Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Apr 30, 2011

आईये नेता बने.

चला नेता बनुया….!

                 मला कोणी जर “उद्योग-व्यवसाय” कोणता करावा असा प्रश्न विचारला तर मी बिनदिक्कतपणे आमच्यासारखे राजकारणात या असे ठामपणे उत्तर देत असतो.  आणि का देवू नये? राजकारणात घुसून नेता बनण्याएवढा सहज सोपा बिनभांडवली धंदा दुसरा कोणता असेल तर या भारतवर्षातील कोणत्याही मनुष्यप्राण्याने मला सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. कोणी सप्रमाण सिद्ध करून दाखवल्यास मी त्यांची जाहीरपणे वांगेतुला किंवा कांदेतुला करून त्यांचा यथोचित सत्कार करायला केव्हाही तयार आहे.
                मी “राजकारणात या” असा सल्ला देतो त्यामागे ठोस कारणे आहेत. अन्य कोणताही व्यवसाय करायचा म्हटले की भांडवल लागते, कला-कौशल्य लागते, मोक्याच्या ठीकाणी जागा लागते, नोकरी करायची तर तत्सम शिक्षण लागते, डोनेशनसाठी पैसा लागतो.शेती करायची तर जमीनजुमला लागते, कष्ट उपसायची तयारी लागते. वगैरे-वगैरे……..
                 आमच्या व्यवसायात उलट आहे. इथे काय लागते यापेक्षा काय नको हीच यादी फ़ार मोठ्ठी लांबलचक असते. अगदी मारूतीच्या शेपटीपेक्षाही लांब. 
पण आपण मात्र येथे किमान काय लागते फ़क्त याचीच यादी करू.

१)  पाच मीटर खादीचे कापड खरेदी करण्याएवढे एवढे भांडवल पुरेसे ठरते. (ती सुद्धा विकत न घेता अवांतर मार्गाने हडपून मिळविली असेल तर फ़ारच उत्तम.) पण तेवढेही भांडवल नसेल तरी नाउमेद होण्याचे कारण नाही. आजकाल बिनाखादीने सुद्धा हा व्यवसाय करता येतो. फ़क्त यशाचा मार्ग जरा लांब पडतो एवढेच.
२) कातडी किमान गेंड्यासारखी तरी जाड असावी.
३) आंधळ्या भिकार्‍याच्या ताटात एक रुपया टाकल्याचा आभास निर्माण करुन चार आणे टाकून बारा आणे उचलून घेता यायला हवे.
४) प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाता यायला हवे.
५) निगरगट्टपणा असावा.
६) सरड्यासारखे रंग बदलता यायला हवेत.
७) जेथे तेथे आपलेच घोडे दामटता यायला हवे. 
वगैरे वगैरे….

          आता मुख्य प्रश्न राहिला शैक्षणिक पात्रतेचा. 
 शैक्षणिक पात्रता काय असावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो.
मी आणि माझा जिवलग मित्र श्याम, आम्ही दोघेही मॅट्रीकमध्ये असतानाची गोष्ट. पहिल्याच वार्षीक परिक्षेत श्याम मेरिट मध्ये पास झाला आणि पुढील शिक्षणासाठी शहरात निघून गेला.
मी मात्र मराठी हा एकमेव विषय कसाबसा काढू शकलो.पुढे अनेक वर्ष मी आणि मॅट्रीक दोघेही कट्टर जिवलग मित्र बनलो. आम्हाला एकामेकावाचून करमेचना. मग मी चक्क पंचवार्षिक योजना राबविली मॅट्रीक मध्ये. पाच वर्षानी मात्र कसाबसा पास झालो एकदाचा.
                          वडीलांनी माझ्यातल्या गुणवत्तेविषयी निदान करून पुढारी/नेता बनण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले “तू व्यापारी बनेगा ना किसान बनेगा, पुढारी की संतान है तू इस देशका भविष्य बनेगा.”
मला त्यांचा सल्ला आवडला आणि घुसलो एकदाचा राजकारणात. चढत्या क्रमाने घवघवीत यश मिळत गेले. शिक्षणसंस्था काढल्यात, सहकारी कारखाने काढलेत.
                         आता पाच वर्षाच्या काळात माझा मानमरातब खूपच वाढत गेला. आता मला कोणी रावसाहेब म्हणतात, कोणी बापुसाहेब म्हणतात तर कोणी दादासाहेब.
आणि हो मुख्य गोष्ट राहूनच गेली.
                    श्याम आला होता. हातात एम. एससी,बी.एड,पी.एच.डी अशा पदव्यांची पुंगळी घेऊन माझ्या शाळेत नोकरी मागायला.  म्हटले जागा निघेल तेव्हा रितसर अर्ज कर. सध्या शाळेचे बांधकाम सूरू आहे. खुप खर्चिक काम आहे ते. त्या कामाला निधी लागतो. शाळेतील मुले ही देशाचे भविष्य आहेत.त्यांच्यासाठी सुखसोई उपलब्ध करून देणे माझे परमकर्तव्य आहे त्यासाठी निधी लागतोच. त्याविषयी तू माझ्या पी.ए सोबत बोलून घे. काम कसे रितसर, कायदेशीर व्हायला नको का?
आणि
मुलाखतीच्या दिवशी आला होता श्याम इंटरव्ह्यू द्यायला आणि मी होतो इंटरव्ह्यू घ्यायला …….!
.                                                                                                                                     
                                                                           गंगाधर मुटे.
//////////////////////////////////////////////////////////
(लेख काल्पनिकः लेखातील व्यक्तीरेखेशी कुणाची जीवनरेखा जुळतांना दिसली तर तो निव्वळ योगायोग मानावा)

Apr 29, 2011

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी

२९मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी
             ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.
               मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.
                    भाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.

                       शुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोच वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर,हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश्रुत होतात.ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.
                         याउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत.प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,
                          विदर्भात मुख्यत्वे वर्‍हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्‍हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.
उदा :- टोंगळा,घोटा,वज,हिडगा,गंज,गुंडी,कोपर,भेद्रं,चारं,टेंबरं,धान,आंबिल,सुतना,मनिला,खकाणा,भोकणा,
लमचा,इच्चक,चेंगड,सांडशी,बुहारा,पिलांटू,बंबाड,लल्लाऱ्या,माहुरा,बोथर,टालगी,जित्रुब,पहार,बाज,
जुप्न,सुदा,नावकुल,नावनाव,बंदा,सप्पा,सिद्दा,अध्धर,दाल्ला,ऐनक,बेकुब,मेकुड,आव,कवटा,खाती,
कंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत.

टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.
असे नविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि सर्वांना कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.

                 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.
गंगाधर मुटे

Apr 28, 2011

शल्य एका कवीचे

शल्य एका कवीचे


तो कवी! शब्दप्रभू, अद्भुत प्रतिभाधनी
ओघवती, रसाळ, सोज्वळ त्याची काव्यवाणी......!

कैक संग्रह छापून त्याने, खपविले रातोरात
रसिक समग्र, काव्यात त्याच्या, चिंब-चिंब न्हात
आवेशाने करी वाचन, उधळीत काव्यफुले
हेलाविती तनू-मने, वृद्ध, तरुण, सानुले
शासनाने केला त्याचा, सत्कार शालपांघरी
समीक्षक म्हणती "असा न् होणे" कवी जन्मांतरी
प्रेमरसावर वाहे त्याची, अखंड काव्य सरिता
प्रेमी युगुले रंगून गाती, त्याच्या प्रणयकविता
परी हृदयी शल्य एकची, कायम ही छलना
जीवनी त्याच्या, बनुनी प्रेमिका, ना ये कुणी ललना

"लाख दिलांच्या गळीचा ताईत" मिरवे बिरुदावली
गळात त्याच्या अजुनी नव्हती, एक वारू गावली
सांजसकाळी, ऐन दुपारी, ठाके ना त्याचे चित्त
खाण्यापिण्याशी मन लागेना, एवढ्याची निमित्त
जलात हलते पाय सोडूनी, गावी प्रेम गाणी
कधी येशील गे! रूपमोहिनी मम हृदयराणी
नित्य नेमाने असेच स्वप्न, उघड्या डोळ्या पडे
दचकणे, नेत्र मिचकने, क्षणाक्षणाला घडे
वर्षामागुनी अशीच वर्षे, वर्षे उलटली बारा
अढळ, निश्चल, अचल राहिला, सोसुनी ऊन वारा
प्रेमाराधना, त्याची अर्चना, आसमंता कळाली
प्रेम देवता प्रसन्न झाली, तपश्चर्या फळाली

एक दिवस टक लावूनी, होता क्षितिजाकडे
दूरवर दिसली, एक कामिनी, येत त्याच्याकडे
त्याचे हृदय हलले, अंतरंग फुलले, आली एक झुरझुरी
शहारले अंग, उठले तरंग, रसनाही थरथरली

पाहता अवखळ चंचला, जसा कनक कुंचला, काळीजा रूतला, तीर आरंपार
वाहता खळखळ झरा, जशी भोवळ गरगरा, येतसे तरतरा, झुळूक थंडगार

मग त्याला खात्री पटली
आजवर जी स्वप्नी नटली
मनःचक्षू जीस्तव झटली
ती हीच स्वप्नीची ज्वाला, जिवलग मंदारबाला
हुरूप असा की आला, मग बोलीला गहीवरुनी
मग उठती स्फूर्ती तरंग
त्या अद्भुत प्रतिभेसंग
प्रकटती इंद्रछटांचे रंग
त्याच्या वाणीमधुनी

हे सुंदरी, मदन मंजिरी, कपोल अंजिरी, अधर अंगुरी, अतिसुकुमार
चंचल नयना, मंजुळ मैना, कोकिळ गहिना, प्रीती ऐना, नासिका चिरंदार
रूप साजिरे, मुख गोजिरे, लावण्य लाजिरे, तारुण्य माजिरे, चालणे ठसकेबाज
जशी उमलली,चाफ्याची कली,झुलती रानवली,अल्लड सुकमली,मुसमुसता साज

देवे घडवली, मूर्त मढवली
साजे चढविली, सृष्टीच्या अमोल तारा
स्वप्न साकारा, आले आकारा
दे तू होकारा, होशील का अर्धांगी दारा?
रसभरी मस्केगिरी ऐकुनी, प्रिया ती हसली
जळात हलते पाय सोडूनी, पाषाणी बसली
मग हळूच वदली, अती मंद-मंद मृदुभाषी
जसे रुणझुण पैंजण की, गुणगुणती मधमाशी

तुम्ही घातले साकडे, बोलुनी बोल धाकडे
मनही आल्हादले गडे, पण बोलू कशी खोटी?
माझ्या रूपाचा रंग भिन्न, चिंता घोर चित्त विषण्ण,
कसा व्हावा प्रेमरंग मान्य व्याकुळल्या पोटी?
गडे स्वीकारू कसा? तवं प्रीतीचा वसा
तन्मयतेने असा? फुकाच्या शब्दे
देवे घडविली मला, तसाच घडविला
बापू, माई आणिक भाऊ तान्हुला
सृष्टीचे अघटित चक्र, बापूला आले अंधत्व
आई पांगळी, दिले नियतीने मला पालकत्व
प्रश्न तोलाचा, लाख मोलाचा, उदरभरणाचा
घोट दुधाचा, ओठ तान्ह्याचा, सवाल जीवनमरणाचा
घरी उपाशी बसली सारी, रस्त्याला टक लावूनी
 म्हटले "येते तान्हुल्या, थोडा दूधभात घेवूनी"
पदरी नाही अडकू-खडकू, कसे आणावे दूध कुठूनी?
तुम्ही माझा वेळ दवडला, तुमच्या कविता ऐकवूनी
उत्तम आहे तुमच्या कविता, मनही मस्त रमले
पण पोटातील काहूर माझ्या, जराही न् शमले

'येत्ते मी आत्ता' म्हणुनी, गेली निघूनिया तरतरा
ठेवूनी त्याच्या हातावरती, बेरंगी मोतीतुरा
त्या मोतीतुर्‍याच्या अजुनी नाही, फुटल्या प्रेम लाह्या
शोधीत आहे, तो वेडा बापडा, अजुनी प्रेम छाया

अभय रसिकहो, तुम्हांस दिसली, कुठे ती नयन मोहिनी,
द्यावा निरोप तिजला, तो कविराजा, वाट पाहतोय अजुनी......!

                                                          गंगाधर मुटे

.............................................................................................................
पूर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह
...........................................................................................................

Apr 27, 2011

आईचं छप्पर

.आईचं छप्पर.

कडाक्यात भांडतात
मेघ गडगड करून
भरून येते नभाला
अश्रू ढाळते वरूण ...!


अश्रू बनती गारा
वादळ तांडव करी
गारठल्या हवेसवे
विजेस हिंव भरी ...!


हिंव भरल्या विजेस
ताप चढवी गारा
तिला पांघराया
छप्पर नेतो वारा ...!


छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ....!


पोहतांना पुस्तक वही
सरस्वती भिजते
माती करून जीवाची
चूल उल्हे निजते ....!


गरजत्या पावसात
चोळी झबले न्हाती
पदराखाली लेकरं
कवटाळती छाती ....!


                      गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री)
( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचूल.)
.....................................................
पूर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह

Apr 26, 2011

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!

आदरणीय अण्णा,

                        आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली. शेतकरी संघटनेच्या औरंगाबादला झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत या भ्रष्टाचारमुक्ती अभियानाला सक्रिय पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. आणि सेवाग्राम येथील बापूकुटीसमोर सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत लाक्षणिक उपोषण करून जनलोकपाल विधेयकाला समर्थन देण्याचे भाग्य आम्हालाही लाभले.

                         या विधेयकाच्या समर्थनार्थ संपूर्ण देशातला आमआदमी लढण्यासाठी मैदानात उतरला असला तरी त्यातील किती लोकांना जनलोकपाल विधेयक कितपत कळले हे सांगणे कठीण आहे. पण भ्रष्टाचारावर इलाज व्हायलाच हवा. “काहीच न करण्यापेक्षा, काहीतरी करणे कधीही चांगले” एवढाच विचार करून आणि प्रथमच भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला रोष व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशभरातली एवढी आमजनता रस्त्यावर उतरायला तयार झाली असणार, हे उघड आहे.

                     भ्रष्टाचाराचा महाभयंकर राक्षस आटोक्यात येण्याऐवजी वणव्यासारखा पसरून दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहे. त्यात आमजनता होरपळून निघत आहे. “जगणे मुष्किल, मरणे मुष्किल” अशा दुहेरी कैचीत आमजनता सापडली आहे. या सर्व प्रकारात राजसत्ताच एकतर स्वतः: लिप्त आहे किंवा खुर्ची वाचविण्याच्या मोहापायी हतबल होऊन डोळेझाक करत आहे, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहे, हे आता जनतेला कळायला लागले आहे. त्यामुळे त्यांना संताप व्यक्त करण्यासाठी लढायला एक भक्कम आधार हवा होता; तो त्यांना तुमच्यात दिसला म्हणून आमआदमी नेहमीच्या कोंडलेल्या भिंती ओलांडून बाहेर पडला. त्यासाठी अण्णा तुमचे लक्ष-लक्ष अभिनंदन आणि कोटी-कोटी धन्यवाद!

अभियान नव्हे जनचळवळ

                       भ्रष्टाचार मुक्ती अभियान आता नुसते अभियान राहिले नसून एक जनचळवळ होऊ पाहत आहे. योग्य मुहूर्तावर, योग्यस्थळी या चळवळीची मुहूर्तमेढही रोवली गेली आहे. पण ही चळवळ पुढे न्यायची तर यापुढची वाटचाल नुसती सात्त्विक अथवा भावनिक असून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यासाठी तुम्हाला या लढाईसाठी त्या तोडीचे सवंगडीही शोधावे लागेल. कारण चित्रविचित्र विचारधारा जोपासणारे अनेक विचारवंत एकत्र येणे सोपे असते पण उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत एकत्र टिकणे महाकठीण असते. त्यांच्यात आपसातच फार लवकर पोळा फुटायला लागतो, हा पूर्वानुभव आहे.

                         अण्णा, जेव्हा तुम्हाला नगर जिल्ह्यात सुद्धा पुरेशी प्रसिद्धी मिळाली नव्हती तेव्हापासून म्हणजे १९८५-८६ पासून तुम्हाला मी ओळखतो. तुमच्या कार्यशैलीवर मी तसा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या देशातल्या सबंध गरिबीवर मात करता येईल असा काही कार्यक्रम तुम्ही हाती घ्याल, अशा आशाळभूत नजरेने मी तुमच्याकडे सदैव पाहत आलोय. पण माझी निराशाच झाली हे मी नाकारण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या कार्याचे मोल कमी आहे असे मला म्हणावयाचे नाही आणि जेव्हा देशभरातून तुमच्या कार्याचा गौरव होत असताना माझ्यासारख्या एका फ़ाटक्या माणसाने एक वेगळाच सूर काढणे हेही शोभादायक नाही. पण तुम्ही दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण करून या देशातल्या लक्षावधी खेड्यांमधल्या एकाही माणसाला “दुसरा अण्णा” बनून आपल्या गावाचे “राळेगण सिंदी” करता आलेले नाही. अगदी मला सुद्धा तुमचा कित्ता गिरवून माझ्या गावाचे रुपांतर “राळेगण सिंदी” सारख्या गावामध्ये करता आलेले नाही.

एवढे अण्णा कुठून आणायचे?

                      अण्णा, एकेकाळी क्रिकेटमध्ये भारतात वेगवान गोलंदाज ही दुर्मिळ गोष्ट होती, पण कपिलदेव आले आणि मग त्यांचे अनुकरण करून मोठ्या प्रमाणावर वेगवान गोलंदाज तयार व्हायला लागलेत.
ज्याला “भारतरत्न” म्हणून गौरविण्यात केंद्रसरकारने चालढकल चालविली त्या सचिन तेंडुलकरने तर फलंदाजीची व्याख्याच बदलून टाकली आणि सचिनचे अनुकरण करून गावागावात चेंडू सीमापार तडकवणारे फलंदाज तयार झालेत.

                        सर्व रोगावर रामबाण इलाज म्हणून प्राणायाम आणि योगाभ्यासाचे धडे स्वामी रामदेवबाबांनी दिले आणि अल्पकाळातच जनतेने अनुकरण केले आणि देशभरात हजारो “रामदेवबाबा” तयार झालेत.

                    “शेतकर्‍यांचे मरण हेच सरकारचे धोरण” असून “शेतमालास रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला” त्यासाठी “भीक नको घेऊ घामाचे दाम” असा मंत्र शरद जोशींनी दिला आणि पिढोन्-पिढ्या हतबलपणे जगणारा शेतकरी खडबडून जागा झाला.
शरद जोशींचे अनुकरण करूनच गावागावात लढवय्ये शेतकरी तयार झालेत.

याउलट

                    संपूर्ण देशातील खेड्यांची “राळेगणसिंदी” करायचे म्हटले तर त्यासाठी काही सरकारी ठोस योजना बनत नाही कारण कदाचित ती अव्यवहार्य असेल. मग सरकारी तिजोरीतून गंगाजळी आपापल्या गावापर्यंत खेचून आणायची तर प्रत्येक गावात एकेक अण्णा हजारे जन्मावा लागेल. आणि अशी कल्पना करणेसुद्धा अशास्त्रीय आणि अव्यवहार्य आहे.

                      अण्णा, आपला देश हा नेहमीच चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या मागे धावणारा आणि व्यक्तीपूजक राहिला आहे. त्यामुळे एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या कार्याची व्यावहारिक पातळीवर “चर्चा” करणे एकतर मूर्खपणाचे मानले जाते किंवा निषिद्धतरी मानले जाते. त्यामुळे बाबा आमटे, अभय बंग, अण्णा हजारे किंवा सिंधुताई सपकाळ ही व्यक्तिमत्त्वे उत्तुंग असली तरी यांच्या कार्यामुळे एकंदरीतच समाज रचनेवर, संस्कृतीच्या उत्क्रांतीवर, प्रशासकीय यंत्रणेवर आणि नियोजनकर्त्या निगरगट्ट राज्यकर्त्यांच्या धोरणांवर काहीही प्रभाव पडत नाही, हे सत्य असूनही कोणी स्वीकारायला तयार होत नाही.

जनलोकपाल विधेयक

                          अण्णा, “जनलोकपाल विधेयक” यायलाच हवे. त्यासाठी तुमच्या समर्थनार्थ मी माझ्यापरीने यथाशक्ती प्रयत्न करणारच आहे. पण या विधेयकामुळे काही क्रांतीकारी बदल वगैरे घडून येतील, या भ्रमात मी नाही. मानवाधिकार आयोगाचा फायदा ’कसाब’ला झाला पण या देशातल्या कष्टकरी जनतेला वेठबिगारापेक्षाही लाजिरवाणे जीवन जगावे लागते, शेतकर्‍यांना आयुष्य संपायच्या आतच आपली जीवनयात्रा संपवावी लागते. देवाने दिलेल्या आयुष्यभर जगण्याच्या त्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यास मानवाधिकार आयोग कुचकामी ठरला आहे. माहितीच्या अधिकाराचा उपयोग या देशातल्या सव्वाशेकोटीपैकी फक्त मूठभर लोकांनाच झाला. त्यामुळे तुम्ही ज्या मार्गाने वाटचाल करताहात त्यामुळे आमजनतेचे फार काही भले होईल असे मला वाटत नाही.
                       अण्णा, तुम्ही ४-५ दिवस दिल्लीला उपोषण केले आणि आम जनतेच्या नजरेत “हिरो” झालेत. कदाचित हिच आमजनता तुम्हाला एक दिवस “महात्मा” म्हणून गौरवायला मागेपुढे पाहणार नाही. तुमच्या समर्थनार्थ मैदानात उतरायला लागलीच आहे. त्यामुळे मूठभर लोकांच्या नव्हे या “आमजनतेच्या” आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे काही क्षण निर्माण होण्यासाठी तसे थेट प्रयत्न करणे ही आता तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी नुसती सात्त्विक अथवा भावनिक आंदोलने करून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यानुरूपच पुढील वाटचाल करावी लागेल.

                          अण्णा, तुमचा कायद्यावर प्रचंड विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. पण कायद्याने सगळे प्रश्न सुटत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. कायदा करून उपयोगाचा नाही त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. दुर्दैवाने कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही, नाही तर आहे तेच कायदे खूप आहेत. त्यामुळे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी पुन्हा नवा कायदा किंवा विधेयक हे काही रामबाण औषध ठरू शकत नाही.

                              याउप्परही तुम्हाला कायदा आणि विधेयके आणली म्हणजे प्रश्न चुटकीसरसी सुटतात, असे वाटत असेल तर मग या वर्धेला. हा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावनस्पर्शाने पवित्र झाल्यामुळे फार पूर्वीपासून येथे संपूर्ण जिल्हाभर कायदेशीर दारूबंदी आहे. पण याच जिल्ह्यात पावलापावलावर हवी तेवढी दारू, अगदी ज्या पाहिजे त्या ब्रॅंडमध्ये उपलब्ध आहे आणि गावठीही मुबलक उपलब्ध आहे.

                        नाही खरे वाटत? मग या सेवाग्रामला बापुकुटीसमोर. येताना एकटेच नका येऊ, हजारो कार्यकर्त्यांसह या आणि येथे दारूनेच आंघोळ करा. हजारो लोकांना आंघोळ करायला पुरून उरेल एवढी दारू एकटे सेवाग्राम हे गावच पुरवेल, याची मला खात्री आहे.

कायद्याच्या राज्याचा विजय असो!

                                                                                  गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------
(प्रकाशित : "शेतकरी संघटक" २१ एप्रिल २०११)
-------------------------------------------------------------------

Apr 25, 2011

हताश औदुंबर

हताश औदुंबर


ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे

दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर

                                          गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
("त्या" सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्‍यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)

.....................................................
पूर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह

सजणीचे रूप ...!!

सजणीचे रूप ...!!

रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

                                            गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

Apr 24, 2011

बळीराजाचे ध्यान ....!!

बळीराजाचे ध्यान ....!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                                   गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

Apr 23, 2011

सत्कार समारंभ : आर्वी (छोटी)

सत्कार समारंभ : आर्वी (छोटी)


*****************


दैनिक देशोन्नती :  ता. २२.०४.११

            “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामिण संस्कृतीची जोपासना करायची असेल तर नवयुवकांनी परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने संगणकीय तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. संगणक आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून शेतीचे प्रश्न जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे प्रतिपादन स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप यांनी केले. 
आर्वी (छोटी) येथे संपन्न झालेल्या कवी गंगाधर मुटे यांच्या नागरी सत्कार सोहळा समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. 
            आपल्या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की, ग्रामिण लोकजीवनाच्या सर्वांगिन विकासात कवितेचे फ़ार मोठे योगदान आहे. कवी केशवसुतांनी तुतारी फ़ुंकून समाजाला नव्या ज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले होते. ’’जुने जाऊ द्या मरनालागूनी, जाळुनी पुरूनी अथवा टाका” असे सांगत एका ठीकाणी कुजत बसू नका, खांद्यास खांदा भिडवून नव्या आधुनिकतेची कास धरा, असे सांगितले होते.
            स्टार माझा टीव्ही द्वारा आयोजित जागतिक स्तरावरील ब्लॉगमाझा स्पर्धेत कवी गंगाधर मुटे यांच्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार आणि मी मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाकडून “वांगे अमर रहे” या लेखाला पारितोषक मिळाल्याबद्दल स्थानिक बळीराजा युवा बचत गटाच्या वतीने त्यांचा माजी खासदार मा. सुरेशराव वाघमारे यांचे हस्ते शाल व श्रीफ़ळ देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. 
           या सत्कार समारंभाला प्रसिध्द वर्‍हाडी झटकाकार रमेश ठाकरे, जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले, जि.प. सदस्य कुंदाताई कातोरे, रमेश धारकर, डॉ. इसनकर, मधुसुदन हरणे प्रामुख्याने उपस्थित होते.
           सभेचे संचालन दत्ता राऊत यांनी तर पद्माकर शहारे यांनी आभार प्रदर्शन केले.
           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष लाखे, प्रविण पोहाणे, बालाजी लाखे, अनंता लाखे, विनोद जयपुरकर, हनुमान शेंडे, चंद्रशेखर नरड, विठ्ठल वरभे, रवि जयपुरकर, जयवंत फ़ुलकर, नेमिचंद खोडे यांनी विशेष प्रयत्न केले.
*****************
दैनिक तरूण भारत :  ता. २५.०४.११



माय मराठीचे श्लोक...!!

माय मराठीचे श्लोक...!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             - गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
....................................................................

श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.

ऐकण्यासाठी क्लिक करा.

------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
गायक - विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक - प्रविण खापरे
हार्मोनियम - सुरेश सायवाने

Apr 22, 2011

गगनावरी तिरंगा ....!!






गगनावरी तिरंगा ....!!

गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

                                       गंगाधर मुटे
..........................................................
(वृत्त : आनंदकंद)   पुर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह  
..........................................................

मा. प्रमोद देव यांनी या गीताला अतिशय उत्तम चाल दिली.
ऐका तर.....

*     *     *

Apr 21, 2011

श्रीगणेशा..!!

श्रीगणेशा..!!


नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा

शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा

तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा

तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा

                                         गंगाधर मुटे
.........................................................................
(वृत्त – मात्रावृत्त)   पुर्वप्रकाशित : रानमेवा काव्यसंग्रह  
.........................................................................

Apr 9, 2011

बापूकुटीसमोर विजयी मेळावा

               समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले होते.

                 केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही  बापूकुटीसमोर  शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.

"भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सेवाग्राम सत्याग्रह 

सेवाग्राम सत्याग्रह

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं