Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

May 15, 2020

फेसायदान

फेसायदान

आता फेसबुकात्मके देवे । ना वाग्यज्ञे वैतागावे ।
तोषोनि पोस्टीस द्यावे । फेसायदान हे ॥१॥

जे अनेकांप्रती जळे । कळे तरी ते ना वळे ।
तया परस्परांचे लळे । लागावेजी ॥२॥

आयड्यांचे घमेंड जावो । कंपूबाजी अस्त पावो ।
जो जे वांछील तैसा लाहो । प्रतिसादो ॥३॥

तू खाजवी पाठ माझी । मीही खाजवितो मग तुझी
ऐसी सांठगाठ खुजी । जावो लयासी ॥४॥

काव्यत्त्वही जे रसहीन । ललीतही जे तथ्यहीन ।
तरीही रसिक सज्जन । सोयरे होतु ॥५॥

कुणी नर असो वा नारी । नसो तयी लेखणी विखारी ।
अनवरत फबुवरी । नांदो संवादू ॥६॥

चला साहित्यिकांचे गावी । तया ऐकवू कविता काही ।
काव्य आमुचे “रटाळ” नाही । समजाविण्याशी ॥७॥

काही पोस्टी अर्थाविन । हीन भासती सर्वांगिन
जैसी कुणी अलंकारहीन । सुवासिनी ती ॥८॥

काव्य म्हंजे नोय रद्दी । नाकळे जया न चित्तशुद्धी
तयांस द्यावी शुद्धबुद्धी । रे फेसबुक्या ॥९॥

किंबहुना सर्वज्ञानी । ऐसा कोणी स्वत:स मानी ।
पाजीजो तयास पाणी । बुक्कीत एक्या ॥१०॥

आणिक वंगाळ लेखणे । अश्लिल शब्द विशेषणे
योजिल अश्लाघ्य दुषणे । पुच्छ तया फ़ुटावेजी ॥११॥

येथं म्हणे श्रीफेसबुकाय । हा होईल दान अभय।
येणे वरे बुकेफेसाय । नाचते झाले ।।१२।।

- गंगाधर मुटे 'अभय'
============

Apr 25, 2020

आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १४
आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती

           माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी अकस्मात गंभीर स्थिती उद्भवली होती. तातडीने गावापासून दूर ५० किमी अंतरावरील सेवाग्राम रुग्णालयात पेशंट दाखल करावा लागला. प्रसूती झाली, बाळ जन्माला आले पण सारे प्रकरणच एकदम गंभीर असल्याने मलाही तिथेच तब्बल १४ दिवस ठाण मांडून बसावे लागले. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर घरी आलो आणि कपडे बदलले. गेली १५ दिवस खुंटीला लटकून असलेल्या शर्टच्या खिशात सहज हात घातल्यावर हाताला एक कागद लागला. कागद बाहेर काढला आणि मजकुरावर नजर पडताच मी निदान पंचवीसेक फूट तरी उंच उडालेलो असेल किंवा ११०० किलोवॅटचा जबरी झटका तरी मला नक्कीच बसला असेल कारण त्याक्षणी माझी अवस्थाच तशी झाली होती. अचानक तोंडातून मोठा आवाज निघाल्याने काय झाले म्हणून बघायला घरातील सर्व मंडळी माझ्या भोवताल गोळा झाली होती. असे काय असेल त्या कागदात?

           अचानक आठवण झाली की मी १५ दिवसापूर्वी स्वतःच आजारी होतो. आठवडा संपूनही आजारातून आराम मिळण्याऐवजी सतत वाढतच चालल्याने मला तालुक्यातील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. मला कावीळ झाल्याचे निदान होऊन औषधोपचार करण्यात आले होते. त्याचाच तो कागद होता म्हणजे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन होते. औषधोपचार आटोपून मी घरी येऊन रुग्णशय्येवर पहुडलो होतो आणि तास-दोन तासातच वरील गंभीर प्रसंग उद्भवला होता. त्यात माझा कावीळ कुठे चोरीस गेला, तो कुणी पळवला हे मला अजूनही कळलेले नाही. मीच नव्हे माझे पूर्ण कुटुंबीय सुद्धा मी आजारी असल्याचे विसरून गेले. मी पुढील चौदा दिवस इतका निरोगी होतो की त्या कावीळची आठवण सुद्धा कधीच झाली नाही. कावीळसारखा जीवघेणा आणि क्लिष्ट स्वरूपाचा रोग अचानक असा कसा गायब झाला असेल? कुणी गायब केला असेल? दैवी शक्तीने की आत्मशक्तीच्या स्वसामर्थ्याने?

           मी सामाजिक कार्यात असल्याने अनेकदा गावातील व्यक्ती आजारी पडून अतिगंभीर अवस्थेत पोचला की त्याला १६ किमी अंतरावरील रुग्णालयात घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर येते. आम्ही जेव्हा रुग्ण घरातून वाहनापर्यंत नेतो तेव्हा त्याला चार-पाच लोकांनी मिळून उचलून न्यावे लागते. दवाखान्याजवळ पोचलो की दोन माणसांनी आधार दिला की रुग्ण हळूहळू चालत डॉक्टरपर्यंत जाऊ शकतो. डॉक्टरने नाडी बघितली, स्टेथोस्कोप लावला आणि सांगितले की जा, अमुक अमुक बेडवर झोपा. तर तोच रुग्ण स्वतःच चालत चालत बेडपर्यंत जातो आणि झोपतो. बहुतांश वेळा थोड्याफार फरकाने असेच घडत असते, हा माझा स्वानुभव आहे. जो रुग्ण अनेक दिवस खाटेवर स्वतःहून उठून बसू शकत नव्हता, उभा होऊ शकत नव्हता तोच रुग्ण डॉक्टरच्या दिशेने निघाल्यावर कसाबसा उठून उभा व्हायला लागतो. डॉक्टरांनी तपासल्याबरोबर स्वतःच्या पायाने चालायला लागतो. काय असतो हा चमत्कार? 

           मी आता डॉक्टरकडे चाललोय म्हणजे आता माझी प्रकृती ठीक होणार, असा आत्मविश्वास निर्माण झाला की आत्मबलही आपोआपच वाढायला लागते. आत्मबल वाढायला लागले की शरीर साथ द्यायला लागते. रोगासोबत शरीरच लढत असते. शरीराची शक्ती क्षीण झाली तर औषधोपचाराने आपण शरीराची लढण्याची शक्ती वाढवत असतो. जर शरीर साथ देत नसेल तर जगातली सर्व औषधे निरुपयोगी आहेत. जर रुग्ण अतिगंभीर अवस्थेत पोचला  आणि शरीराने साथ द्यायला नकार दिला तर अशा प्रसंगी डॉक्टर अजिबात उपचार सुरू करत नाहीत. ते तोपर्यंत थांबतात जोपर्यंत शरीर उपचाराला प्रतिसाद देण्यायोग्य समर्थ होत नाही.

           आजारासोबतच लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आत्मबलाचा उपयोग होतो असे नव्हे तर बोलण्या-चालण्या-वागण्यात देखील जिथे जिथे प्रतिकार करण्याची गरज भासते तिथे तिथे आत्मबलाचा उपयोग होतो. प्रवाहासोबत पोहायलाही आत्मबलाची आवश्यकता असते आणि प्रवाहाच्या विरोधात पोहतानाही आत्मबलाची गरज भासते. शरीराची कितीही दमछाक झाली आणि पंख गळायला आले तरी आत्मबल जर कणखर असेल तर उत्तुंग भरारी घेणे आपल्या आवाक्याबाहेर नसतेच. 

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

           ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, विश्वास, भक्ती, शक्ती, युक्ती, अभ्यास, चिंतन, मनन या सर्व स्रोतांचा उपयोग आत्मभान जागवण्यासाठी होतो. त्यातूनच आयुष्याच्या चतुरस्र रेशीमवाटा समृद्ध होत जातात.  

- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १३ - दि. १८ एप्रिल, २०२० - "आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  रेशीमवाटा

Apr 18, 2020

केवळ जंतूमुळे रोग होतो? : भाग १३

केवळ जंतूमुळे रोग होतो?
"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १३

        अनावश्यकरीत्या कुठलेही डावपेच, कूटनीती, दुजाभाव, हेवा, मत्सर व अहंकार न बाळगता सहज चालत राहणे ही माणसाच्या आयुष्याची सहजसुलभ सुखदायी रेशीमवाट आहे. पण प्रत्येक मनुष्य अनन्यसाधारण असल्याने आपली अनन्यसाधारणता प्रदर्शित करत राहण्याची प्रेरणा त्याला काहीतरी तुफानी आणि आगळेवेगळे करून दाखवण्याच्या मार्गावर नेऊन सोडते. त्यातूनच जितकी मते तितके मतप्रवाह निर्माण तयार होतात. परस्परभिन्न मतप्रवाहामध्ये मग संघर्षाची सुरुवात होते. जिंकण्याच्या इर्षेने त्यात डावपेच, कूटनीती, दुजाभाव, हेवा, मत्सर व अहंकार आदींचा शिरकाव होऊन सहजसुलभ असलेली रेशीमवाट मग क्लिष्ट होऊन जाते आणि यातच पहिला बळी विवेक व तारतम्याचा जातो.

        रोग का होतो? असा जर प्रश्न टाकला तर निसर्गाच्या प्रकोपाने होतो असे उत्तर काही दशकापूर्वी दिले जात होते. कालांतराने विज्ञान प्रगत होत गेले, आधुनिक वैद्यकशास्त्राने क्रांतिकारी संशोधन केल्यामुळे अनेक गुपितं उघड व्हायला लागली. त्यामुळे कालचे उत्तर आज शिळे होऊन रोग जंतूमुळे होतो, या उत्तरावर आपण येऊन स्थिरावलो. स्थिरावत असताना विवेक व तारतम्याचा बळी गेल्याने यापेक्षा दुसरे उत्तर सुद्धा असू शकते, हे मान्य करणे म्हणजे जणू काही विज्ञानाचीच प्रतारणा करून विज्ञानद्रोह करणे, अशा टोकाच्या भूमिकेपर्यंत माणसाची मजल गेली. पण खरेच याला अन्य प्रकारची उत्तरे नसूच शकतात का? याचे उत्तर जर नाही असे एखादा विज्ञाननिष्ठ मनुष्य देत असेल तर ते सुद्धा चुकीचेच आणि विज्ञानाची प्रतारणा करणारे असते कारण विज्ञान केव्हाही, कोणतीही शक्यता कधीही नाकारत नाही.

        एखाद्या रोगाची जबरदस्त साथ येते तेव्हा सर्वच लोक आजाराला बळी पडत नाहीत. अगदी कुटुंबात सुद्धा क्वचितच सर्वांना आजार जडतो. एरवी एक आजारी पडतो आणि उरलेले निरोगी असतात. अगदी जेव्हा आधुनिक वैद्यकीयशास्त्र अजिबात प्रगत नव्हते किंवा आज सर्वोत्तम असलेल्या ऍलोपॅथीचा शोध सुद्धा लागलेला नव्हता तेव्हाही प्लेग, कॉलरा सारख्या महामारीमध्येही शतप्रतिशत जनता मृत्युमुखी पडलेली नाही. एखाद्या रोगाची साथ कितीही भयंकर असू द्या पण ज्याचे लग्न होऊ घातले आहे असे नवरा-नवरी लग्नाच्या दिवशी, लग्न घटिकेच्या वेळी आजारी पडले आणि मग नजीकच्या इस्पितळातील आयसीयू वॉर्ड मध्ये जाऊन लग्न लावावे लागले, असे एकही उदाहरण माझ्या ऐकण्यात नाही. मग नवरा-नवरीला आजारातून सूट का देत असेल हे जंतू? मात्र समारंभ आटोपल्यानंतर साथीचा रोग नसेल तरीही वराकडील-वधूकडील मंडळी थकव्याने आजारी पडतात, हे अनुभवले आहे. ज्याचा अभ्यास चांगला झाला आहे आणि पेपर जर मनासारखे गेले तर असे विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी आजारी पडत नाहीत. अभ्यास जर समाधानकारक झाला नाही किंवा अभ्यास होऊनही जर पेपर मनासारखा सोडवला गेला नाही तर असा विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता मात्र खूपच जास्त असते. मग हे जंतू असा भेदभाव का बरे करत असतील?

        करोनाने एक बरे केले की, विषाणूच्या मारक क्षमतेपेक्षा आणि औषधोपचाराच्या तारक क्षमतेपेक्षा माणसाची प्रतिकार शक्ती जास्त महत्वाची असल्याचे अधोरेखित केले. ज्यांची प्रतिकारशक्ती मजबूत आहे त्यांना एकतर करोना संसर्ग होणार नाही. संक्रमण झालेच तर जाणवणार नाही आणि जाणवलेच तरी मनुष्य मरणार नाही, ही शक्यता खूपच जास्त आहे. पण अशी प्रतिकारशक्ती कृत्रिमरीत्या निर्माण करण्याइतपत आधुनिक विज्ञान या क्षणापर्यंत तरी हतबल आहे. याचाच अर्थ असा की आधुनिक विज्ञान सर्वोत्तम असले तरी सर्वस्व नाही. इतके भान येऊन वास्तवाची जाणीव झाली तर माणसाला विज्ञानाविषयीचा फाजील अहंकार सहज गाळून टाकता येतो. असा अनावश्यक अहंकार गळून पडला की नवनवीन रेशीमवाटा धुंडाळण्याच्या क्षमतेला चालना मिळून पर्यायी वाटा गवसण्याचे दरवाजे खुले होऊन जातात. त्यापैकीच एक सहज गावसण्याजोगा मार्ग म्हणजे आत्मबल. त्याविषयी उहापोह पुढील लेखात करू.

बक्कळ करून झाले, इतुके अता करूया
अपुलीच आत्मशक्ती, खंगाळुनी बघूया

        प्रतिकारशक्तीचा संबंध जसा आहाराशी व व्यायामाशी असतो त्यापेक्षा जास्त संबंध आत्मबलाशी असतो. आत्मबलाचा पाया विश्वास व श्रद्धेवर आधारलेला असतो. आत्मबलाशिवाय शारीरिक बल चैतन्यहीन असते. आत्मशक्तीचा स्तर अत्युच्च्य पातळी गाठून असेल तर जंतूच काय जंतूचा बाप देखील अशा व्यक्तीला सहजासहजी खाटेवर लोळवू शकत नाही.
- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १३ - दि. १८ एप्रिल, २०२० - "केवळ जंतूमुळे रोग होतो?"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

  रेशीमवाटा

Apr 11, 2020

पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही - भाग १२

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १२
पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही

       आज रोजी आपण एका विचित्र वळणावर उभे आहोत. तुलनाच करायची झाली तर आपण आदिमानवापेक्षाही आदिमानव झालेलो आहोत, असे म्हणण्याइतपत वेळ आली आहे. साधन निर्मितेची कला अवगत होण्यापूर्वीचा आदिमानव जसा गुहेत दडून बसायचा तसेच आज आपण आपापल्या गुहेत बसलेलो आहोत. आपल्याकडे एसी, फ्रीज, कूलर वगैरे असूनही त्याचा यथेच्छ उपभोग घेण्यास असमर्थ आहोत. अनेक वर्षातील अथक संशोधनानंतर निर्माण केलेली यांत्रिक साधने आपल्यापासून काही अंतरावर एकाजागी स्थितप्रज्ञासारखी स्थिर झालेली आहेत. एका करोना नावाच्या सूक्ष्म विषाणूमुळे आपली जीवनशैली एकाच दिवसात पार बदलून गेली आहे. ऐहिक आणि आत्मिक सुखविलासासाठी मनुष्याने तंत्र आणि यंत्राच्या बळावर ज्या रेशीमवाटा तयार केल्या होत्या त्याच वाटा आज  निष्प्रभ झाल्या सारख्या दिसत आहेत. 

एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले

        करोना संकट अभूतपूर्व असले तरी मनुष्य प्राण्यासाठी अगदीच नवखे नाही. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यावर अनेक संकटे आलेली आहेत. अनेकदा होत्याचे नव्हते झालेले आहे. पण तरीही मनुष्यप्राणी टिकून आहे, टिकूनच राहणार आहे कारण गरजेनुसार स्वतःला बदलण्याची लवचिकता व त्यानुसार आयुष्याच्या नव्या रेशीमवाटा नव्याने निर्माण करण्याची अद्भुतशक्ती मनुष्यजातीकडे आहे. सध्या लॉकडाऊन मुळे जिथला मनुष्य तिथेच थांबला आहे. ज्यांचे स्वगृही परतण्याचे सर्व यांत्रिक मार्ग बंद झाले होते त्यांनी ३००-४०० किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन आपले उद्दिष्ट गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही या काळात दाखवली आहे. हेच मनुष्याचे असली स्वरूप आहे ज्या आधाराने अगम्य परिस्थितीवर मात करत उत्क्रांती सदैव दोन पावले पुढेच गेलेली आहे.

      जेव्हा जेव्हा देशावर राष्ट्रीय संकट कोसळते तेव्हा तेव्हा त्याचे चटके सरसकट सर्वांनाच बसत असतात. कदाचित कुणाला जास्त तर कदाचित कुणाला तुलनेने कमी. पण या चटक्यातून कुणीच सुटत नाही. अनेक लोकांची जीवनशैली अशी असते की त्याला जेवण आणि चहा सुद्धा बाहेर जाऊन घ्यावा लागतो. त्याच्या स्वतःच्या खोलीमध्ये स्वयंपाकाची भांडी तर सोडा पण साधी पिण्याचे पाणी साठवण्यासाठी बादली सुद्धा नसते. आज या दीर्घ लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात त्यांची काय स्थिती असेल, याची कल्पना करणे सुद्धा अंगाचा थरकाप उडवणारे ठरत आहे. अनेकांना दिवसभरातून एकदा तरी जेवण कसे मिळवावे असा प्रश्न पडला असेल. दारात यंत्र सामुग्री व खिशात पैसा असूनही अनेक लोक पुरते हतबल झालेले असतील पण अशा बिकट स्थितीशी सुद्धा  मनुष्य लीलया जुळवून घेतो, हेच तर मनुष्याचे खरेखुरे बलस्थान आहे.

        लॉकडाऊन नसलेल्या काळातील एक मजेदार अनुभव सांगतो. गोष्ट आहे याच वर्षीच्या होळीच्या दिवशीची. मला मीटिंगसाठी औरंगाबादला जायचे होते. रात्रीच्या बसने जायचे, सकाळी पोचायचे आणि रात्रीच्या बसने परतायचे असा साधासुधा बेत असल्याने सोबत छोटीशी बॅग घेतली ज्यात शाल, ब्लॅंकेट, चादर वगैरे काहीही नव्हते. मीटिंग आटोपून रात्री ज्या बसने परतायचे होते, ती बस धूळवड असल्याने ऐनवेळी रद्द झाली होती. शेवटी रात्री १० वाजताची एक नॉन एसी बस मिळाली. बसमध्ये बसलो आणि अचानक थंडी वाजायला सुरुवात झाली. मलेरियाचा ताप येतो तशी कडाक्याची थंडी व हुडहुडी भरायला लागली. तातडीने डॉक्टर किंवा निदान पॅरासिटोमॉलच्या गोळ्या आणि एका ब्लॅंकेटची आवश्यकता होती. पण रंगपंचमीचा दिवस असल्याने पूर्ण मार्केटच बंद असल्याने काहीही उपलब्ध झाले नाही.

        खिशात पैसे आहेत. देशात डॉक्टर भरपूर आहेत. औषधांनी व ब्लॅंकेटनी दुकाने खचाखच भरलेली आहे, असे अर्थशास्त्र व व्यापारशास्त्र कितीही सांगत असले व ते शंभरटक्के खरेही असले तरी त्याही पेक्षा प्रसंगानुरूप व गरजेनुसार काय उपलब्ध होऊ शकते, हेच सर्वात जास्त महत्त्वाचे असते. तंत्रविज्ञान कितीही प्रगत असले आणि गाठीशी भरपूर संपत्ती असली की सर्वच प्रश्न चुटकीसरशी सुटतात, असेही नसते.

शेवटी काय तर ना मिळाली गोळी, ना मिळाली शाल, ना मिळाले ब्लॅंकेट, ना मिळाली चादर. थंडी आणि हुडहुडी पासून बचावासाठी रात्रभर २००० व ५०० च्या नोटाच पांघरून प्रवास करावा लागला.

- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १२ - दि. ११ एप्रिल, २०२० - "पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

  रेशीमवाटा

Apr 4, 2020

अस्तित्व दान करायचे नसते! - भाग ११

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ११
अस्तित्व दान करायचे नसते!

विज्ञानाच्या साहाय्याने गरूडझेप घेत आसमंतात तरंगणाऱ्याचे अचानक क्षणात पंख गळून पडावेत आणि तो धाडकन जमिनीवर आदळावा, अशी काहीशी स्थिती करोना नामक एका सूक्ष्म निर्जीवाने मनुष्यजातीची करून ठेवलेली आहे. आपल्या शत्रूचा निःपात करण्यासाठी रिव्हॉल्वर पासून रणगाड्यापर्यंत आणि मिसाइल पासून अण्वस्त्रापर्यंत माणसाने शस्त्रसज्जता केली पण आता स्वसंरक्षणासाठी जेव्हा प्रत्यक्ष लढायची वेळ आली, तेव्हा सैन्याचा उपयोग शत्रूशी लढण्यासाठी न होता स्वकीयांना घरात डांबण्यासाठी करावा लागत आहे, एका अर्थाने ही अवस्था मनुष्यजातीला भानावर येण्यास भाग पाडणारी आहे.

शत्रू बदलल्याने युद्धाचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे माणसाने आपल्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची नव्याने फेररचना करणे आवश्यक झाले आहे. ज्या करोनाविरुद्ध लढायचे आहे, त्या करोनाला देश, राज्य, धर्म, जात, पंथ, गरीब, श्रीमंत, शोषक, शोषित, दलित, सवर्ण अशा स्वरूपाचे कोणतेही मनुष्यनिर्मित भेदाभेद कळत नाहीत. ज्याच्याशी गाठ पडेल, त्याला गिळंकृत करणे इतकेच करोनाला कळते. करोना हे मनुष्यजातीवरील संकट असल्याने सर्व जगाने एकत्र येऊन करोनाविरुद्धची लढाई लढणे, हीच काळाची गरज आहे. करोनाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत माणसामाणसात कुठलाही भेदाभेद केल्यास आपण करोनाला हरवू शकणार नाहीत, इतके भान जर याक्षणी मनुष्यप्राण्याला आले नाही तर माणसाची अनुवंशीय अहंकाराची नशा उतरवण्याची संधी करोनाला आयतीच चालून येईल, याबद्दल मला तरी तीळमात्र शंका नाही.

प्रत्येकाने एक बाब ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे की, कोणतीही एक व्यक्ती, एक समूह, एक पक्ष, एक संघटना वगैरे करोनावर नियंत्रण मिळवू शकत नसल्याने सरकारच्या नेतृत्वात एकजूटीची सक्त आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे तमाम भारतीय जनता आपापल्या घरात बंदिस्त झाल्याने आता केवळ शासन, प्रशासन आणि मानसेवी डॉक्टरच मैदानात उतरून करोनाशी दोन हात करणार आहेत. आपण घरात बसून काहीच करू शकत नसलो तरी शासन, प्रशासन आणि मानसेवी डॉक्टरांचे मनोबल उंचावण्यासाठी सकारात्मक प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह व पाठबळ नक्कीच वाढवू शकतो. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा निर्णय कसाही असो आणि कोणताही असो, आपल्याला व्यक्तिशः पटो अथवा ना पटो, आपण सर्व निर्णयांना पुरेपूर पाठिंबा दिला पाहिजे. शासनाचा निर्णय योग्य की अयोग्य हे स्वतःच्या मतानुसार किंवा स्वतःचे निकष लावून न ठरवता, शासन या संबंधात जे जे निर्णय घेईल ते सर्व निर्णय योग्यच आहेत, असे समजून आपण आपले वर्तन सहकार्याचे व अनुमोदनाचे ठेवले पाहिजे. ही काळाची गरज आहे. या प्रयत्नात जात, धर्म, पंथ, पक्ष असे कुठलेही भेदाभेद करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. याच पायरीवर करोनाला थोपवणे जितके सोपे आहे, तितके सोपे पुढील पायऱ्यांवर नसणार आहे, इतके ध्यानी घेतलेच पाहिजे.

करोना म्हणजे अस्मानी किंवा सुलतानी संकट नसून संबंध मानवजातीवरील अरिष्ट असल्याने सर्वांनी संकुचित वृत्तीतून बाहेर येऊन व्यापकपणे विचार केला पाहिजे, इतके खरे तर कोणत्याही माणसाला कळते पण धर्म आणि पक्ष यांचा मानवी मनावर इतका भारी पगडा असतो की मती कुंठित होऊन आयुष्याच्या रेशीमवाटा कधी काटेरीवाटांमध्ये रूपांतरित झाल्या हे ज्याचे त्यालाही कळत नाही. धार्मिक मतभेदांना काही वैचारिक अधिष्ठान तरी असते पण पक्षीय राजकारण म्हणजे निव्वळ उलट्या काळजाचा खेळ झाला आहे. राजकारणाच्या पोरखेळात सत्त्व आणि तत्त्व यांचे महत्त्व कधीचेच हद्दपार झाले आहे. राम्याने गोम्याला चिम्या म्हटले की लगेच निम्या गोम्याला तिम्या म्हणणार. मतेमतांतराच्या गोंडस नावाखाली परस्परांच्या उलट व विरोधाभासी बोलणे यालाच राजकीय विचारधारा म्हणतात, इतक्या खालच्या पातळीवर राजकारण घसरले आहे.

असणेच आज माझे,
नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने
अस्तित्व दान केले

करोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भातही माणसांमध्ये एकवाक्यता येत नसेल, संधी मिळेल तेथे गलिच्छ राजकारण घुसवून नुसताच कांगावा केला जात असेल तर आपण करोनाला आक्रमणाचे निमंत्रण देऊन त्याच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरूण मानवजातीशी फितुरी करून करोनाला आपलेच अस्तित्व आपल्याच हाताने दान करत आहोत, असे भाकीत वर्तवायला ज्ञान, विज्ञान, अध्यात्म अथवा ज्योतिषीशास्त्राची गरजच पडणार नाही.

- गंगाधर मुटे, आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ११ - दि. ०४ एप्रिल, २०२० - "अस्तित्व दान करायचे नसते!"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Mar 28, 2020

कोरोनावर प्रभावी प्राणायाम? - भाग १०

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग १०
कोरोनावर प्रभावी प्राणायाम?

वैद्यकशास्त्र कुठलेही असो, अद्ययावत-आधुनिक असो किंवा परंपरागत चालत आलेले पण पुढे अविकसित राहिलेले वैद्यकशास्त्र असो; हृदयाच्या गतीला वैद्यकीयशास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दर मिनिटाला हृदयाची किती ठोके पडतात यावरून माणसाच्या आजाराचे निदान करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही वैद्यकीयशास्त्रात कायमच आहे आणि भविष्यातही कायमच राहणार आहे कारण हृदयाची गती जितकी नीट असेल तितकेच आरोग्य सुदृढ असते.

हृदयगती बिघडल्यानंतर आरोग्य बिघडते कि आरोग्य बिघडल्यानंतर हृदयगती बिघडते, या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे व्यक्तिसापेक्ष असू शकते पण आरोग्याचा संबंध हृदयगतीशी आहे, हे मात्र शाश्वत असल्याचे स्वीकारायलाच हवे पण सहसा असे होत नाही. मनुष्य कोणताही असो तुरळक प्रसंग सोडले तर डोक्याने विचार करतच नाही. कधी हृदयाने तर कधी खिशाने विचार करतो. सारासार विचार करण्याऐवजी कोणतीही एकच बाजू निवडून त्याच बाजूचे पराकोटीचे समर्थन करत राहणे क्षम्य समजता येईल पण आपलीच बाजू सर्वश्रेष्ठ ठरवण्याच्या नादात अन्य बाजू चुकीच्या आहेत असा जेव्हा समज दृढ होतो त्याच बिदूवर मनुष्य आपला विवेक आणि तारतम्य गमावून बसतो. अशा स्थितीत मनाची केवळ काही कवाडे उघडी राहून उरलेली अन्य कवाडे बंद होत जाऊन ज्ञानग्रहणाच्या रेशीमवाटा अवरुद्ध होऊन जातात.

योग आणि प्राणायाम हे अतिप्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे. या विषयातील मी तज्ज्ञ नसल्याने कोरोनासारख्या विषाणूच्या संसर्गावर प्राणायामाचा कितपत प्रभाव पडेल, हे अधिकारवाणीने सांगू शकत नसलो तरी एक अभ्यास अथवा चिंतन म्हणून यासंबंधातील माझे विचार व अनुभव प्रस्तुत करत आहे. मी दहावर्षापासून प्राणायाम करत असलो तरी नियमित करत नाही. वर्षातून ३६५ दिवसांपैकी अंदाजे ६०-६५ दिवस करत असतो. प्राणायामाला मी वेगवेगळ्या कसोट्यांवर १० वर्षांपासून पारखत आलेलो आहे. श्वसनासंबंधित व्याधी असेल तर प्राणायाम रामबाण इलाज आहे, असा मला प्रदीर्घ अनुभव आला आहे.

मला वर्षातून ३ वेळा सर्दी-पडसा-खोकला होतो. अगदी बालपणासूनच नियमितपणे होतो. त्याचे वेळापत्रकही ठरले आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो तेव्हा, पावसाळा संपून हिवाळा सुरु होतो तेव्हा आणि हिवाळा संपून उन्हाळा सुरु होतो तेव्हा. पण या वेळापत्रकात मजेशीर बाब अशी आहे कि मला आधी सर्दी होते व नंतर ४-६ दिवसांनी ऋतुबदल होतो. म्हणजे असे कि मला जेव्हा सर्दी होते तेव्हा उन्हाळा सुरु असतो. वातावरणात काहीही बदल झालेला नसतो. पण नंतर ४-६ दिवसांनी वातावरण बदलने सुरु होते, आकाशात ढग जमायला लागतात, पाऊस पडायला लागतो व तापमान कमी व्हायला लागते. बरं ही सर्दी इंग्रजी कॅलेंडर किंवा मराठी नक्षत्रानुसार होत नाही. ऋतूचे आगमन मागे पुढे झाले तर माझी सर्दी सुद्धा त्यानुसार मागे पुढे होत असते. अनुमान असाही काढता येईल कि माझ्या सर्दीवरून संभाव्य वातावरण बदलाच्या तारखा ठरवता येतात. हे ज्याअर्थी मी जाहीरपणे मांडतो आहे त्याअर्थी; कुणी मला आव्हान देऊन सिद्ध करून दाखव म्हटले तर माझी तयारी आहे, हे उघड आहे. मी प्राणायाम करायला लागलो आणि माझी सर्दी-पडसा-खोकला गायब झाला. अजिबात होतच नाही. पण प्राणायाम थांबवले कि सुरु होतो हा मागील अनेक वर्षाचा अनुभव आहे.

कोरोना संसर्ग झाल्यास श्वास घेताना त्रास होतो. प्राणायाम करताना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे जाणवल्यास कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षण मानता येईल. कोरोनाचे प्राथमिक निदान म्हणून प्राणायाम उपयोगी पडू शकतात. किंवा प्राणायाम केल्यामुळे हृदयाची गती व श्वसनसंस्थाच इतकी मजबुतीने कोरोनाचा प्रतिकार करेल कि, संसर्ग होणारच नाही. शक्यता का नाकारावी?

तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे

पण यातही गंमत अशी आहे कि, योग-प्राणायामाचा अभ्यास आणि संशोधन केवळ साधूसंत करतात. यावर अधिक व्यापकपणे संशोधन होण्याची गरज आहे परंतु सामान्य जनतेच्या आयुष्याच्या रेशीमवाटांवर जागोजागी टोलनाके तयार करणे हेच बुद्धिवंत व विचारवंतांचे जीवितकार्य असल्याने योग-प्राणायाम विकून गडगंज संपत्ती मिळवता येत नसेल तर बहुराष्ट्रीय कंपन्यासहित कोणत्याच देशी-विदेशी संशोधकांना हे नको असते .... नकोच असते!

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १० - दि. २८ मार्च, २०२० - "कोरोनावर प्रभावी प्राणायाम?"

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Mar 21, 2020

करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच! - भाग ९

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ९
करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच!
सध्या जगभर करोना विषाणूने थैमान घातल्याने पूर्ण जग धास्तावलेले आहे. जनमानस दहशतीखाली आलेले आहे. पण मी मात्र ठामपणे सांगू शकतो की, भारत नावाचा देश करोना नावाच्या विषाणूला अजिबात घाबरलेला नाही आणि घाबरणार नाही. भारतातील माणसे मरणाला भीत नाहीत. 'देह नश्वर आणि आत्मा अमर' ही संतांची शिकवण भारतीय जनमानसावर अजूनही प्रचंड प्रभाव टाकून असल्याने भारतीय माणसे मरणाला भीत नाहीत, अशी प्रचिती आपल्याला क्षणोक्षणी येत असते.

रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, सिग्नल तोडू नये, पुरेशी जागा मिळाल्याशिवाय ओव्हरटेक करू नये, वळणदार घाटाच्या रस्त्यातून वाहनाचा वेग कमी करावा, डोक्यात हेल्मेट घालावे इतके साधे नियम पाळण्यासाठीसुद्धा कायदा करून लोकांना दंडात्मक कारवाईची भीती दाखवावी लागते. भारतीय मनुष्य दंडाच्या भीतीने नियम पाळायला तयार होतो, पण मरणाच्या भीतीने तो नियम पाळायला अजिबात तयार नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत पोचते, तेव्हा मरणाच्या भीतीने ती व्यक्ती कधीच कावरीबावरी होत नाही आणि ढसढसा रडतही नाही. अशा क्षणी त्याचे आप्त रडवेले होतात, पण जो मरतो तो मात्र निश्चिंत असतो आणि निश्चिंत मनाने मरणाला सामोरा जातो.

मनुष्य मरणाला घाबरत नाही, पण स्वतःच्या अब्रूला प्रचंड घाबरतो. अब्रू वाचवून आत्मसन्मान जोपासणे त्याचे हेच सर्वस्व आणि आयुष्याचे सार असते. रस्त्याने चालताना पाय घसरून पडला तर तो सर्वात आधी स्वतःची मान ३६० अंशांत फिरवून आपल्याकडे कुणाचे लक्ष तर नाही ना, याचा शोध घेतो. कुठे लागले, पाणी पितोस का, असे लोक त्याला विचारतात, पण पडलेला मनुष्य आपल्याला कुठे काही मार लागला का, हे शोधण्याऐवजी आपल्याला पडताना कुणीकुणी पाहिले, याचा शोध आधी घेत असतो.

मनुष्य मरणाला घाबरत नाही म्हणून रोगालाही घाबरत नाही. परिसर स्वच्छ ठेवा, पाणी उकळून प्या, जेवणाआधी हात स्वच्छ करा, इतकेसुद्धा त्याला जबराईने सांगावे लागते. पण काही रोग मात्र असे आहेत की त्याला तो प्रचंड घाबरतो. उदाहरण म्हणून गजकर्ण, टीबी आणि एड्स या व्याधींची नावे घेता येईल. गजकर्ण, खाज, खरूज झाकून ठेवण्याचा लोकं जीवापाड प्रयत्न करतात. टीबीचा पेशंट 'मला टीबी झाला' हे सांगायला संकोचतो व त्याऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी रोगाचे नाव सांगतो. याउलट हृदयविकार, कॅन्सरचे पेशंट 'मला हृदयविकाराचा त्रास आहे' असे इतक्या सहज आविर्भावात सांगतात की जणू काही त्याला त्याचा प्रचंड अभिमान आहे.

एड्सबद्दल समाजामध्ये इतके समज-गैरसमज पसरवले गेले आहेत की, एचआयव्हीची बाधा केवळ अनैतिक संबंधातूनच होते असा सार्वत्रिक समज रूढ झाला आहे. त्यामुळे समाज संबंधित व्यक्तीकडे संशयित नजरेने बघतो आणि त्याच्या चारित्र्याला संशयाच्या भोवऱ्यात उभे करतो. वस्तुतः एड्सचा संसर्ग होण्याचे अनैतिक संबंध हेच एकमेव कारण अजिबात नाही. याव्यतिरिक्त अनेक कारणे आजही जाणकारांना माहीत आहेत आणि भविष्यात आणखी शेकडो कारणे सापडतील, पण एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी उतावीळपणाच्या जाहिरातबाजीचा एवढा अतिरेक झाला की एचआयव्हीची बाधा केवळ असुरक्षित शरीर संबंधामुळेच होते, असाच सामान्य जनतेमध्ये संदेश गेला.

चारित्र्यसंपन्न व्यक्तीलादेखील चुकीच्या उपचार पद्धतीने किंवा अन्य अनेक कारणामुळे एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो, हे बोललेच गेले नाही. या चुकीच्या जाहिरात पद्धतीचा इतका विपरीत परिणाम समाजावर झाला की, आता एड्स हा शब्दच अश्लील समजून त्या शब्दाचा उच्चारदेखील कुणी खुलेआम न करता लपूनछपून करतात. त्यामुळे आपल्याला असा काही संसर्ग झाला तर आपल्याकडे संशयित नजरेने बघितले जाईल आणि आपण आयुष्यभर मिळवलेला आत्मसन्मान एका झटक्यात धुळीस मिळेल; इतकेच नव्हे तर मरणोपरांतदेखील आपल्याकडे अनादरानेच बघितले जाईल अशा अदृश्य भीतीने लोक धास्तावून आहेत, हे शतप्रतिशत खरे आहे.

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा
मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

दोन दिवस जगावे पण आत्मसन्मान राखूनच जगावे, हीच भारतीयांच्या जीवनशैलीची रेशीमवाट असल्याने 'करोनाने तत्काळ मरण हवे की एड्ससहीत शंभर वर्षांचे दीर्घ आयुष्य हवे' असा जर यमराजाने एखाद्यासमोर पर्याय ठेवून पर्याय निवडायला सांगितला, तर भारतीय मनुष्य एका क्षणाचा विलंब न लावता उत्तरेल. की... 'करोना चालेल पण एचआयव्ही नको रे बाबा!'

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ९ - दि. २१ मार्च, २०२० - "करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच!"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Mar 14, 2020

शिमगा ही आनंदाची पर्वणीच - भाग ८

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ८
शिमगा ही आनंदाची पर्वणीच

कोणताही एक रंग माणसाचे आयुष्य रंगीबिरंगी करू शकत नाही आणि आयुष्य रंगीबिरंगी असल्याखेरीज जगण्यात रंगत येऊ शकत नाही. रंगाचे रंगत्व प्रकाशकिरणांवर अवलंबून असल्याने अंधारात जसे रंगाचे रंग बेरंगी असतात तसेच बेरंगी जीवनही प्रकाशमय असू शकत नाही. इतके प्राथमिक ज्ञान ज्या दिवशी माणसाला झाले असेल त्या दिवसापासून त्याला रंगाचे महत्त्व कळून आले असेल आणि त्या हिशेबाने त्याची पावले पुढे पडत गेली असेल.

परंपरागत रुढी, रीतिरिवाज, चालीरीती आणि उत्सव यांच्याकडे डोळस नजरेने बघितले की मग यामागची शास्त्रीय कारणमीमांसा सहज लक्षात यायला लागते. काळाच्या प्रवाहाच्या ओघात काही रूढी, परंपरा कालबाह्य ठरून जरी कालांतराने जाचक वाटायला लागल्या असतील तरी त्यांच्या निर्मितीमागची प्रेरणा मात्र आनंदाची रेशीमवाट विकसित करणे अशीच असणार हे उघड आहे. भारतीय सण आणि उत्सवांतील विविधता बघितली तर त्यातून ठळकपणे जाणवते की, प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव माणसाला परस्परभिन्न व वेगळा आनंद देऊन जात असतो. या सर्व सणात होळी आणि शिमगा हा सण तर थेट रंग या एका खास विषयाला वाहिलेला सण आहे.

खेळणारे खेळून जितका आनंद मिळवतात तसेच बघणारे बघूनही तितकाच आनंद मिळवत असतात. खेळणाऱ्यांकडे व बघणाऱ्यांकडे वक्रदृष्टीने पाहणारेही काही असतात. असतो तसाही स्वभाव अनेकांचा पण इतरांकडे वक्रदृष्टीने पाहून त्यातून आनंद मिळवण्यात त्यांचे सौख्य सामावलेले असते, हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. खेळण्यापासून चार हात लांब राहून मी इतरांपेक्षा वेगळा आहे, असे भासवून कुणी आनंद मिळवत असेल तर त्याचाही आपण आदरच केला पाहिजे. रासायनिक रंग शरीराला घातक असतात म्हणून नैसर्गिक रंग खेळा असे सल्ले देऊन जागतिक दर्जाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याची भूमिका पार पाडून काही व्यक्ती आनंद मिळवत असतात. जे जे नैसर्गिक असेल ते ते शरीराला घातक नसते, इतके सामान्यविज्ञान कोणी शोधून काढले हे तर सृष्टीच्या निर्मात्यालाही माहीत नसते. काचकुयरी, मिरची अथवा अन्य तत्सम जिन्नस नैसर्गिक असले तरी ते काय शरीराला फारच लाभदायक असतात काय? इतकाही विचार करण्याची सुद्धा त्यांना फुरसत नसते. पण एक मात्र बरे असते की, जसा आनंद ज्ञानात असतो तसाच आनंद अज्ञानातही असतो. त्यामुळे ज्ञान्याला अज्ञानी किंवा अज्ञान्याला ज्ञानी बनवण्याचे निष्कारण अट्टाहास म्हणजे आनंदाचे विरजण घालून निव्वळ डोकेदुखी वाढवून घेणे असते.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीने होळी खेळू नका, असे सल्ले देणारांचे यावर्षी पेवच फुटले होते. पण होळी हा केवळ रंगाची उधळण करून एकमेकांच्या शरीराला चेष्टा-मस्करी करून रंग फासण्याचा सण नसून शाब्दिक थट्टा, मस्करी, चेष्टा, टवाळी करण्याचा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, याचाही सर्वांना विसर पडला गेला. शरीरस्पर्शाने विषाणूचे संक्रमण होईलही पण शाब्दिक खेळाने विषाणू संक्रमण कसे होईल? जनतेच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्यापेक्षा नवे पर्याय उपलब्ध करून देणे जास्त संयुक्तिक नाही का? पण... हा पणच जागोजागी आडवा येतो आणि सुरळीत चाललेला चालता गाडा अनावश्यकरीत्या पंक्चर करून टाकतो.

एकमेकांचा उपमर्द, अपमान, अवमान न करणारी किंवा समाजाला जाचक ठरणार नाही अशी कोणतीही सात्त्विक मस्करी, टवाळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते आणि त्याचेच नाव असते शिमगा. सादर आहे शिमग्याचा एक नमुना.

मामाच्या पोरीच्या नावाने शिमगा

मामाचा गाव, मामीचा गाव
चांदीची पुतळी, सोन्याचा भाव
ही सोन्याची पुतळी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

गुणाच्या पोरीचे फुगले गाल
फुगल्या गालावर सोनेरी बाल
सोनेरी बटांत डनरफचे थर
डनरफच्या थरात उवांचे घर
या उवांवर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

कानाच्या खिडकीत रुपेरी मोर
मोराच्या तुऱ्यावर चंद्राची कोर
चंद्राच्या कोरीला मोत्याचे डूल
मोत्याच्या डुलावर कस्तुरी झूल
या झुलीवर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!

डोळ्याच्या खापनीस पापणीचे दार
पापणीच्या दाराला झेंडूचा हार
झेंडूच्या हाराला तागाचे सूत
तागाच्या सुतावर बसलंय भूत
या भुतावर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

लिप्स्टीकच्या मागे दातांची रांग
दातांच्या रांगेवर विलायची भांग
विलायची भांगेला अफूचा संग
अफूच्या साथीला अभयचे रंग
या रंगावर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ८ - दि. १४ मार्च, २०२० - "शिमगा ही आनंदाची पर्वणीच"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Mar 7, 2020

आल्हाददायी हवी वेशभूषा - भाग ७

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ७
आल्हाददायी हवी वेशभूषा

चंचलता हा मानवी स्वभावाचा अटळ व जन्मजात गुण आहे. अगदी लहानग्या बाळाची नजरदेखील एका खेळण्यावर जास्त काळ स्थिरावू शकत नाही. थोड्या वेळापूर्वी हवीहवीशी वाटणारी वस्तू त्याला थोड्या वेळानंतर नकोनकोशी वाटायला लागते. दुसरे संपले कि तिसरे आणि तिसरे संपले कि चवथे असे दृष्टिभ्रमण अव्याहत सुरू असते. स्वभावातील ही चंचलता ज्ञानेंद्रियांसोबत अवयवांनासुद्धा सतत हालचाल करण्यास प्रेरित करत राहते.

मनुष्य एका जागेवर शांत बसला तरी निर्जीव पुतळ्यासारखा शांत बसू शकत नाही. डोळ्यांच्या मिचमिचण्यासह अवांतर शरीराच्या हालचाली अखंडपणे सुरू राहतात. कुणीकुणी तर बसल्याजागी एक किंवा दोन्ही पाय इतक्या जोरजोराने हलवत राहतात की शेजारच्या व्यक्तीला ते नको-नकोसे होते. मनुष्याच्या अंगात चंचलता इतकी एकजीव झालेली असते की ध्यानधारणा व एकाग्रचित्त करण्यासाठी त्याला काही काळ त्याचा सराव करावा लागतो. मनाची चंचलता माणसाला वेगवेगळे व नवनवे प्रयोग करण्यास बाध्य करते. प्रयोगशील आनंददायी प्रवासातूनच फॅशनचा जन्म होतो. फॅशनच्या नावाखाली धुडगूस घातला जातो, असे अनेकांचे मत असले तरी ते पूर्णसत्य नसते. फॅशनलासुद्धा शास्त्रीय आधाराचा पाया असतो. अशास्त्रीय असेल ते फार काळ टिकत नसते आणि शास्त्रीय आधार असेल तर ते कुणाच्या आडकाठीने रुजायचे थांबत नसते. संस्कृती कितीही थोर असली तरी ती जशीच्या तशी अनंतकाळापर्यंत स्वीकारत राहणे तर केवळ अशक्य असते. भौगोलिक स्थितीनुसार परिस्थिती बदलत असते आणि परिस्थितीनुसार जीवनशैली बदलत असते. परिस्थितीनुसार वेशभूषा करून आल्हाददायी किंवा सुसह्य जीवन जगण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक कल असल्याने संस्कृतीच्या व्याख्याही लवचिक असल्या पाहिजेत.

ज्या भौगोलिक प्रदेशात कडाक्याची थंडी, रणरणते ऊन किंवा भरपूर पर्जन्यवृष्टी असते, तिथे जास्तीतजास्त जाडेभरडे व सर्वांग झाकणारी वेशभूषा आल्हाददायी असते. याउलट समुद्रकिनारी दमट वातावरणात कमीतकमी अंग झाकणारी व हवा खेळती असणारी वेशभूषा आल्हाददायक ठरत असते. पण कमीत कमी कपडे घालणे (विशेषतः स्त्रियांनी) म्हणजे भारतीय प्राचीन संस्कृतीवर हल्ला होतो असे संस्कृतीरक्षकांचे मत असल्याने व तशी समाजमान्यता असल्याने वेशभूषेच्या बाबतीत व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो. पण मग जे एकट्यादुकट्याला शक्य नाही ते सामूहिकपणे 'फॅशन'च्या नावाखाली होत असते. तीच जीवनशैली विकसित होत जाते. एरवी ती फॅशन नसून आवडलेली उपयुक्त सोयीची आनंददायी जीवनशैलीच असते.

फक्त डोळे सोडून उर्वरित चेहरा पूर्णपणे झाकला जाईल असा महिलांनी रुमाल बांधलेला बघून अनेक लोक नाक मुरडतात. यामागे काहीतरी काळंबेरं वर्तन असल्याचे वाटून अनेकांच्या भुवया उंचवायला लागतात. या प्रकाराकडे काही लोक फॅशन म्हणून, तर काही लोक फॅड म्हणून बघतात. वस्तुस्थिती मात्र त्यापेक्षा निराळी असते. प्रखर ऊन किंवा कडाक्याच्या थंडीपासून कोमल त्वचेचे संरक्षण करणे, असा यामागे उद्देश असतो. वेगवान हवा विरुद्ध दिशेने वाहत असेल तर ताशी ६० किलोमीटर वेगाने बाइक चालवताना चालकाला हवेचे असह्य चटके बसतात. हा सर्व बाइकचालकांचा स्वानुभव असतो. पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांची त्वचा कोमल आणि नाजूक असते, हेसुद्धा सर्वमान्य असते. पण इतरांमधले दोष शोधताना माणसाला स्वतःच्या अनुभूतीचाही विसर पडतो. त्यातूनच मग वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी तर्ककुतर्क व संशयाचे भूत माणसाच्या मनात थैमान घालायला सुरुवात होते. ठिकठिकाणी फाटलेली पॅन्ट (भिकाऱ्यासारखी?) व मोठ्या आकाराची जागोजागी छिद्र असलेली शर्ट जर सर्वांगाला खेळती हवा पुरवत असेल तर अशा पोशाखाची चेष्टा होण्याऐवजी समर्थनच केले पाहिजे.

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

हवामानातील बदलाचा जसा मानवी शरीरावर प्रभाव पडतो, अगदी तसाच आर्थिक संपन्नतेचा प्रभावही मानवी शरीरावर पडत असतो. आर्थिक संपन्नतेच्या आलेखानुरूप माणसाची गरमी वाढत जाते, तसतसा कपड्याचा आकार घटत जातो. गरिबीने मानवी शरीराचा गारठा वाढत जात असल्यामुळे अंगावरील कपड्याचा आकारही वाढत जातो. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक व्यक्ती आल्हाददायी जीवन जगण्याच्या रेशीमवाटा धुंडाळतच असतो आणि त्यात सफलही होत असतो.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ७ - दि. ७ मार्च, २०२० - "आल्हाददायी हवी वेशभूषा"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Feb 29, 2020

या हृदयीचे त्या हृदयी - भाग ६

"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ६
या हृदयीचे त्या हृदयी

सांप्रतकाळात जन्माला येणारा मनुष्यजीव जन्माला येतानाच विज्ञान आणि तंत्रज्ञान सोबत घेऊन जन्माला येतो. पूर्वजन्म व संचिताचे संस्कार त्याचेवर असतात किंवा नाही, हे सांगणे अवघड आहे. परंतु गर्भात जीव पडल्यापासून त्याचेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचे संस्कार व्हायला सुरू होतात. जन्मसुद्धा तंत्रज्ञानाच्या आधारानेच होतो व पालनपोषणात सुद्धा तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा असतो.

वयाच्या कोणत्याच टप्प्यात तंत्रज्ञानाची गरज नाही, असेही नसते. तंत्रज्ञान हीच मनुष्यजातीची अपरिहार्य गरज झाली असल्याने त्यापासून अलिप्त ठेवले कुणालाही अशक्य असते. पण तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा, हे ठरवणे मात्र अत्यंत आवश्यक असते. बाब कोणतीही असो, त्याविषयीचा अतिरेकीपणा आणि गैरवापर हाच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे शांतचित्ताने चिकित्सक विचार करून गंभीरतेने तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक ठरते.

आजच्या काळात उपलब्ध असलेले संगणकीय व आंतरजालीय (इंटरनेट) तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असल्याने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुतूहलमिश्रित असणे स्वाभाविक आहे. त्यातूनच उपयुक्ततेच्या गणितीय हिशेबाने त्याचा वापर करताना भावनात्मक दृष्टीचा विसर पडत असावा. माणूस म्हणजे यंत्रमानव नसून भावनेच्या अविष्कारात रममाण असणारा सजीव आहे, याकडेही दुर्लक्ष होत असावे. हे सर्व लिहिण्याचे कारण की, प्रसंग कोणताही असो, सोशल माध्यमांच्या सहजसुलभ वापरामुळे शुभेच्छा व सदिच्छा देण्याचे उधाणच आलेले आहे. वर्षभर सतत येणारे सण, जागतिक दिवस, महापुरुषांपासून ते किरकोळ पुढाऱ्यांपर्यंतची पुण्यतिथी-जयंती, कुणाचा जन्मदिवस तर कुणाचा वाढदिवस, कुणाचे बारसे तर कुणाचे लग्न वगैरे वगैरे. इतके सर्व कमी पडते म्हणून की काय, त्याही पुढे जाऊन लग्नाचा वाढदिवसदेखील साजरा करण्याची संधी साधण्याची संधी दवडली जात नाही. या सर्व प्रसंगी परस्परांनाच नव्हे तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध नाही अशांनाही शुभेच्छा व सदिच्छा देण्याची सध्या इतकी रेलचेल झाली आहे की ती रेलचेल वैताग येण्याच्या पातळीवर पोचली आहे.

नवतंत्रज्ञानाच्या सहजसुलभतेमुळे एक जीताजागता मनुष्य दुसऱ्या जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा व सदिच्छा देत असेल तर अशी रेलचेल एकवेळ दुर्लक्षित करता येईल; पण जर जीत्याजागत्या मनुष्याऐवजी एखादे निर्जीव यंत्रच जीत्याजागत्या मनुष्याला शुभेच्छा द्यायला लागले तर काय करायचे? आता वेगवेगळे सॉफ्टवेअर बाजारात मिळतात. आपल्या संग्रही जितके ईमेल आणि मोबाइल नंबर असतील, त्या सर्वांना त्यांच्या जन्मदिवशी अमुक अमुक वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे संदेश रवाना करायचे, अशी सॉफ्टवेअरना एकदा कार्यक्रम प्रणाली दिली की ते सॉफ्टवेअर न चुकता ज्याचा जन्मदिवस असेल त्याला शुभेच्छासंदेश पाठवत राहते. बँका, विमा कंपनीसहित अन्य कंपन्या, प्रतिष्ठाने, संस्था वगैरे हीच प्रणाली वापरत असते. म्हणजे आपल्याला ज्या शुभेच्छा दिल्यात त्या कुण्या व्यक्तीने नव्हे तर निर्जीव यंत्राने दिलेल्या असतात. आपला वाढदिवस आहे हे त्या यंत्राच्या मालकाच्या ध्यानीमनीही नसते. एकदा इतके उघड झाले तर शुभेच्छांनी आनंद होण्याऐवजी मनाची स्थिती उद्वेगाकडे झुकण्याची शक्यता असते.

अनेक पुढारी, पक्ष वगैरे तर नोकरांकडे किंवा एजंटकडे हे काम सोपवतात. म्हणजे एखाद्या नेत्याकडून आलेल्या शुभेच्छा या त्या नेत्याकडून नव्हे तर त्याच्या नोकरांकडून आलेल्या असतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याऐवजी त्याच्या मालकाला चार मते जास्तीची मिळावीत म्हणून जर एखादे यंत्र किंवा नोकर परस्पर आपल्याला शुभेच्छा देत असतील, तर अशा प्रकाराला व्यापार-व्यवहाराचे स्वरूप येऊन मानवतेच्या परिभाषेचीच पायमल्ली होते. त्यांच्याकडे अमाप पैसा असेल, शुभेच्छा पाठवायला नोकर-चाकर असतील, पण सामान्य माणसाला भावना असते आणि तेच त्याचे सर्वस्व असते. जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे निव्वळ व्यवहारी स्वार्थच साधला जात असेल तर हा माणसाने माणसाचा घेतलेला दुरुपयोगच ठरतो.

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नको

एका हृदयाने दुसऱ्या हृदयाला शुभेच्छा द्यायच्या असतात. या हृदयीचे त्या हृदयी असे प्रत्यक्ष शक्य नसेल तर पत्र, फोन, फेसबुक, व्हॉट्‌सअॅप, ईमेल वगैरे माध्यमांचा वापर करून दिल्या जाऊ शकतात, पण संदेश पाठवणारा व्यक्ती जिताजागता मनुष्य असला पाहिजे. हृदयाचे काम जर यंत्र करायला लागले, तर उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचे रूपांतर निर्जीव यंत्रात कधी होईल ते सांगता येत नाही.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ६ - दि. २९ फेब्रुवारी, २०२० - "या हृदयीचे त्या हृदयी"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

Feb 22, 2020

...तर विचार प्रवाही होतात - भाग ५

"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ५
...तर विचार प्रवाही होतात

सर्व प्राणिमात्रांचा विचार करता केवळ मनुष्यामध्येच विचार करण्याचा अंगीभूत गूण आहे. विचार करणे हे जर मनुष्यप्राण्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असेल तर प्रत्येक मनुष्य आपापल्या कुवतीनुसार विचार करतच असतो, ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. माणसाचा चेहरा केवळ काही इंच परिघाच्या आकाराचा असूनही कोट्यवधी जनतेमध्ये परस्परभिन्न असू शकतो आणि स्वतःचे वेगळेपण राखून असतो तर अमर्याद आणि सीमांचे बंधन नसलेला विचार कोट्यवधी जनतेचा एकसारखा कसा असू शकेल? त्यातूनच "जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती" असतात तसेच "जितक्या व्यक्ती तितके विचार" हे समीकरण आपोआपच तयार होते.

प्रत्येक मनुष्याचा चेहरा, आवाज, चालणे, बोलणे इतरांपेक्षा वेगळे असते. जसा मनुष्य चेहऱ्यावरून ओळखता येतो तसेच त्याच्या बोलण्यावरून व चालण्यावरूनही ओळखता येतो. निसर्गाची विविधताच इतक्या विविध अंगाने, रंगाने व ढंगाने नटलेली आहे की या विविधतेचे कोणत्याही एका सूत्रात वर्गीकरण करणे अवघडच नव्हे तर अशक्यप्राय आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्ती हा अनन्यसाधारण असतो, असे मान्य करावेच लागते.

मनुष्याच्या काळजातील अंतरंग सुद्धा परस्परभिन्न असतात. विचार आणि विचार प्रकटीकरणाची ढबही आगळीवेगळी असते. लेखनशैली बघून त्या लेखाचा लेखक कोण असेल हे अभ्यासू वाचक सहज ओळखू शकतो. एखादी कविता वाचल्यावर ती कविता कोणत्या कवीची असेल हे जाणकार रसिक ओळखू शकतो. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा चेहरा किंवा चेहऱ्यावरील भाव बदलून जशी चेहऱ्याची ओळख लपवता येत नाही तसेच अंतरंग सुद्धा लपवता येत नाहीत. जोपर्यंत मनुष्य अबोल असतो तोपर्यंत ठीक पण एकदा बोलायला लागला की त्याच्या मनात काय दडले आहे ते उघड व्हायला लागते. विचार व्यक्तिसापेक्ष असल्याने अभिव्यक्ती सुद्धा व्यक्तिसापेक्षच असते. सुरुवातीला परस्परभिन्न विचार आपसात मेळ खात नसेल तर सर्व विचारांनी एकत्र बसून भेळ खाल्ली तर काही मुद्द्यांवर एकमत होऊन वैचारिक मेळ साधला जाऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करून परस्पर विचारांचा आदर केल्यास वैचारिक समन्वय साधने अजिबात अवघड नसते.

कोणत्याच व्यक्तीचे अंगभूत विचार कधीच बदलत नसतात पण संस्कार, प्रबोधन अथवा तत्सम मार्गाने विचारांची दिशा बदलता येते. विचाराने स्वभाव घडवता येतो. पण त्याहीपेक्षा सभोवतालच्या परिस्थितीचाच सर्वात जास्त प्रभाव विचारधारेवर पडत असतो. परिस्थितीनुसार न वागल्यास जीवन जगणेच कठीण होत असल्याने परिस्थितीशी सर्वांना जुळवून घ्यावेच लागते आणि जगण्याच्या जीवनशैलीनुसार विचार कळत-नकळत आपोआप बदलत जातात. कधीकधी आधीच व्यक्तिसापेक्ष असलेला विचार परिस्थिनुसार आणखीनच कडवे स्वरूप धारण करतो. त्यातूनच जहाल विचारांना खतपाणी मिळून विचार एकांगी होत जातात. ''मी म्हणतो तेच सत्य" इथपर्यंत ठीक असते, त्याला विचारांचा ठामपणा किंवा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असे गोंडस नाव देऊन दुर्लक्ष करता येईल पण ''मी म्हणतो तेच सत्य बाकी म्हणतात ते सर्व चुकीचे" या अतिरेकी पातळीवर जेव्हा विचार पोचतात तेव्हा त्या विचाराची जागा विचाराऐवजी हेकेखोरपणाने घेतलेली असते. एकदा का हेकेखोरपणा विचारात आला तर ती व्यक्ती स्वतःही शांतचित्ताने झोपू शकत नाही आणि इतरांनाही शांतचित्ताने झोपू देत नाही. अशा व्यक्तींची डोकेदुखी झेंडूबामने थांबत नाही आणि झोपेसाठी झोपेच्या गोळ्याही उपयोगी पडत नाही. विचार प्रवाही असल्याने परिवर्तनशील असतात. त्यामुळे चर्चा करून विचारांचे आदान-प्रदान केल्यास विचार अधिकाधिक प्रवाही व प्रगल्भ होण्यास मदत होते. चर्चेने आपण बाळगत असलेले विचार पारखता येतात, संवादाच्या पातळीवर तपासता येतात.

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्या-घेतल्याने मती शुद्ध होते

विचार हेच समाज प्रबोधनाचे साधन आणि वैचारिक उत्क्रांतीची रेशीमवाट असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असल्याने कोणताही विचार सरसकटपणे सर्वांना मान्य होऊ शकत नाही. एखादा विचार एकाला योग्य वाटेल तर तोच विचार दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतो. अमान्य असलेल्या विचारांना विचारानेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. विचाराची लढाई विचारानेच व प्रबोधनाची लढाई प्रबोधनानेच लढली पाहिजे. विचार स्वच्छ व स्पष्ट असतील तर चिडचिड न होता डोके शांत आणि शाबूत राहण्याची शक्यता आपोआपच बळावत जाते.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ५ - दि. २२ फेब्रुवारी, २०२० - " ...तर विचार प्रवाही होतात"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं