Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Apr 29, 2015

श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२

श्री तिर्थक्षेत्र रावेरी

सीतामंदीर तिर्थक्षेत्राचे महात्म्य


        श्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे.
       त्रेतायुगात रामायण कालीन इतिहासाप्रमाणे अयोध्येचे राजा दशरथ, त्यांचा पुत्र प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह १४ वर्षाच्या वनवासात असताना रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेत अशोकवनात ठेवलेले होते. प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव करून सीतेला अयोध्येत परत आणल्यानंतर पावित्र्याबद्दल शंका निर्माण झाली. सीतेने अग्निपरिक्षा देऊन पावित्र्य सिद्ध केले परंतु समाजातील कोणत्यातरी व्यक्तीचे समाधान झाले नाही. प्रभू रामचंद्राने समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी सीतेला गरोदर अवस्थेत लक्ष्मणाच्या रथात बसवून दंडकारण्यात सोडून दिले.

**************
  Raveri


          श्रीक्षेत्र रावेरी गावातील पूर्वजापासून वयोवृद्ध मंडळी याबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, जेव्हा रामाने सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडून दिले तेव्हा सीतेने याच रावेरी गावात वाल्मिकॠषिचे आश्रयाने वास्तव्य केले. रावेरी हे गाव आणि आसपासचा परिसर हा दंडकारण्याचा भाग असून याच गावात लव आणि कूश यांचा जन्म झाला. लव-कुशाचा जन्म झाल्यानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितला. गहू देण्यास लोकांनी नकार दिल्यावर तिने गावकर्‍यांना शाप दिला की या गावात गहू पिकणार नाही. शापाप्रमाणे या गावात गहू पीकत नव्हता. परंतू अलिकडे सन १९०० चे दरम्यान गावातील लोकांनी सीतेला साकडे घालून पिकलेला गहू सीतामंदीरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही. असा संकल्प करून तो संकल्प वार्षिक पाळल्यामुळे गावात गहू पिकण्यास सुरुवात झाली.

         आणखी अशीही एक कहाणी आहे की, रामाचा अश्वमेघ नावाचा घोडा लव-कुशांनी अडविला आणि त्या घोड्याबरोबरोबर आलेल्या शत्रुघ्न, लक्ष्मण यांचा पराभव करून घोड्याबरोबर आलेल्या हनुमंताला वेलीने बांधून ठेवले. रावेरी गावात वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती आहे. ज्या ठिकाणी लव-कुशांनी अश्वमेघ घोडा पकडला ते ठिकाण तमसा नदीचे (रामगंगा) तीरावर आजही पाहण्यास मिळते. गावाच्या दक्षिण भागाकडून तमसा (रामगंगा) नदीचे वळण असून उत्तर वाहनी असलेल्या नदीचे तिरावर जगातील एकमेव वनवासी सीतेचे हेमाडपंथी मंदीर आहे. तसेच बाजुला वाल्मिक ऋषिचा आश्रम सुद्धा आहे. शिवाजी महाराजांचे कालखंडातील पाच मोठे बुरूज (गढी) व त्याला भिंतीचा असलेला परकोट आजही पाहण्यास मिळतो.

         अशा पौराणिक इतिहास असलेल्या गावात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशींनी २ मे १९८२ ला भेट देऊन संपूर्ण इतिहास जाणून घेतला.

        जगातील एकमेव सीतेचे मंदीर जिर्ण असून मंदीराचा जिर्णोद्धार करण्याची गरज असल्याचे सांगीतले, परंतू एका शेतकरी राजाची भूमीकन्या सार्वभौम राजाची राणी वनवासी सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल. वाल्मिकी ऋषीचे आश्रयाने वनवासी सीतेने धैर्याने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करून समाजाला दाखवून दिले. त्याचप्रमाणे समाजातील ६०% महिला आपला घाम गाळून शेतीचे कष्ट करते. परंपंरेने चालत आलेला अन्याय होतच आहे. त्यासाठी महिलांना आधाराची गरज आहे. ज्याप्रमाणे वनवासी सीतेला श्री क्षेत्र रावेरी हे आधारस्थान मिळाले त्याचप्रमाणे समाजातील परित्यक्त्या महिलांसाठी सुद्धा रावेरी हे माहेर झाले पाहिजे, अशी मा. शरद जोशींनी गावकर्‍यांसमोर इच्छा प्रगट केली. १९९४ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचा लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाचे रावेरी येथे आयोजन करून शेतकरी महिला आघाडी समोर विषय ठेवला. हे काम शेतकरी महिला आघाडीने करावे अशी मा. शरद जोशी यांनी सुचना करून आम्ही शेतकरी संघटनेचे पाईक बंधू तुमच्या सोबत असल्याचे सांगीतले.

         सन नोव्हेंबर २००१ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन रावेरीला घेऊन अधिवेशनात जगातील एकमेव सीता मंदीराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व मा. शरद जोशी यांनी स्वत:च्या मिळकतीतून दहा लाख खर्चून मंदीराचा जिर्णोद्धार करून २ ऑक्टोंबर २०११ ला लोकार्पण सोहळा घेऊन गावाच्या सुपूर्द करण्यात आले.

          परित्यक्त्या महिलांचे श्रीक्षेत्र रावेरी हे माहेरघर व्हावे, ही संकल्पना मा. शरद जोशींनी पुढे नेण्यासाठी गावकर्‍यांना आवाहन केले. श्रीक्षेत्र रावेरी येथे श्री हनुमान मंदीर संस्थान रावेरी, र.नं. ए ६३६ या नावाने विश्वस्त ट्रस्ट आहे. मा. शरद जोशींची संकल्पना पुढे नेण्यासाठी विश्वस्त मंडळाने गावातील २५ तरुण युवकांची सन २०१० ला सौंदर्यीकरण विकास समिती निर्माण करून समितीमार्फ़त रावेरी हे गाव तिर्थक्षेत्र, परित्यक्त्या महिलांचे माहेर कसे करता येईल त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू केले आहे. तरी या कार्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
************** 

Raveri

वाल्मिकी ऋषीचा आश्रम व समोरील परिसर
************** 

Raveri

**************

Raveri

**************
  Raveri

**************
  Raveri

************** 

Raveri

************** 

Raveri

गाभार्‍यातील मुर्ती
************** 

  Raveri 

सीतेची न्हाणी
 ************** 

Raveri

मंदीराचा दक्षिणभाग
************** 

Raveri

************** 

Raveri

वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती
************** 

Raveri

************** 

Raveri

दिनांक २७/०४/२०१५ रोजी सीतानवमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर श्री विजय निवल, सौ. स्वाती मते, श्रीमती सुलोचना राहणे, सौ. सरोज काशीकर, सौ. शैलजा देशपांडे, गंगाधर मुटे व ट्रस्टचे पदाधिकारी.
************** 
Raveri

या प्रसंगी स्वत:ची किडणी देऊन पतीचे प्राण वाचविणार्‍या सौ. स्वातीताई मते यांचा व मुलांचे योग्य पालनपोषण करून त्यांना उच्चपदस्थ नोकरीपर्यंत पोचविणार्‍या सुलोचनाबाई राहणे यांचा शाल व श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार सौ. सरोज काशीकर यांनी त्यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले.
**************

Raveri

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप.
************** 

Apr 26, 2015

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका

खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥

शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥

घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या ...॥

इलंक्शनच्या टायमाले, थैल्या ढिल्या करतो
नाक लाजिम करण्यासाठी, चिमटीमध्ये धरतो
तवा कुठं भूमीग्रहण, कायदा येत असते
पैशाबिगर कोणालेच, 'अभय' मिळत नसते
उचला आता धोपटी-बिर्‍हाड, अन चालते व्हा ...॥

                                 - गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------

Apr 21, 2015

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्‍या
बदलेल भाग्य निव्वळ, घाम गाळल्याने?

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने

शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!

डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने

                                - गंगाधर मुटे 'अभय'
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

Apr 19, 2015

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती

औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती


       अपवाद हा अपवादात्मकच असतो म्हणून त्याचे व्यावहारिक महत्वही अपवादत्मकच असले पाहिजे. अपवादानाने घडणार्‍या अपवादात्मक घटनांचा सर्वसाधारण घटनांशी संबंधसुद्धा अपवादानेच जोडला पाहिजे, अपवादात्मक घटनांचा साध्य आणि सिद्धतेशी सांगड घालण्याचा प्रयत्नही अपवादात्मकच असला पाहिजे, असा धडा मला माझ्या औंदाच्या शेतीने दिला आहे.

       होतं काय की बर्‍याचदा अपवादानेच एखाद्याला ढोबळी मिरचीचे प्रचंड उत्पादन येते. पण या अपवादाला एखादा "उंटावरचा शेतकरी" स्वत:ची यशस्विता समजून घेतो आणि रस्त्याने जो मिळेल त्याला "यशोगाथा" सांगत सुटतो. एखाद्याला एखादे वर्षी मक्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळतो, तोही अपवादानेच. पण तरी सुद्धा तो शेतकरी जर "उंटावरचा" असेल तर स्वत:च्याच तोंडाने स्वत:चेच पोवाडे गात सुटतो. यावर कुणी असेही म्हणेल की "आम्हाला अपवादाने नव्हे तर बुद्धीचातुर्याने यश मिळाले आहे". त्यावर सरळसोपे उत्तर असे की त्याने निदान सलग चार वर्षाचा त्याच्या शेतीचा बिल-पावत्यासह ताळेबंद सादर करून दाखवावा. जर चारही वर्ष समान गुणोत्तर आढळले तर मी माझी सारी लेखनगाथा आपल्या विचारधारेसह समुद्रात नेऊन विसर्जित करायला तयार आहे.

       पण आव्हान कोणी स्विकारायला तयार नसते कारण वास्तव तसे नसतेच. एखाद्या वर्षी चांगले उत्पादन येते हे खरे; परंतू अनेक वर्ष शेतीतला तोटा भरून काढताना शेतकर्‍याला त्याच्या बायकोच्या अंगावरील मंगळसूत्र विकावे लागते, हे शेतीमधले शाश्वत सत्य झाले आहे, हे कोण नाकारू शकेल? अनेक "कृषिनिष्ठ" शेतकर्‍यांना बॅंकेतून कर्ज काढल्याशिवाय स्वत:च्या बायकोला वस्त्र आणि अंतर्वस्त्र घेताच येत नाही, हे मी पुराव्यासहीत केव्हाही सिद्ध करून दाखवायला तयार आहे. तद्वतच या "यशोगाथा"वाल्यांचा मागील फ़क्त दहा वर्षाचा इतिहास तपासावा, त्याचे पोट शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायावर अवलंबून नसेल, त्याला चोर्‍या करण्याची सवय नसेल, व्याज-बट्ट्याची गावठी सावकारी नसेल आणि फ़क्त शेती हेच जर त्याच्या उपजिविकेचे साधन राहिले असेल तर त्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी आढळून येणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.

       मी १९८५ साली शेती सुरू केली. तेव्हापासून नाना तर्‍हेचे प्रयोग करून झाले. उभा महाराष्ट्र पालथा घालून झाला. देशाच्या कानाकोपर्‍यातली शेती आणि शेतीची पद्धत न्याहाळून झाली. मिशीला पीळ देत मोठमोठ्या बढाया मारणार्‍या पाटलाचे माजघर पाहून झाले आणि अशा पाटलाच्या माजघरात शिरल्यावर त्याच्या गळलेल्या मिशाही पाहून झाले. विदर्भातील शेतकर्‍यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला द्राक्ष, उस उत्पादक शेतकरी दहापट जास्त कर्जबाजारी आहे, हेही पाहून झाले. 

        हे सांगायचे औचित्य असे की, यावर्षी सार्वत्रिक नापिकी आहे. यंदा शेतीव्यवसायात सर्वत्र हाहाकार माजला असताना व दुष्काळाने शेतीउत्पादनात प्रचंड घट आली असताना माझी औंदाची शेती मात्र याला अपवाद ठरली आहे. या मला विक्रमी उत्पादन झाले व माझ्या स्वत:च्याच शेतीतील उत्पादनाचे ३० वर्षाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. पण मागील वर्षी कमी उत्पादन होऊनही घरात जेवढा पैसा आला तेवढाही पैसा यावर्षी घरात आलेला नाही कारण तूर वगळता अन्य पिकाचे बाजारभाव मागील वर्षी पेक्षा यावर्षी कमी आहेत.

       अधिक उत्पादन घेतल्याने अधिक फ़ायदा होतो, असे फ़क्त कागदीतज्ज्ञच म्हणू शकतात. प्रत्यक्ष शेती करून शेती उत्पन्नावरच जगून पाहिल्याशिवाय किंवा दुसर्‍याच्या शेतीच्या जमाखर्चाचा गणीतीय ताळेबंद मांडल्याशिवाय कुणालाच (अगदी ब्रह्मदेवालासुद्धा) शेतीचे अर्थशास्त्र कळू शकत नाही, हे माझे मत पुन्हा एकदा अधिक ठाम झाले आहे. 

       तसा हा विषय व गणीत साधे, सोपे आणि सरळ आहे. पण शेतीविषयात हात घालू इच्छिणारांमध्ये एक अनुवंशीय खोट आलेली असते. ती खोट अशी की शेतकर्‍याला गाढव गृहीत धरणे व जेवढी अक्कल मला आहे तेवढी अक्कल शेतकर्‍याला नसते, अशी स्वत:ची ठाम समजूत करून घेणे. त्यामुळेच शेतीव्यवसायाच्या उत्थानासाठी "शेतीमालाच्या भावाला" बगल देऊन अन्य गृहितके "उंटावरच्या शहाण्यांकडून" मांडली जातात.
मला यावर्षी रेकॉर्डब्रेक उत्पादन झाले यामागे माझे नियोजन, परिश्रम, आर्थिक गुंतवणूक वगैरे बाबींचा अंतर्भाव नक्कीच आहे, याबाबत दुमत नाही; पण एवढे मी यापूर्वीही केलेले आहे, करत आलेलो आहेच. मग एवढे उत्पादन या पूर्वी का झाले नाही? याचे उत्तरही तसे फ़ार सोपे आहे. शेतीचा संबंध थेट निसर्गाशी आहे आणि निसर्ग विविधतेने नटलेला आहे. एकवर्ष दुसर्‍या वर्षासारखे कधीच नसते, पाऊसमान प्रत्येकवर्षी समान असू शकत नाही. दर चार वर्षातून एकदातरी ओला अथवा कोरडा दुष्काळ नक्कीच पडणार, चारवर्षातून एकदा तरी गारपीठाचा वर्षावही हमखास होणार. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी खर्च सारखाच केला तरी दरवर्षी उत्पादनाचा आकडा सारखाच राहील हे कदापीही शक्य नाही. त्यामुळे शेतीमध्ये चार वर्षाच्या उत्पादनाची गोळाबेरीज करून त्याला चारने भागूनच वार्षिक उत्पादनाची सरासरी काढली गेली पाहिजे आणि हेच यावरचे एकमेव उत्तर आहे.

                शेतीत सधनता आणणे अजिबात कठीण नाही पण शेतीत सुबत्ता यावी, हीच अनेकांची आंतरिक इच्छा नसते. त्यामुळे "शेतीमालाचा भाव" हा प्रमुख मुद्दा सोडून अन्य पर्याय सुचविण्याचे व तेच अधिक ताकदीने मांडण्याचे कार्य अनेकांकडून अव्याहतपणे मांडले जाते. त्यामागे मूळ मुद्द्यावरील लक्ष दुसरीकडे वळवणे, हा छुपा डाव असतो. शेतकरी पुत्रांनी हा डाव ओळखला पाहिजे. शेतकरीविरोधी धोरणांच्या पुरस्कर्त्यांच्या सापळ्यात अलगद फ़सण्यापासून स्वत:ला वाचविले पाहिजे.

- गंगाधर मुटे

---------------------------------------------------------------------------------------
 sheti

यंदाची सुरुवातच खतरनाक झाली. मातीत बियाणं पडलं आणि वरुणराजा दिर्घ रजेवर गेला.
********************************* sheti

तुषार सिंचन - दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार
********************************* sheti

पाऊस येईल तेव्हा येईल.. त्यासाठी पेरणी थांबवणे शक्य नसते.
********************************* sheti

पेरते व्हा! पेरते व्हा!!
********************************* sheti

पावसाची शाश्वती नसतानाही आपले सर्वस्व मातीच्या स्वाधीन करण्याची कणखरता फ़क्त शेतकर्‍याकडेच असते.

********************************* sheti

भुईला दिली ओल नाही ढगाने
कसे अंकुरावे अता हे बियाणे?
********************************* sheti

मात्र तणाला फ़ारच जोर
********************************* sheti ********************************* sheti ********************************* sheti

वादळवार्‍यामुळे गव्हाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट आली.
********************************* sheti

नवे तंत्रज्ञान वापरायचे?
(शेतमजुरांचे काय होईल, असा प्रश्न कुणालाच पडत नाही)
*********************************

वैश्विक खाज नाही

वैश्विक खाज नाही


शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

                             - गंगाधर मुटे ’अभय’
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

Apr 7, 2015

नाटक वाटू नये


नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

पिकल्या फळांनी लदबदलेले, रान जरी मोकळे
हवे तेवढे भरपूर खावे, फुटवे छाटू नये

सगे-सोबती गाळून घे तू, 'अभय' घप्प मनाने
बिनकाम्यांची अवतीभावती, गर्दी दाटू नये

                             - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^==

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं