Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Apr 4, 2020

अस्तित्व दान करायचे नसते! - भाग ११

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ११
अस्तित्व दान करायचे नसते!

विज्ञानाच्या साहाय्याने गरूडझेप घेत आसमंतात तरंगणाऱ्याचे अचानक क्षणात पंख गळून पडावेत आणि तो धाडकन जमिनीवर आदळावा, अशी काहीशी स्थिती करोना नामक एका सूक्ष्म निर्जीवाने मनुष्यजातीची करून ठेवलेली आहे. आपल्या शत्रूचा निःपात करण्यासाठी रिव्हॉल्वर पासून रणगाड्यापर्यंत आणि मिसाइल पासून अण्वस्त्रापर्यंत माणसाने शस्त्रसज्जता केली पण आता स्वसंरक्षणासाठी जेव्हा प्रत्यक्ष लढायची वेळ आली, तेव्हा सैन्याचा उपयोग शत्रूशी लढण्यासाठी न होता स्वकीयांना घरात डांबण्यासाठी करावा लागत आहे, एका अर्थाने ही अवस्था मनुष्यजातीला भानावर येण्यास भाग पाडणारी आहे.

शत्रू बदलल्याने युद्धाचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे माणसाने आपल्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची नव्याने फेररचना करणे आवश्यक झाले आहे. ज्या करोनाविरुद्ध लढायचे आहे, त्या करोनाला देश, राज्य, धर्म, जात, पंथ, गरीब, श्रीमंत, शोषक, शोषित, दलित, सवर्ण अशा स्वरूपाचे कोणतेही मनुष्यनिर्मित भेदाभेद कळत नाहीत. ज्याच्याशी गाठ पडेल, त्याला गिळंकृत करणे इतकेच करोनाला कळते. करोना हे मनुष्यजातीवरील संकट असल्याने सर्व जगाने एकत्र येऊन करोनाविरुद्धची लढाई लढणे, हीच काळाची गरज आहे. करोनाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत माणसामाणसात कुठलाही भेदाभेद केल्यास आपण करोनाला हरवू शकणार नाहीत, इतके भान जर याक्षणी मनुष्यप्राण्याला आले नाही तर माणसाची अनुवंशीय अहंकाराची नशा उतरवण्याची संधी करोनाला आयतीच चालून येईल, याबद्दल मला तरी तीळमात्र शंका नाही.

प्रत्येकाने एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे की, कोणतीही एक व्यक्ती, एक समूह, एक पक्ष, एक संघटना वगैरे करोनावर नियंत्रण मिळवू शकत नसल्याने सरकारच्या नेतृत्वात एकजूटीची सक्त आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे तमाम भारतीय जनता आपापल्या घरात बंदिस्त झाल्याने आता केवळ शासन, प्रशासन आणि मानसेवी डॉक्टरच मैदानात उतरून करोनाशी दोन हात करणार आहेत. आपण घरात बसून काहीच करू शकत नसलो तरी शासन, प्रशासन आणि मानसेवी डॉक्टरांचे मनोबल उंचावण्यासाठी सकारात्मक प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह व पाठबळ नक्कीच वाढवू शकतो. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निर्णय कसाही असो आणि कोणताही असो, आपल्याला व्यक्तिशः पटो अथवा ना पटो, आपण सर्व निर्णयांना पुरेपूर पाठिंबा दिला पाहिजे. शासनाचा निर्णय योग्य की अयोग्य हे स्वतःच्या मतानुसार किंवा स्वतःचे निकष लावून न ठरवता, शासन या संबंधात जे जे निर्णय घेईल ते सर्व निर्णय योग्यच आहेत, असे समजून आपण आपले वर्तन सहकार्याचे व अनुमोदनाचे ठेवले पाहिजे. ही काळाची गरज आहे. या प्रयत्नात जात, धर्म, पंथ, पक्ष असे कुठलेही भेदाभेद करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. याच पायरीवर करोनाला थोपवणे जितके सोपे आहे, तितके सोपे पुढील पायऱ्यांवर नसणार आहे, इतके ध्यानी घेतलेच पाहिजे.

करोना म्हणजे अस्मानी किंवा सुलतानी संकट नसून संबंध मानवजातीवरील अरिष्ट असल्याने सर्वांनी संकुचित वृत्तीतून बाहेर येऊन व्यापकपणे विचार केला पाहिजे, इतके खरे तर कोणत्याही माणसाला कळते पण धर्म आणि पक्ष यांचा मानवी मनावर इतका भारी पगडा असतो की मती कुंठित होऊन आयुष्याच्या रेशीमवाटा कधी काटेरीवाटांमध्ये रूपांतरित झाल्या हे ज्याचे त्यालाही कळत नाही. धार्मिक मतभेदांना काही वैचारिक अधिष्ठान तरी असते पण पक्षीय राजकारण म्हणजे निव्वळ उलट्या काळजाचा खेळ झाला आहे. राजकारणाच्या पोरखेळात सत्त्व आणि तत्त्व यांचे महत्त्व कधीचेच हद्दपार झाले आहे. राम्याने गोम्याला चिम्या म्हटले की लगेच निम्या गोम्याला तिम्या म्हणणार. मतेमतांतराच्या गोंडस नावाखाली परस्परांच्या उलट व विरोधाभासी बोलणे यालाच राजकीय विचारधारा म्हणतात, इतक्या खालच्या पातळीवर राजकारण घसरले आहे.

असणेच आज माझे,
नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने
अस्तित्व दान केले

करोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भातही माणसांमध्ये एकवाक्यता येत नसेल, संधी मिळेल तेथे गलिच्छ राजकारण घुसवून नुसताच कांगावा केला जात असेल तर आपण करोनाला आक्रमणाचे निमंत्रण देऊन त्याच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरूण मानवजातीशी फितुरी करून करोनाला आपलेच अस्तित्व आपल्याच हाताने दान करत आहोत, असे भाकीत वर्तवायला ज्ञान, विज्ञान, अध्यात्म अथवा ज्योतिषीशास्त्राची गरजच पडणार नाही.

- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ११ - दि. ०४ एप्रिल, २०२० - "अस्तित्व दान करायचे नसते!"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं