,
        आज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपासून उत्तरार्ध सुरु झालाय. ४ थ्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागायचे म्हणता-म्हणता अन्य कामाच्या धबडग्यात चक्क चार महिने निघून गेलेत. जरा उशीर झाला असला तरी पुढील कामाचा थोडा वेग वाढवून आपल्या लेट गाडीचा टाइम भरून काढणे अशक्यही नाही. चला तर मग आजपासून आता चवथ्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात आणि कामाला लागुयात.

        २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले, २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे आणि २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ ला गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले, त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. 

       आता चवथे संमेलन विदर्भाबाहेर मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे घ्यायचे नियोजित असून त्याकरिता  पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.
  • तीन साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्‍यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर १५/०७/२०१७ पूर्वी संपर्क साधावा.
  • अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद हिशेबाकरिता दोन वर्षापूर्वी "शेती अर्थ प्रबोधिनी" ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. सबब पुढील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शीपणाने संस्थेच्या मार्फतच चालतील. इच्छुक व्यक्ती/संस्था/प्रतिष्ठन यांच्याकडून देणगी स्वरुपात निधी स्विकारला जाऊ शकतो. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.   

    मोबाईलधारकासाठी खास : अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीची सर्व माहिती सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी "युगात्मा परिवार" मोबाईल एप डाउनलोड करा. 

  • http://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app614211

    आपल्या सुचनांचे स्वागत आहे. 
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे 
संस्थापक अध्यक्ष 
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Mar 28, 2017

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

एक लेख एका आत्मप्रौढीचा!


            आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्‍या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा  अभिमान अहंकार नसतो. त्यामागे असते केवळ आपल्या हातून घडलेल्या कार्याची कृत्यकृत्यता आणि श्रमसाफ़ल्यता.

            अशाच एका प्रसंगाविषयी आज लिहायचा मोह न आवरल्यामुळे आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन मी लिहित आहे.

 १२ डिसेंबर २०१५ ची ती सकाळ. वेळ ९ च्या आसपासचा. पुण्यावरून माझे मित्र श्री प्रसाद सरदेसाई यांचा एक अचानक मोबाईल कॉल आला. ते कापर्‍या स्वरात म्हणाले,

“मुटे सर, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले का?”


          शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची प्रकृती अनेक दिवसापासून  चांगली नव्हती हे मला माहित होते. ते अत्यवस्थ असल्याचा १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ़्लाईटने पुण्याला जाऊन रुबिया हॉस्पीटलमध्ये त्यांची भेट घेऊन आलो होतो. ते अत्यवस्थ होते आणि वैद्यकीय उपचाराला त्यांचे शरीर फ़ारसे प्रतिसाद नव्हते. एवढे मला माहित होते. नंतरच्या काळात संपर्क माध्यमातून प्रकृती “यथास्थिती” असल्याचे संकेत मिळत होते. पण अगदीच ताजी म्हणावी अशी माहिती माझ्याकडे नसल्याने मी म्हणालो,

“ नाही. यासंदर्भात ताजी माहिती माझ्याकडे नाही” मी.

“शरद जोशी इज नो मोअर” असा तिकडून प्रसाद सरदेसाई यांचा रडका आवाज ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले. विश्वास बसत नव्हता पण सरदेसाई सरांनी दिलेली बातमी खोटी असण्याचीही शक्यता नव्हती. मी तातडीने मोबाईलवर नंबर डायल केला.

“सरोजताई, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले काय?” मी.

“माझं काल रात्रीच बोलणं झालं प्रकृती.........”

मी मध्येच सरोजताईंचे बोलणे थांबवून म्हटले.

“आज काहीतरी विपरित बातमी आहे, तुम्ही तातडीने पुण्याला संपर्क करावा”

            इतके बोलून मी लगेच फ़ोन कट केला. नंतर लगेच श्री वामनराव चटप व श्री राम नेवले यांना फ़ोन केला. त्यांनाही काहीच माहिती नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुण्याला संपर्क करुन माहिती मिळवावी, असे सुचवले. घरी बायकोला सांगून टीव्हीवर मराठी बातम्यांचे चॅनेल आळीपाळीने सतत बदलून काही बातमी येते का ते बघत राहायला सांगीतले.

            पुण्याला फ़ोन करून म्हात्रे सर किंवा देशपांडे सरांशी संपर्क करावा व नक्की काय ते खात्री करून घ्यावी, असा विचार करत असतानाच तिकडून तितक्यात सरोजताईंचाच फ़ोन आला. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आता बोलण्याची गरजही संपलीच होती. मग फ़ोनवर दोन्हीकडून अक्षरश: ओक्साबोक्सी रडारड सुरु झाली. ९-१० मिनिटानंतर मी स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला पण त्यात यश येईना म्हणून बोट लाल बटनेवर ठेवले आणि फ़ोन कट केला.

            आता रडण्याखेरीज अन्य काही कार्य उरलेलेच नव्हते. बातम्या अजून सुरु व्हायच्या होत्या. निदान आणखी दोन तास तरी ही बातमी अधिकृतपणे जाहीर होण्याची व प्रसारमाध्यमांपर्यत पोचण्याची शक्यता नव्हती. बातमी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना आणि वृत्त वाहिन्यांना शरद जोशींविषयीची माहीती, जीवनपट, छायाचित्र आणि व्हिडियो लागतील. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देऊ शकेल असे शेतकरी संघटनेकडे एकच व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणजे प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. संघटनेच्या सुरुवातीपासूनच म्हात्रे सरांनी केंद्रीय कार्यालय सांभाळले आहे. पण याक्षणाला ते माहिती पुरवायला नक्कीच उपलब्ध होऊ शकणार नव्हते. शिवाय शरद जोशींच्या प्रकृतीची बातमी प्रसारमाध्यमांपासून लपवून गोपणीयता राखल्याने प्रसारमाध्यमेही बेसावध असल्याने ऐन वेळेवर माहिती गोळा करणे त्यांनाही शक्य होणार नाही, याचाही नीटसा अंदाज येऊन गेला.

            शरद जोशींच्या अत्यवस्थेविषयी कार्यकर्त्यांनाही फ़ारशी माहिती नसल्याने ही बातमी महाराष्ट्रासहित अन्य राज्यातील शेतकर्‍यांनाही धक्का देणारी असल्याने या बातमीचे महत्वही अनन्यसाधारणच होते. आता यासंदर्भात जे काही करायचे ते आपल्यालाच करायला हवे असे ठरवून  तातडीने लॅपटॉपवर बसलो आणि महाराष्ट्रासहित देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना आणि दुरदर्शन वाहिन्यांना इमेलद्वारे माहीती पाठवायचा सपाटा सुरू केला.

            तीन-चार इमेल जाईपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकापाठोपाठ शरद जोशींविषयीची संपूर्ण माहिती, जीवनपट, आंदोलनाचा आढावा, छायाचित्र व व्हिडियो असलेले दहा-बारा इमेल त्यांचेकडे पोचले तेव्हा पत्रकारांना संशय येऊन काहीतरी नक्कीच वाईट बातमी असल्याचा त्यांनाही अंदाज येणे क्रमप्राप्त होते. मग माझा मोबाईल खणखणायला लागला. पुण्यावरून अधिकृत घोषणा न झाल्याने मी पत्रकारांना बातमीच्या सत्यतेचा दुजोरा देऊ शकत नव्हतो. मग मोबाईल मित्राच्या हाती दिला आणि सांगीतले की कॉल करणार्‍या सर्वांना सांग की मी सध्या अतिव्यस्त आहे त्यामुळे त्यांनी एक तासानंतर संपर्क करावा. मी मात्र माहितीचे इमेल पाठवणे सुरुच ठेवले.

            मी पाठवत असलेल्या माहितीचा बाज लक्षात घेता बहुधा प्रसारमाध्यमांनाही पुरेसा अंदाज येऊन गेलेलाच असावा कारण मी फ़ोनवर उपलब्ध नाही म्हटल्यावर तिकडून इमेलवर रिप्लाय यायला लागलेत. रिप्लायला प्रतिसाद न देता मी नवीन माहिती पाठवणे सुरुच ठेवले.  त्याचा परिणाम असा झाला की अधिकृत घोषणा होताच दूरदर्शन वाहिन्यावर थेट सविस्तर बातम्याच सुरू झाल्यात. पुण्यापासून ८०० किलोमिटर अंतरावरील आर्वी छोटी सारख्या दुरवरच्या ग्रामीण भागातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावात बसून मी दिवसभर राज्यभरातल्या कानाकोपर्‍यातील प्रसारमाध्यमांना हवी ती माहिती आणि साहित्य पुरवत होतो, ही आधुनिक संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञानाची किमया होती आणि मी त्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेत होतो.  दिवसभर दूरदर्शन वाहिन्यावर आणि १३ तारखेच्या राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यामध्ये ५० ते ९० टक्के मजकूर मी पाठवलेलाच दिसत होता किंवा मीच चालवत असलेल्या www.sharadjoshi.in व www.baliraja.com या संकेतस्थळावरुन तरी घेतलेला होता. शरद जोशींचा जीवनपट तर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी मी जसा पाठवला तसाच्या तसाच छापला होता.

            माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने व मी निर्माण करून ठेवलेल्या संकेतस्थळांमुळे शरद जोशींसारख्या युगात्म्याचे व्यक्तीमत्व सविस्तर माहितीसह जनतेपर्यंत पोहचू शकल्याने श्रमसाफ़ल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटून अभिमानास्पद वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.

 - गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
साप्ताहिक उदयकाळ "चैत्र विषेशांक-२०१७" मध्ये प्रकाशित.

Feb 13, 2017

सामान्य चायवाला

सामान्य चायवाला

जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला
मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला

मज रानटी समजला तेही बरेच झाले
कसदार रानमेवा मी चारतोच त्याला

ना घाम गाळला अन ना रक्त आटविले
कोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला?

मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो
लांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला?

धनवान इंडियाची बलवान लोकशाही
होतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला

शिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या
की धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला

ज्यांचे अभय पहारे ते मारतात बाजी
पुसणार कोण येथे निद्रिस्त जागल्याला?

                            - गंगाधर मुटे 'अभय'
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

Feb 10, 2017

सोज्वळ मदिरा

सोज्वळ मदिरा

आधी खाते भाव जराशी
मग ती घेते नाव जराशी

तू नसण्याने भिकार झाले
बघून ये तू गाव जराशी

चाल रडी पण; लोभसवाणी
खेळ आणखी डाव जराशी

आढे वेढे हवे कशाला
थेटच दे ना ठाव जराशी

खुळ्या स्मृतींना जपण्यासाठी
निदान दे तू घाव जराशी

उत स्वप्नांचा पाडा आला
लगबग ये चल घाव जराशी

मम श्वासाची कपोलभाती
ओठावरती लाव जराशी

अभय नशेची सोज्वळ मदिरा
दे चढण्याला वाव जराशी

               - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Feb 1, 2017

राष्ट्रपिता महात्म्याला साकडेनिवेदन

राष्ट्रपिता महात्म्याला साकडेनिवेदन

परमपुज्यनीय बापू,
आपण या देशातील सामान्यातील सामान्य जनतेला, शेतकरी व कष्टकरी ग्रामस्थांना स्वराज्य आणि सुराज्य मिळावे याकरिता वेगवेगळे आंदोलन व सत्याग्रह करुन स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताच्या दुर्दवाने गोर्‍या इंग्रजांना घालवल्यानंतर आपण अधिक काळ जगू शकले नाहीत.
स्वातंत्र्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी आपली ग्रामस्वराज्याची व ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली नाही. उलट ग्रामजन आर्थिक गुलामित टाकण्याचे धोरण आखले. ग्रामविकासाचे मर्म शेतीच्या आर्थिक विकासात आहे, गाव आर्थिक संपन्न झाला तर देश संपन्न होईल, या संकल्पनेचा विचार न करता भारतीय शेतकर्‍यांना शेतीविरोधी कायद्याच्या जाळ्यात बेमालुमपणे अडकवले. देशासाठी त्याग करा असे सांगून आपल्या वैचारिक वारसदारांनी शेतकर्‍यांना अधिक पिकवायला सांगून आणि पिकवलेला शेतमाल नगण्य किंमतीत विकला जाईल याचा कायदेशीर बंदोबस्त करुन शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत ढकलले. शेती व शेतकरी विरोधी कायदे करुन व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन गावात बचत उरणारच नाही अशी चिरेबंदी व्यवस्था निर्माण केली त्यामुळे ग्रामीण भारतात उद्योग उभारणी होऊ शकली नाही.
गेली ६५ वर्षे नवनवीन उद्योगांची चैत्रगौर मांडून देश बाह्यदर्शनी सजवल्याने अंतर्गत देश पोखरून ’शायनिंग इंडिया’ विरुद्ध ’भकास भारत’ असे चित्र निर्माण झाले. आर्थिक विकासाचा कणा असलेला देशाचा पोशिंद्याची बाजारातली आर्थिक पत संपल्याने व त्याच्या समोरील जीवन जगण्याचे सर्व पर्याय संपल्याने आत्महत्त्या करायला लागला. शेतमालाचे उत्पादन खर्च भरुन निघतील इतके भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी शेतमाल स्वस्तात स्वस्त लुटून सुट-सबसिडीचा खुळखुळा वाजवण्यात आला. एकजात सर्वच राजकिय पक्षांची भूमिका समसमानच राहिल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय व कर्जबाजारी शेतकर्‍यांची पिढी तयार करणारा कारखाना झाला. आर्थिक विषमतेच्या सतत रुंदावत जाणार्‍या दरीमुळे आता भारत एकसंघ आणि अखंड राहिलेला नसून “इंडिया आणि भारत” असा विभागला गेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात विलायतेचा गुलाम असलेला भारत आता स्वातंत्र्योत्तर काळात इंडियाचा गुलाम झालेला आहे.

हे राष्ट्रपित्या,
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्‍यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्‍या सर्व राजकीय पक्षांची आम्ही तुमच्याकडे तक्रार दाखल करत आहोत, 

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण उत्थानासाठी युगात्मा शरद जोशी प्रणीत भारत उत्थान कार्यक्रम (मार्शल प्लॅन) अंमलात आणण्यासाठी..... 

शेती व शेतजमिनीसंबंधी दंडाबेडी ठरलेले समाजवादी कायदे (१) कमाल जमीन धारणा कायदा व सिलिंग कायदा (२) आवश्यक वस्तूंचा कायदा (३) सक्तीचा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यासाठी....  
शेतीसंबंधी बाजार व प्रक्रियेतील सर्व अडथळे काढून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यातील हस्तक्षेप संपवण्यासाठी..... 
ग्रामीण क्षेत्रासाठी रस्ते, वीज, पाणी साठवणूक व प्रक्रिया वाहतूक, विपणन, माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी आवश्यक संरचना निर्माण करण्यासाठी.... 
"तूट नसतानाही आयात व मुबलकता असतानाही निर्यातबंदी" या शेतकरी विरोधी नितिचा विरोध करण्यासाठी....  
 • पूर्ण दाबाची पूर्ण वेळ वीज, मागेल त्याला तात्काळ नवीन वीजजोडणी, वीजबिलातून शेतकर्‍यांची सरसकट वीज बील मुक्ती मिळण्यासाठी...
उच्चशिक्षितांची वाढती बेरोजगारी लक्षात घेता ग्रामीण युवकांना शेती व्यवसायातूनच रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची अमंलबजावणी करण्यासाठी....  
देशाची उन्नती होण्याकरिता अंतर्गत बाजारपेठेचा विकास होणे गरजेचे असते. भारत भकास ठेऊन देशाचा विकास करु पाहणार्‍या अर्थनितीचा लगाम खेचण्यासाठी.... 
शेतकर्‍यांना संपत्ती बाळगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाची पुनर्स्थापना करण्यासाठी.... 
यासाठी, “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी प्रार्थना करुन तूच शेतकर्‍यांना आणि पर्यायाने या देशाला वाचव, असे समस्त भारतीय शेतकर्‍यांचे आर्जव तुमच्या चरणी गार्‍हाणे स्वरुपात सादर करत आहोत.

समस्त भारतीय शेतकर्‍यांच्या वतिने : सौ. सरोजताई काशीकर, अनिल घनवट, गंगाधर मुटे, सौ. शैलजा देशपांडे, सौ. गीता खांदेभराड, सतिश दाणी, सिमा नरोडे, मदन कामडी, गोविंद जोशी, सौ. अंजली पातुरकर, सरदार भुपेंद्रसिग मान,  किसान सुब्रतो त्रिपाठी आणि समस्त शेतकरी संघटनेचे पाईक

दिनांक : ३० जानेवारी २०१७
*************
बापू कुटी समोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात ३० जानेवारी २०१७, सोमवारी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत संपन्न झालेल्या शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे या आंदोलनात सांगली, सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून ३००० हजार शेतकरी उपस्थित झाले होते. सभेच्या सुरुवातीला दोन मिनिटे उभे राहून बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बापूंच्या आवडीचे "रघुपती राघव राजाराम" आणि "वैष्णव जन तो तेने कहिये" या भजनांचे दत्ता राऊत आणि संच यांनी गायन केले त्यास उपस्थितांनी आवाजात आवाज मिसळून तालासुरात सामुहिक गायन केले. साकडे आंदोलनाची रुपरेषा विशद करण्यासाठी झालेल्या सभेस सतिश दाणी, मदन कामडे, सिमा नरोडे, गीता खांदेभराड, अ‍ॅड दिनेश शर्मा, मध्य प्रदेशचे किसान सुब्रतो त्रिपाठी, किसान समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, सरोजताई काशीकर, अ‍ॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वर्धा जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तर संचालन प्रा. पांडुरंग भालशंकर यांनी केले. 
 *************
स्वत: शेतकरी संघटनेच्या कामकाजात प्रत्यक्ष भाग न घेता निस्वार्थीपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत कुटुंबातील दुसर्‍या सदस्यांना कौंटुंबिक जबाबदारीपासून मोकळीक देत व शेतकरी संघटनेच्या पूर्णवेळ कार्यासाठी प्रोत्साहन देत पडद्यामागे राहून कार्य करणार्‍या व्यक्तींना यथोचित सत्कार म्हणून "कृतज्ञता पुरस्कार" देण्याचा नांदेड येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनेच्या १३ व्या संयुक्त अधिवेशनाच्या आयोजक समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिला पुरस्कार सौ. शालुताई सुरेंद्र काशीकर यांना प्रदान करण्यात आला. शालुताई काशिकर यांना सरदार भुपेंद्रसिंग मान "कृतज्ञता पुरस्कार" प्रदान करताना. 
*************
क्षणचित्रे : 
* सरकारला जागविण्यासाठी सेवाग्राम येथून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. १ आणि २ मार्च रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात जिल्हा पातळीवरील आंदोलनांची घोषणा होईल. 
* आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सेवाग्राम ते साबरमती अशी रॅली काढून करण्यात येणार आहे. 
* दुरवरचे कार्यकर्ते सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी पोचायला लागल्याने आश्रम परिसर फ़ुलायला लागला होता. * शेतकरी कार्यकर्त्यांची शिस्तबद्धता स्थानिक जनतेच्या कुतुहलाचा विषय झाली होती. 
* अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाल्याने कर्यकर्त्यामध्ये नव्याने उत्साह संचारल्याचे जाणवत होते. 
 *************

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं