Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Dec 19, 2017

Nov 21, 2017

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.

साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.

या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

या संमेलनात "आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण", "स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?", "शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, "सावध! ऐका पुढल्या हाका", अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.
संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-to-host-4th-shetkari-sahitya-sammelan/articleshow/61691919.cms

Jul 7, 2017

संपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण?

संपादकीय : अंगारमळा - वर्ष १, अंक २ : मार्च २०१७

खरा शेती साहित्यिक कोण?

शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर धरल्याची अनुभूती असणे नक्कीच महत्त्वाचे असले तरी अनिवार्य नाही. एखाद्याच्या नावाने सात-बारा असला किंवा तो प्रत्यक्षात शेतीत राबत असला म्हणजे तो शेती आणि शेतकर्‍यांचा हितचिंतकच असतो, असेही समजण्याचे कारण नाही. इथे स्वार्थ आणि परमार्थाचे व्दंद उभे राहते. शेतीची बाजू घेऊन लढायचे असेल तर निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कटिबद्धता महत्त्वाची असते. स्वत: शेतीवर राबून शेतीवर उपजीविका असणार्‍याला शेतकरी म्हणता येईल; नव्हे तोच खराखुरा शेतकरी. पण शेतकरी असला म्हणजे तो समग्र शेतीच्या भल्यासाठी वैश्विकतेच्या भावनेतून सद्भावना बाळगून असतोच, शेतीचे प्रश्न सुटून समग्र शेतकर्‍यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे जीवन खेचून आणणारे व्यवस्था परिवर्तन व्हावे असा व्यापक विचार करत असतोच, असा गैरसमज करून घेण्याचेही कारण नाही. शेती कसणे हा त्याचा व्यवसाय आहे, कदाचित अन्य कोणतेच पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध नसल्याने नाईलाजाने उपजीविकेचे साधन म्हणून शेती कसत राहणे व मरता येत नाही म्हणून जगत राहणे अथवा जगण्याच्या सर्व वाटा समाप्त झाल्या तर स्वत:चे जीवन संपवण्यास सिद्ध होणे, हीच एकंदरीत शेतकर्‍याची जीवनशैली झाली आहे, असेही म्हणता येईल. 
मात्र शेतीची बाजू मांडायची असेल तर शेतकरी असणे किंवा नसणे फारसे महत्त्वाचे नाही. मागील ३० वर्षाचा इतिहास तपासला तर नेमके हेच आढळून येते. ज्यांच्याकडे सातपिढ्यापासून शेती नव्हती, शेतीच्या उत्पन्नावर उपजीविका अवलंबून नव्हती, शेतकर्‍यांच्या पोटी जन्मही घेतला नव्हता तरी त्यांनी "शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडावा" म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते, अनेकांनी स्वत:च्या आयुष्याची होळी आणि संसाराची राखरांगोळी केली होती, हजारो तुरुंगात गेले होते, हजारोंनी निधड्या छातीवर पोलिसांच्या लाठ्या झेलल्या होत्या. शेकडोंनी बंदुकीच्या गोळ्यांसमोर स्वत:ची छाती आडवी धरली होती. मात्र त्याच वेळी स्वत:ला शेतकरी म्हणवणारे करोडो शेतकरी पुत्र मात्र शेतकरी आंदोलनाशी प्रतारणा करत आपापल्या जातीच्या पुढार्‍यांचे धोतर धूत बसले होते. हा अगदी ताजा इतिहास आहे.
विषय शेतकरी आंदोलनाचा असो किंवा शेती साहित्य चळवळीचा. वास्तव कटु असले तरी ते स्वीकारलेच पाहिजे. शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतला असला किंवा नावाने सात-बारा असला तरी हा निकष लावून कोणत्याच निष्कर्षाप्रत पोचता येत नाही. फक्त सातबारा नावाने असला म्हणजे तो शेतकरी आंदोलक ठरत नाही; तद्वतच शेती साहित्यिकही ठरत नाही. संबंधित व्यक्तीची शेती विषयासोबत असलेली बांधिलकी, शेतीच्या अर्थवादाचा अभ्यास, कटिबद्धता आणि प्रसंगी त्यासाठी सर्वस्व पणाला लावू शकणारी त्यागी वृत्तीच इथे महत्त्वाची; भले मग तो शेतकर्‍याच्या घरात जन्मलेला असो अथवा नसो! लेखणीतून व्यक्त होणारा आशय शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आहे की शेतीचा प्रश्न आणखी किचकट करून शेतीच्या शोषकांना पोषक ठरणारा आहे यावरूनच साहित्यिकाची जातकुळी ठरवली गेली पाहिजे.

- गंगाधर मुटे
   २०/०२/२०१६

************************************************
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
***********************************************
अंगारमळा वार्षिक वर्गणी - रु.१५०/-
वर्गणी ऑनलाईन भरण्यासाठी:
A/c Name - ANGARMALA
A/c No - 0202002100027538
Punjab National Bank Branch - Hinganghat (Wardha)
MICR Code - 442024005 IFSC Code - PUNB0020200


वर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:
अंगारमळा
मु.पो.आर्वी (छोटी)
ता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड - ४४२३०७


स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं