Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Oct 31, 2014

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : नियम, अटी व तपशिल

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४

नमस्कार मित्रहो,
     ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रसारमाध्यम या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही पण;

     आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरजालाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच पहिली पायरी म्हणून आज सादर करीत आहोत.....

आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४

विषय : शेती आणि शेतकरी

या स्पर्धेचे दोन प्रकार असतील,

गद्यलेखन स्पर्धा-२०१४ आणि पद्यलेखन स्पर्धा-२०१४

१] गद्यलेखन स्पर्धा-२०१४
विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख   ड) शेतीविषयक माहितीपर लेख

२] पद्यलेखन स्पर्धा-२०१४
विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) गझल   ड) गेय रचना/गीत (पोवाडा, अंगाई, लावणी इत्यादी)

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. साहित्य अनुवादित असेल तर तसा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.
२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात
३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त ३ प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही.

पारितोषिकाचे स्वरूप :

प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.

निकाल :

२६ जानेवारी २०१५ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.shetkari.in या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.

पारितोषिक वितरण :

सन २०१५ मध्ये होणार्‍या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :

१) स्पर्धा ०१ नोव्हेंबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन येथे प्रकाशित करावे लागेल.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह spardha@shetkari.in या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहिती spardha@shetkari.in या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख/कथा/वैचारिक लेख/शेतीविषयक माहितीपर लेख/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
८) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
९) गद्यलेखनासाठी शब्दमर्यादा - १२०० शब्द एवढी असेल.

नियम व शर्ती :

१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तर त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.shetkari.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती

आपले स्नेहांकित

डॉ. कैलास गायकवाड, विशाल कुळकर्णी, राज पठाण, कमलाकर देसले
संयोजक मंडळ
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Oct 27, 2014

www.shetkari.in चा लोकार्पण सोहळा

www.shetkari.in चा लोकार्पण सोहळा

             अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव येथे दिनांक २४ ऑक्टोंबर २०१४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या http://www.shetkari.in/ या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा गझलनवाज पं भिमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते, श्री विजय विल्हेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि श्री संजय कोल्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

               याप्रसंगी गझलनवाज भिमराव पांचाळे, श्री विजय विल्हेकर, श्री संजय कोल्हे, श्री गंगाधर मुटे यांची समयोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमाला गावातील नागरिक उपस्थित होते.



: पहिला शेतकरी गझल मुशायरा :

कार्यक्रमानंतर झालेल्या शेतकरी गझल मुशायर्‍यात गझलकार चांदूर बाजारचे श्री नितीन देशमुख, नेरपिंगळाईचे श्री लक्ष्मण जेवणे, यवतमाळचे अनिल कोसे, सुदाम सोनुले,  विद्यानंद हाडके, गंगाधर मुटे यांनी गझला सादर केल्या.

काही वेचक शेतकरी शेर;

कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला
पण सगळ्या झेंड्यांचा कपडा शेतामधूनी आला
- श्री नितीन देशमुख
--------------
एकवार गर्भिली उधार पेरणी
फ़ास लावणार ती दुबार पेरणी
- अनिल कोसे
--------------
फ़ाटक्या अंबरा पांघरावे कसे
रान भेगाळले नांगरावे कसे
- सुदाम सोनुले
--------------
आत्महत्त्या बळीच्या तू रोख वामना
मी अभयदान इतुके मागून पाहिले
- गंगाधर मुटे
-------------

Oct 21, 2014

शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी?

शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी?

आयुष्यभर संसारात "दिवे" नाही लावता आले,
मग आजच भरमसाठ पणत्या लावल्याने
असा कोणता प्रकाश पडणार आहे?
प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात "उजेड" नाही पाडता आला,
मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने
असा कोणता गगनचुंबी "उजेड" पडणार आहे?

लक्ष्मीपुजनाचे विचारताय?
मग ऐका,
आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी
"बॅंकेच्या मालकीची" आहे.
तीची पूजा केली काय नाही काय,
तिलाही तसा काय फ़रक पडणार आहे?
तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
शिवाय
माझ्यावाचून लक्ष्मीचे तरी
कधी काही अडले आहे काय?

आणि तरीही मला
"लक्ष्मीपूजन" करावेसे वाटते, पण;
माझे दैवत माझे श्रम आहे
आणि
लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा
"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची
भलतीच अ‍ॅलर्जी दिसतेय.

* * *
बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे दिवाळी!
बरोबर?
वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची" पूजा करणे म्हणजे दिवाळी!!
बरोबर??
नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून नव्या दमाने
शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी!!!
बरोबर???
शेतकर्‍याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही,
अशा सरकारी धोरणांच्या हिरिरीने अमलबजावणीसाठी
लक्ष्मीपुत्रांनी मांडलेले प्रदर्शन म्हणजे दिवाळी!!!!
बरोबर????
* * *
बळीराजाच्या डोक्यावर यंदा निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात
आणि
सरकार बळीराजाच्या बुडाखाली "फ़टाके" फ़ोडायला निघालंय.
* * *
गरिबीचा क्षय म्हणून 
गळफासाला अभय
भाजल्या कोंबडीला कुठे उरते 
विस्तवाचे भय?

तुमचे तुम्ही लावा दिवे 
आणि करा आरास 
आम्ही शोधतोय उकिरड्यावर 
लेकरांसाठी घास

तसं हे आमचं बारमाही गार्‍हाणं
खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं
सरून गेल्या आशा
मरून गेल्या इच्छा
तरीही मात्र म्हणावेच लागते....
.
.
.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!

                                                                 - गंगाधर मुटे 'अभय'
**********************************************************************

Oct 18, 2014

पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे : अभाशेसाच-२

पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे : अभाशेसाच-२

नमस्कार मित्रांनो,

     अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीसाठी 'आपुलकीचे' श्री अभिजित फाळके यांनी 'लोगो' तयार करून द्यायचे मान्य केले आहे.  Thanks  Abhijeet Arunrao Falke sir!

    कालच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आज आपण शेतकरी साहित्य संमेलन केव्हा आणि कुठे घ्यावे याविषयी चर्चा करुया.

पहिले शेतकरी साहित्य संमेलन केव्हा :

- फेब्रुवारीच्या आधीचा काळ हा कडाक्याच्या थंडीचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीच्या हंगामाचा काळ असतो. आणि फेब्रुवारीच्या नंतरचा काळ शालेय परीक्षांचा असतो. त्यामुळे फेब्रुवारी महिना अधिक सोईचा ठरेल, असे मला वाटते.

पहिले शेतकरी साहित्य संमेलन कुठे घ्यावे :

- याविषयी मात्र भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. काही पर्याय मी आपल्यासमोर ठेवत आहे. काही पर्याय आपण सुचवावेत.

a १) राज्याची राजकीय राजधानी  अर्थात मुंबई.
२) विद्येचे माहेरघर अर्थात पुणे.
३) ग्रामस्वराज्याच्या आणि सुराज्याच्या संकल्पनेचे आणि म. गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेले सेवाग्राम.
४) एखादे मध्यम लोकसंख्येचे खेडेगाव.

 आपल्या सुचना इथेच किंवा abmssc@shetkari.in या  मेलवर आमंत्रित आहेत.

आपला नम्र
गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------

Oct 17, 2014

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ - 1

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

           मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मी माझ्यापरीने काहीतरी करावे म्हणून शेतकरी साहित्य चळवळ स्थापन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.

           गेली ७ महिने मी अनेक मित्रांशी, साहित्य क्षेत्रातील जाणकारांशी, व्यवस्थापकीय तज्ज्ञांशी या विषयावर सल्लामसलत करत आलो आहे. प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याने पहिला टप्पा यशस्वी झाला असे म्हणता येईल. आता दुसर्‍या टप्प्यात आंतरजालावरील कवींशी, लेखकांशी, मित्रांशी, जाणकारांशी व तज्ज्ञांशी चर्चा करायची आहे. आपले सहकार्य अपेक्षित आहे. या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी कृपया abmssc@shetkari.in या मेलवर एक मेल करावी जेणेकरून त्यांच्यांशी संपर्क साधणे आणि सहकारी मंडळाच्या यादीत त्यांचा समावेश करणे शक्य होईल.

           आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलने झालीत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने गतकाळात कुणी प्रयत्न केल्याचे निदान मला तरी ज्ञात नाही म्हणूनच या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून पुढील चार महिन्याच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे सुद्धा ठरवले आहे. हे कार्य जोखिमेचे असले तरी ऐतिहासिक आहे. एकूणच शेतीविषयाला व साहित्यक्षेत्राला कलाटणी देण्याची ऐपत बाळगणारे आहे. मात्र प्रयोग नवा असल्याने अत्यंत विचारपूर्वक पावले टाकावी लागतील कारण या निमित्ताने शेतीसाहित्य चळवळीचा पाया रचला जाणार आहे. 

यासंदर्भात खालील विषयावर विचारमंथन अपेक्षित आहे.

१) संघटनात्मक बांधणीचे स्वरूप
२) कार्यक्षेत्राची भौगोलिक व्यापकता
३) वर्षभर राबवायच्या कार्यक्रमांचे/उपक्रमांचे स्वरूप
४) स्वतंत्र संकेतस्थळ (http://www.shetkari.in/ निर्माण केले आहे.)
५) पहिले संमेलन (केव्हा व कुठे)
६) संमेलनाचे प्रारूप/आराखडा
७) मासिक/त्रैमासिक/विशेषांक काढणे
८) लोगो/Logo
९) याखेरीज आणखी संबंधित विषय

           या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्‍यांची प्रचंड आवश्यकता आहे. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची अपेक्षा करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. ही विनंती.

सहकार्याच्या अपेक्षेत...!

                                                                                    आपला नम्र
                                                                                    गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं