Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Feb 29, 2020

या हृदयीचे त्या हृदयी - भाग ६

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ६
या हृदयीचे त्या हृदयी

सांप्रतकाळात जन्माला येणारा मनुष्यजीव जन्माला येतानाच विज्ञान आणि तंत्रज्ञान सोबत घेऊन जन्माला येतो. पूर्वजन्म व संचिताचे संस्कार त्याचेवर असतात किंवा नाही, हे सांगणे अवघड आहे. परंतु गर्भात जीव पडल्यापासून त्याचेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचे संस्कार व्हायला सुरू होतात. जन्मसुद्धा तंत्रज्ञानाच्या आधारानेच होतो व पालनपोषणात सुद्धा तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा असतो.

वयाच्या कोणत्याच टप्प्यात तंत्रज्ञानाची गरज नाही, असेही नसते. तंत्रज्ञान हीच मनुष्यजातीची अपरिहार्य गरज झाली असल्याने त्यापासून अलिप्त ठेवले कुणालाही अशक्य असते. पण तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा, हे ठरवणे मात्र अत्यंत आवश्यक असते. बाब कोणतीही असो, त्याविषयीचा अतिरेकीपणा आणि गैरवापर हाच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे शांतचित्ताने चिकित्सक विचार करून गंभीरतेने तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक ठरते.

आजच्या काळात उपलब्ध असलेले संगणकीय व आंतरजालीय (इंटरनेट) तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असल्याने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुतूहलमिश्रित असणे स्वाभाविक आहे. त्यातूनच उपयुक्ततेच्या गणितीय हिशेबाने त्याचा वापर करताना भावनात्मक दृष्टीचा विसर पडत असावा. माणूस म्हणजे यंत्रमानव नसून भावनेच्या अविष्कारात रममाण असणारा सजीव आहे, याकडेही दुर्लक्ष होत असावे. हे सर्व लिहिण्याचे कारण की, प्रसंग कोणताही असो, सोशल माध्यमांच्या सहजसुलभ वापरामुळे शुभेच्छा व सदिच्छा देण्याचे उधाणच आलेले आहे. वर्षभर सतत येणारे सण, जागतिक दिवस, महापुरुषांपासून ते किरकोळ पुढाऱ्यांपर्यंतची पुण्यतिथी-जयंती, कुणाचा जन्मदिवस तर कुणाचा वाढदिवस, कुणाचे बारसे तर कुणाचे लग्न वगैरे वगैरे. इतके सर्व कमी पडते म्हणून की काय, त्याही पुढे जाऊन लग्नाचा वाढदिवसदेखील साजरा करण्याची संधी साधण्याची संधी दवडली जात नाही. या सर्व प्रसंगी परस्परांनाच नव्हे तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध नाही अशांनाही शुभेच्छा व सदिच्छा देण्याची सध्या इतकी रेलचेल झाली आहे की ती रेलचेल वैताग येण्याच्या पातळीवर पोचली आहे.

नवतंत्रज्ञानाच्या सहजसुलभतेमुळे एक जीताजागता मनुष्य दुसऱ्या जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा व सदिच्छा देत असेल तर अशी रेलचेल एकवेळ दुर्लक्षित करता येईल; पण जर जीत्याजागत्या मनुष्याऐवजी एखादे निर्जीव यंत्रच जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा द्यायला लागले तर काय करायचे? आता वेगवेगळे सॉफ्टवेअर बाजारात मिळतात. आपल्या संग्रही जितके ईमेल आणि मोबाइल नंबर असतील, त्या सर्वांना त्यांच्या जन्मदिवशी अमुक अमुक वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे संदेश रवाना करायचे, अशी सॉफ्टवेअरना एकदा कार्यक्रम प्रणाली दिली की ते सॉफ्टवेअर न चुकता ज्याचा जन्मदिवस असेल त्याला शुभेच्छासंदेश पाठवत राहते. बँका, विमा कंपनीसहित अन्य कंपन्या, प्रतिष्ठाने, संस्था वगैरे हीच प्रणाली वापरत असते. म्हणजे आपल्याला ज्या शुभेच्छा दिल्यात त्या कुण्या व्यक्तीने नव्हे तर निर्जीव यंत्राने दिलेल्या असतात. आपला वाढदिवस आहे हे त्या यंत्राच्या मालकाच्या ध्यानीमनीही नसते. एकदा इतके उघड झाले तर शुभेच्छांनी आनंद होण्याऐवजी मनाची स्थिती उद्वेगाकडे झुकण्याची शक्यता असते.

अनेक पुढारी, पक्ष वगैरे तर नोकरांकडे किंवा एजंटकडे हे काम सोपवतात. म्हणजे एखाद्या नेत्याकडून आलेल्या शुभेच्छा या त्या नेत्याकडून नव्हे तर त्याच्या नोकरांकडून आलेल्या असतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याऐवजी त्याच्या मालकाला चार मते जास्तीची मिळावीत म्हणून जर एखादे यंत्र किंवा नोकर परस्पर आपल्याला शुभेच्छा देत असतील, तर अशा प्रकाराला व्यापार-व्यवहाराचे स्वरूप येऊन मानवतेच्या परिभाषेचीच पायमल्ली होते. त्यांच्याकडे अमाप पैसा असेल, शुभेच्छा पाठवायला नोकर-चाकर असतील, पण सामान्य माणसाला भावना असते आणि तेच त्याचे सर्वस्व असते. जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे निव्वळ व्यवहारी स्वार्थच साधला जात असेल तर हा माणसाने माणसाचा घेतलेला दुरुपयोगच ठरतो.

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नको

एका हृदयाने दुसऱ्या हृदयाला शुभेच्छा द्यायच्या असतात. या हृदयीचे त्या हृदयी असे प्रत्यक्ष शक्य नसेल तर पत्र, फोन, फेसबुक, व्हॉट्‌सअॅप, ईमेल वगैरे माध्यमांचा वापर करून दिल्या जाऊ शकतात, पण संदेश पाठवणारा व्यक्ती जिताजागता मनुष्य असला पाहिजे. हृदयाचे काम जर यंत्र करायला लागले, तर उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचे रूपांतर निर्जीव यंत्रात कधी होईल ते सांगता येत नाही.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ६ - दि. २९ फेब्रुवारी, २०२० - "या हृदयीचे त्या हृदयी"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Feb 22, 2020

...तर विचार प्रवाही होतात - भाग ५

"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ५
...तर विचार प्रवाही होतात

सर्व प्राणिमात्रांचा विचार करता केवळ मनुष्यामध्येच विचार करण्याचा अंगीभूत गूण आहे. विचार करणे हे जर मनुष्यप्राण्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असेल तर प्रत्येक मनुष्य आपापल्या कुवतीनुसार विचार करतच असतो, ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. माणसाचा चेहरा केवळ काही इंच परिघाच्या आकाराचा असूनही कोट्यवधी जनतेमध्ये परस्परभिन्न असू शकतो आणि स्वतःचे वेगळेपण राखून असतो तर अमर्याद आणि सीमांचे बंधन नसलेला विचार कोट्यवधी जनतेचा एकसारखा कसा असू शकेल? त्यातूनच "जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती" असतात तसेच "जितक्या व्यक्ती तितके विचार" हे समीकरण आपोआपच तयार होते.

प्रत्येक मनुष्याचा चेहरा, आवाज, चालणे, बोलणे इतरांपेक्षा वेगळे असते. जसा मनुष्य चेहऱ्यावरून ओळखता येतो तसेच त्याच्या बोलण्यावरून व चालण्यावरूनही ओळखता येतो. निसर्गाची विविधताच इतक्या विविध अंगाने, रंगाने व ढंगाने नटलेली आहे की या विविधतेचे कोणत्याही एका सूत्रात वर्गीकरण करणे अवघडच नव्हे तर अशक्यप्राय आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्ती हा अनन्यसाधारण असतो, असे मान्य करावेच लागते.

मनुष्याच्या काळजातील अंतरंग सुद्धा परस्परभिन्न असतात. विचार आणि विचार प्रकटीकरणाची ढबही आगळीवेगळी असते. लेखनशैली बघून त्या लेखाचा लेखक कोण असेल हे अभ्यासू वाचक सहज ओळखू शकतो. एखादी कविता वाचल्यावर ती कविता कोणत्या कवीची असेल हे जाणकार रसिक ओळखू शकतो. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा चेहरा किंवा चेहऱ्यावरील भाव बदलून जशी चेहऱ्याची ओळख लपवता येत नाही तसेच अंतरंग सुद्धा लपवता येत नाहीत. जोपर्यंत मनुष्य अबोल असतो तोपर्यंत ठीक पण एकदा बोलायला लागला की त्याच्या मनात काय दडले आहे ते उघड व्हायला लागते. विचार व्यक्तिसापेक्ष असल्याने अभिव्यक्ती सुद्धा व्यक्तिसापेक्षच असते. सुरुवातीला परस्परभिन्न विचार आपसात मेळ खात नसेल तर सर्व विचारांनी एकत्र बसून भेळ खाल्ली तर काही मुद्द्यांवर एकमत होऊन वैचारिक मेळ साधला जाऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करून परस्पर विचारांचा आदर केल्यास वैचारिक समन्वय साधने अजिबात अवघड नसते.

कोणत्याच व्यक्तीचे अंगभूत विचार कधीच बदलत नसतात पण संस्कार, प्रबोधन अथवा तत्सम मार्गाने विचारांची दिशा बदलता येते. विचाराने स्वभाव घडवता येतो. पण त्याहीपेक्षा सभोवतालच्या परिस्थितीचाच सर्वात जास्त प्रभाव विचारधारेवर पडत असतो. परिस्थितीनुसार न वागल्यास जीवन जगणेच कठीण होत असल्याने परिस्थितीशी सर्वांना जुळवून घ्यावेच लागते आणि जगण्याच्या जीवनशैलीनुसार विचार कळत-नकळत आपोआप बदलत जातात. कधीकधी आधीच व्यक्तिसापेक्ष असलेला विचार परिस्थिनुसार आणखीनच कडवे स्वरूप धारण करतो. त्यातूनच जहाल विचारांना खतपाणी मिळून विचार एकांगी होत जातात. ''मी म्हणतो तेच सत्य" इथपर्यंत ठीक असते, त्याला विचारांचा ठामपणा किंवा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असे गोंडस नाव देऊन दुर्लक्ष करता येईल पण ''मी म्हणतो तेच सत्य बाकी म्हणतात ते सर्व चुकीचे" या अतिरेकी पातळीवर जेव्हा विचार पोचतात तेव्हा त्या विचाराची जागा विचाराऐवजी हेकेखोरपणाने घेतलेली असते. एकदा का हेकेखोरपणा विचारात आला तर ती व्यक्ती स्वतःही शांतचित्ताने झोपू शकत नाही आणि इतरांनाही शांतचित्ताने झोपू देत नाही. अशा व्यक्तींची डोकेदुखी झेंडूबामने थांबत नाही आणि झोपेसाठी झोपेच्या गोळ्याही उपयोगी पडत नाही. विचार प्रवाही असल्याने परिवर्तनशील असतात. त्यामुळे चर्चा करून विचारांचे आदान-प्रदान केल्यास विचार अधिकाधिक प्रवाही व प्रगल्भ होण्यास मदत होते. चर्चेने आपण बाळगत असलेले विचार पारखता येतात, संवादाच्या पातळीवर तपासता येतात.

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्या-घेतल्याने मती शुद्ध होते

विचार हेच समाज प्रबोधनाचे साधन आणि वैचारिक उत्क्रांतीची रेशीमवाट असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असल्याने कोणताही विचार सरसकटपणे सर्वांना मान्य होऊ शकत नाही. एखादा विचार एकाला योग्य वाटेल तर तोच विचार दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतो. अमान्य असलेल्या विचारांना विचारानेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. विचाराची लढाई विचारानेच व प्रबोधनाची लढाई प्रबोधनानेच लढली पाहिजे. विचार स्वच्छ व स्पष्ट असतील तर चिडचिड न होता डोके शांत आणि शाबूत राहण्याची शक्यता आपोआपच बळावत जाते.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ५ - दि. २२ फेब्रुवारी, २०२० - " ...तर विचार प्रवाही होतात"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Feb 15, 2020

माणसाचा नव्हे साधनांचा विकास - भाग ४

"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ४
माणसाचा नव्हे साधनांचा विकास

         शारीरिक, मानसिक थकवा घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, असा नुकताच शासनाने निर्णय घेतला. पण दिवसभर टेबलाच्या आसऱ्याने खुर्चीवर बसून इकडल्या फाइल तिकडे हालविणाऱ्या (कामचुकार?) लोकांना थकवा येतो, ही संकल्पना सर्वसाधारणपणे शारीरिक कामे करणाऱ्यांना अजिबात मान्य होऊ शकत नसल्याने विषय चेष्टेचा ठरतो कारण सुखासीन जीवन हे शारीरिक दुर्बलतेचे कारण असते हेच जवळजवळ सर्वांना अमान्य असते.

         महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण करणे अशा तऱ्हेचा विचार सुद्धा अधूनमधून उचल खात असतो पण सबलीकरण, सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? याचे उत्तर कुणाकडेच नसते. सर्वसाधारणपणे सर्व सोयी-सुविधा पुरवल्या की सक्षमीकरण होते असा काहीसा तर्क त्यामागे असतो. सोयी-सुविधांनी शारीरिक सक्षमीकरण, सबलीकरण होण्याऐवजी उलट खच्चीकरणच होत असते, याचे भान कुणालाच नसते.

         मानवी उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचा प्रचंड वेगवान गतीने प्रगती आणि विकास झाला, असा एक सार्वत्रिक समज आहे पण माणसाने खरंच प्रगती किंवा विकास केला काय? याचा आढावा घेण्याची कुणीच तसदी घेऊ इच्छित नाही. जर आढावा घेतला तर जे निष्कर्ष निघतात ते अगदीच उलट निघतात. आदिमानव अवस्थेपासून तर सद्य अवस्थेपर्यंत मानवाची प्रगती होण्याऐवजी केवळ अधोगतीच झालेली आहे. काळाच्या ओघात दिवसेंदिवस माणसाची उंची कमी होत गेली, शरीरयष्टीचा घेर कमी होत गेला, वारा, ऊन, पाऊस, थंडी आणि नैसर्गिक बदलाशी जुळवून घेण्याची प्रतिकारशक्तीही कमी होत गेली हे ऐतिहासिक सत्य आहे. बौद्धिक विकास म्हणावा तर तसेही काही दिसत नाही. प्रगल्भता, विवेक, तारतम्य, कल्पनाशक्ती या पातळीवरही मनुष्याने प्रगती केली अशा काहीही पाऊलखुणा आढळत नाहीत. पौराणिक काळात राम, रावण, बिभीषण, लक्ष्मण होते तीच स्थिती आजही कायम आहे. माणसातला रावण मेला नाही आणि रामही जागा झालेला नाही. मानवी वृत्तीचे त्या वेळेस जे प्रमाण असेल तेच प्रमाण आजही कायमचे कायमच आहे. चोर-लुटेरे-डाकू-चरित्रहीन काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत. सभ्य-सज्जन-शीलवान-चरित्रवान काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत.

         माणसाचा विकास, प्रगती वगैरे काहीही झालेली नाही. केवळ मानवी अवस्था बदलली. वास्तुशिल्प, शिल्पकला, हस्तकला आणि वाङ्मय या क्षेत्रातील पूर्व कामगिरी बघून तर आज अचंबित होऊन चमत्कारिक वाटायला लागते. शारीरिक, आत्मिक अथवा बौद्धिक विकास वगैरे काहीही झालेला नाही. जो विकास झाला तो मनुष्यजातीचा विकास नसून केवळ साधनांचा, तंत्र आणि यंत्राचा विकास आहे. साधने जसजशी विकसित होत गेली तसतशी मानवी अवस्था बदलत गेली. समाजव्यवस्था सुद्धा कधीही निर्दोष नव्हती. ती सदैव एका सदोष अवस्थेकडून दुसऱ्या सदोष अवस्थेकडे सरकत राहिली. प्रगत तंत्र आणि साधनांच्या विकासामुळे मनुष्याचे ऊन, वारा, पाऊस, थंडी, वादळ, वातावरणातील बदल यापासून कृत्रिम संरक्षण झाले, जगणे आरामी-हरामी झाले, कष्टाची कामे सुसह्य आणि सुलभ झाली पण याच प्रगतीमुळे मनुष्याचा निसर्गाशी संपर्क तुटल्याने नैसर्गिक प्रतिकारक्षमता आणि सहनशीलता कमी झाली.

         सर्व साधनसामुग्रीचा लाभ घेत घेत ऐषोआरामात जीवन कंठण्याच्या शैलीमध्ये प्रसूतीच्या वेळी सिझरिंगचे प्रमाण वाढत असताना नैसर्गिक अवस्थेतील समाजशैली मध्ये मात्र अजूनही तशी वेळ ओढवलेली नाही. माझी एक कष्टकरी रक्ताची नातेवाईक गरोदर असूनही एकटीच शेतात कामाला गेली होती. अकस्मात प्रसूती कळा सुरू झाल्याने तिथेच बाळंत झाली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचेच बाळंतपण उरकले. लेकरू ओट्यात घेतले आणि एकटीच शेतातून दोन किलोमीटर अंतरावरील गावातल्या घरी स्वतः चालत चालत आली. आता मायलेकी दोघेही धडधाकट आहेत. ज्यांनी बालपणापासून सायकल, बस अथवा कोणत्याही साधनांचा वापर केला नाही ती माणसे वयाच्या नव्वद-पंच्याण्णवव्या वर्षी सुद्धा चार-पाच किलोमीटर अंतर सहज पायी चालू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या सभोवताली दिसतात.

शोधात सावलीच्या असा घात झाला
की दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

         निसर्गापासून गरजेपेक्षा जास्त विलगीकरण, अंतर राखले आणि सोयीसुविधांचा अतिरेक झाला तर माणसाचे जगणे सुसह्य होण्याऐवजी असह्य होऊन निसर्गानेच निर्माण करून ठेवलेल्या आयुष्याच्या रेशीमवाटा हळूहळू काटेरी वाटेत रूपांतरित व्हायला लागतात.

- गंगाधर मुटे आर्वीकर
=========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ४ - दि. १५ फेब्रुवारी, २०२० - माणसाचा नव्हे साधनांचा विकास

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

carona

Feb 8, 2020

मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा - भाग ३

"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ३
मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा

अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा एकदाच्या पूर्ण झाल्या की नंतरच माणसाचं खरंखुरं माणूस म्हणून आयुष्य सुरू होतं. सर्व सजीव प्राण्यासमोरचा प्राथमिक आणि मूलभूत प्रश्न स्वसंरक्षणाचा असतो, त्यानंतरच उदरभरणाची पायरी सुरु होते. मनुष्य आणिि त्याचे पाळीव प्राणी सोडले तर आजही स्वसंरक्षण हाच मुख्य प्रश्न अन्य प्राणिमात्रांच्या समोर कायमच आहे. त्यामुळेच स्वाभाविकपणे सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वसंरक्षणासाठी बचाव आणि आक्रमण हे दोन विशेष गुण आपोआपच विकसित झालेले आहेत.

गुणवैशिष्ट्यामध्ये मनुष्य हा सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळा नसल्याने त्याच्यामध्ये सुद्धा बचाव आणि आक्रमण हे दोन्ही गूण निसर्गतःच विकसित झालेले आहे आणि इथेच नेमकी मानवतेची घाऊकपणे सदैव कुचंबणा होत आहे. माणसाचे नैसर्गिक शत्रू उदाहरणार्थ हिंस्त्र पशूपक्षी, वन्यप्राणी वगैरेपासून (वन्यप्राणी माणसाचे शत्रू नसून मित्र आहेत अशा दृष्टिकोनातून या मुद्याचा विचार करू नये. ज्याअर्थी मनुष्य हिंस्त्र पशूपक्षांना भितो आणि जीवाला धोका आहे असे तो स्वतः समजतो, त्या अर्थी शत्रू आहे असे गृहीत धरावे) माणसाच्या जीविताला अजिबात धोका उरलेला नाही. त्यामुळे माणसाच्या नैसर्गिक शत्रू सोबत लढाई करणे, त्यांच्यावर आक्रमण करणे ही संधी आता माणसाला उपलब्ध नाही. नैसर्गिक रित्या मिळालेली आक्रमणाची कला व्यक्त करण्यासाठी माणसाला शत्रू उरला नसल्याने त्याचा दुष्परिणाम असा झाला की माणूस आता माणसावरच आक्रमण करायला लागला. येथे एक उदाहरण नमूद करावेसे वाटते की, एकमेकाशी आपसात लढणारी प्राणिजात म्हणून कुत्री ही जात मान्यता पावलेली आहे पण जेव्हा त्यांच्यावर जर कुण्या अन्य प्राण्याने आक्रमण केले तर अशा स्थितीत सर्व कुत्री एकवटतात, एकजीव होतात आणि शत्रूशी लढतात. पण शत्रू नसेल तर मग मात्र सर्व कुत्री आपसातच भांडतात.

मनुष्यजातीचे गणितही त्यापेक्षा फार वेगळे नाही. माणसाच्या स्वभावात बचाव आणि आक्रमण ही दोन्ही कौशल्ये निसर्गदत्त आलेली आहेत. भूतकाळात झालेल्या लढाया, युद्ध यामागे माणसाचा आक्रमणकारी स्वभावच कारणीभूत आहे. भांडणतंटे सुद्धा आक्रमण व बचावाचे सौम्य स्वरूपच आहे. शाब्दिक आक्रमणाच्या पातळीवर बघितले तर तुरळक अपवाद सोडले तर प्रत्येक मनुष्य भांडखोर असतो. भांडण्यासाठी मनुष्य नवनवी कारणे शोधत राहतो. शत्रूशी तर भांडतोच पण शत्रू नसेल तर मग तो शेवटी मित्रासोबत तरी भांडणतंटा करून आपली हौस पूर्ण करून घेतो. बायकासुद्धा बायकांशी भांडतात. त्यांना सार्वजनिक नळावर किंवा पाणवठ्यावर भांडायची संधी उपलब्ध नसेल तर त्या निदान नवऱ्याशी तरी निष्कारण भांडून आपली हौस पूर्ण करून घेतात. पण त्यातही गंमत अशी आहे की आपण कुणालाही "तुम्ही भांडखोर आहात का?" असा प्रश्न विचारल्यास उत्तर नकारार्थीच येते. पण हे सत्य नाही. मनुष्यातील हेच दुर्गुण प्रामुख्याने संतांनी, समाजसुधारकांनी आणि महापुरुषांनी ओळखले होते म्हणून त्यांनी माणसाच्या तमोगुणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, शाळा, विद्यापीठे वगैरे स्थापन केलीत. संतांनी भजने लिहून, प्रवचने करून माणुसकीची शिकवण देण्याचा प्रयत्न केला. पण सुधारक बदलत गेले पण माणूस काही सुधारला नाही. परिणामतः माणसामध्ये माणसाचे कमी आणि प्राणिमात्रांचेच गूण जास्त आढळतात.

अरे माणूस माणूस, जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने, रोज पेटवितो चुल्हा

कोल्ह्यासारखी लबाडी, सरड्यासारखी गरजेनुसार हवा तसा रंग बदलण्याची वृत्ती, बगळ्यासारखा ढोंगीपणा, सापाच्या विषासारखी विखारी भाषा, गाढवासारखा अविचारीपणा, माकडासारख्या कोलांटउड्या वगैरे माणसाला हमखास अंगवळणी पडलेले असते. काही केल्या अंगवळणी पडत नाही ती एकच भाषा म्हणजे मानवतेची भाषा. पण त्यातही गंमत अशी आहे की, जे निसर्गदत्त मिळते ते शिकावे लागत नाही व शिकवावेही लागत नाही कारण ती मूळ मानवी प्रवृत्ती असते. मानवी मूळ प्रवृत्ती अमानुष असते. माणसाला माणसासारखे जगायचे असेल तर मूळ मानवी प्रवृत्तीवर ताबा मिळवून मानवतेचा ध्यास धरणे, हीच मानवतेच्या कल्याणाची रेशीमवाट आहे; मानवतेच्या कल्याणासाठी दुसरी वाट उपलब्ध नाही.

- गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ३ - दि. ८ फेब्रुवारी, २०२० - मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

Feb 1, 2020

सुखासीन आयुष्याचा राजमार्ग - भाग २


"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग २
सुखासीन आयुष्याचा राजमार्ग
एकंदरीतच सजीव प्राण्यांचा विचार केला तर केवळ मनुष्यजात हीच एकमेव अशी प्राणीजात आहे की ती चराचर सृष्टीतील अन्य प्राणिमात्रापेक्षा अत्यंत शारीरिक दुर्बल अशी प्राणिजात आहे. स्वसंरक्षणासाठी मनुष्याकडे कोणतेही शारीरिक सामर्थ्य नाही. त्याला वाघासारखा तीक्ष्ण नखे असणारा पंजा नाही, रेड्यासारखे शिंगे नाहीत, हत्तीसारखे दात नाहीत, हरणासारखी पळण्याची गती नाही, पक्षासारखे हवेत उडता येत नाही, माकडासारखे झाडावर चढता येत नाही आणि उंदरासारखे बिळात लपताही येत नाही. त्याला स्वसामर्थ्याने स्वतःच्या अवयवांच्या बळावर इतरांवर आक्रमण करता येत नाही, इतकेच नव्हे तर स्वतःचे रक्षण देखील करता येत नाही. जंगली श्वापदे जाऊ द्या; साध्या मुंगीपासून, मधमाशीपासून किंवा उंदरा-मांजरापासून देखील त्याला स्वतःचा बचाव करणे अवघड आहे. तरीही अत्यंत दुर्बल अशा मनुष्यप्राण्याने संबंध प्राणिमात्रावर साम्राज्य प्रस्थापित केले कारण इतर शक्तिशाली प्राण्यांकडे नसलेली विचार करण्याची एकमेव अद्भुतशक्ती मनुष्याकडे आहे आणि तिचाच वापर मनुष्यजातीने आपल्या उत्क्रांतीसाठी करून घेतला. विचारशक्तीच्या बळावर मनुष्याने साधनांची, आयुधांची निर्मिती केली आणि त्याचा उपयोग स्वसंरक्षणासोबतच इतरांवर आक्रमण करण्यासाठी करून समग्र प्राणी जगतावर स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित केले. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा इतिहास हा त्याच्या साधनांच्या निर्मिती व विकासाच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे

शारीरिक दुर्बल असल्यानेच स्वसंरक्षणासाठी मनुष्याला मेंदूचा उपयोग करणे भाग पडले. त्यातूनच त्याला साधने निर्माण करण्याची कला अवगत झाली. जो सर्वात जास्त शारीरिक दुर्बल, कमजोर अथवा हीन असतो त्यालाच वेगवान क्रांतिकारी उत्क्रांतीची गरज भासते आणि ज्याची सतत उत्क्रांती सुरू असते तोच बदलत्या स्थितीत बदलत्या काळात खंबीरपणे टिकून राहतो. भूतलावरील डायनासोरसारखे अनेक शक्तिशाली प्राणीजात लोप पावत असताना माणसाने मात्र स्वतःची मानवजात केवळ टिकवूनच ठेवली नाही तर अधिकाधिक उत्क्रांत करत नेली. हत्यार सादृश्य साधनांची निर्मिती करून स्वसंरक्षणाचा परिघ प्रशस्त करणे हा त्याचा साधन निर्मितीचा पहिला टप्पा होता. प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी वस्त्र आणि निवारा ह्या दोन्ही बाबीचे महत्त्व केवळ स्वसंरक्षणापुरतेच मर्यादित होते. पण कालांतराने त्याच्या स्वसंरक्षणाचे प्रश्न सुटत जाऊन निर्धोक पातळीवर पोहोचला लागल्याने त्याची विचार करण्याची पद्धत स्वसंरक्षणावरून अन्य बाबीवर केंद्रित व्हायला लागली. संरक्षणासाठी निर्माण केलेली साधने त्याला आपोआपच शिकारीसाठी उपयोगी पडून त्याचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी सुद्धा व्हायला लागला.

अन्न, वस्त्र व निवाऱ्याचे प्रश्न सहज सुटून आयुष्यात किंचितशी स्थिरता आल्यानंतर त्याच्या डोक्यात सुखासीन आयुष्याची कल्पना घर करत गेलेली असावी. पण याच सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेने मनुष्यजातीची जितकी हानी केली तितकी हानी अन्य कोणत्याही संकल्पनेने खचितच केली नसेल. रानटी अवस्थेपासून तर एकविसाव्या शतकापर्यंतचा मनुष्यप्राण्याचा स्वभाव बघितला तर मनुष्यप्राणी कधी एकलपणे तर कधी समूहाने सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेच्या सभोवतीच पिंगा घालण्यात आपली सर्व शक्ती खर्ची घालत असल्याचे अधोरेखित होते. स्वतःचे व स्वतःच्या समूहाचे सुखासीन आयुष्य अधिकाधिक निर्धोक करण्यासाठीच एखादी अमेरिका एखाद्या इराकला बेचिराख करून टाकते. सुखासीन आयुष्याची प्रेरणाच दोन टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध, दोन समूहांमध्ये दंगल, दोन पक्षांमध्ये सत्तेची लढाई किंवा दोन देशांमध्ये विनाशकारी विध्वंसक रक्तपात घडवून आणत असते. अण्वस्त्रांच्या वापराने मनुष्यजातीचे अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते इतके माहीत असून सुद्धा शंभर वेळा पृथ्वी निर्मनुष्य करू शकेल इतक्या अण्वस्त्रांची निर्मिती स्वतः मनुष्यप्राणी करून ठेवत असतो.
माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली किंवा नाही हा मुद्दा बाजूला ठेवला तरी मनुष्यजातीच्या विचारशैलीमध्ये मर्कटचेष्टा हा स्थायीभाव असतो. ह्या मर्कटचेष्टापायीच मनुष्यप्राणी सुखासीन आयुष्याच्या शोधात सदैव भटकत असतो आणि नव्याने नवनवी संकटे स्वतःवर ओढवून घेत असतो. मनुष्य कधी नराचा नारायण, कधी नारायणाचा नर, तर कधी नराचा वानर होत राहतो. आधी युद्ध मग बुद्ध, पुन्हा युद्ध पुन्हा बुद्ध. हीच वारंवारिता त्याच त्याच क्रमाने वारंवार दृग्गोचर होत राहते. हे असे दृष्टचक्र सुद्धा सृष्टिचक्रासारखे अव्याहतपणे सुरू राहते.

धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

राग, लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध यावर नियंत्रण मिळवून प्रेम, शांती, अहिंसा आणि परस्पर सद्भाव हीच खरीखुरी आयुष्याची रेशमी पाऊलवाट आहे आणि एकमेव रेशमी राजमार्ग सुद्धा हाच आहे. अगदी निःसंशयपणे!

- गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग २ - दि. १ फेब्रुवारी, २०२० - सुखासीन आयुष्याचा राजमार्ग

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं