Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Aug 16, 2014

पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

               कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, "पिकलं तवा लुटलं, म्हणून देणंघेणं फ़िटलं" हे तत्व स्विकारून शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि राज्यात विलंबाने व अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाची भिषणता लक्षात घेता शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती या प्रमूख तीन मागण्या ऐरणीवर आणून केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या आसूडाचा हिसका दाखविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिनांक ४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.

सुमारे ३००० शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा हायवेवर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पूर्णत: ठप्प झाली होती.

               तत्पुर्वी पिंपळगाव बसवंत येथील शगून मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतीसमोरिल समस्यांवर सविस्तर उहापोह करण्यात आला. सभेत देविदास पवार, अर्जूनतात्या बोराडे, निर्मलाताई जगझाप, तुकाराम बोबडे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, रवी देवांग, सरोज काशीकर, रामचंद्रबापू पाटील, गुणवंत पाटील हंगरगेकर, अड वामनराव चटप आणि शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

               शेतीत चांगले उत्पादन झाले तर सरकार हमी भावाने खरेदी करण्यास पुढे येत नाही व शेतकर्‍यांना संरक्षण देत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल मिळेल त्या किमतीत मातीमोल भावाने विकावा लागतो. मात्र कमी उत्पादन झाले आणि बाजारपेठेत तेजी यायला लागली की सरकार निर्यातबंदी करून किंवा निर्यातशुल्क वाढवून स्थानिक बाजारपेठेतील भाव पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. त्यामुळे दोन्ही स्थितीमध्ये शेतकरीच नाडवला जातो व उत्पादनखर्च भरून न निघाल्याने त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर आणखी वाढत जातो. शेतीवरील कर्ज हे शासकीय धोरणाचा परिपाक असून शेतीवरील कर्ज शासननिर्मित संकट आहे.

               दुर्धर रोगांवर नियमित घ्यावयाच्या औषधी महागड्या असतात व सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीच्या आवाक्याबाहेर असतात. गोरगरिबांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाही तर माणसे दगावतात आणि तरीही औषधांचा समावेश जीवनावश्यक कायद्यात केला जात नाही; याउलट कांदा आणि बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा न खाल्याने कोणीच मरत नाही किंवा जीव कासाविसही होत नाही तरी सुद्धा कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात टाकल्या गेलेले आहे. कांदा स्वस्त झाला पाहिजे म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करते. यंदा कांद्यावरील निर्यातशुल्क केंद्रसरकारने प्रति टन शुन्य डॉलवरून ३०० डॉलर आणि ३०० डॉलरवरून ५०० डॉलर प्रति टन वाढवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी संपली असून निर्यातीत ९० टक्के एवढी घट आली आहे, परिणामत: देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भावही गडगडले आहेत.

सभेतील काही मुख्य निर्णय :

१) सभा संपताच तातडीने मुंबई-आग्रा हायवेवर रस्ता रोको आंदोलन

२) १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय.

३) रेलरोको आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी करणार

४) १० नोव्हेंबर २०१४ रोजी किंवा त्या तारखेच्या आसपास नाशिक येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन

५) चलो दिल्ली कार्यक्रम अधिवेशनात जाहीर होणार

मुख्य क्षणचित्रे :

१) शेतकर्‍यांचा प्रचंड उत्साह पाहून उर्जा मिळालेल्या शरद जोशी यांनी बर्‍याच कालावधीनंतर माईकसमोर उभे राहून तब्बल १३ मिनिटे भाषण केले.

२) शेतकरी समाजात चैतन्य संचरणे हेच मा. शरद जोशींच्या प्रकृतीसाठी रामबाण आणि एकमेव औषध आहे, हेच या घटनेतून अधोरेखीत झाले.

३) शगून मंगल कार्यालयात प्रचंड शेतकर्‍यांनी उपस्थिती लावल्याने हॉल खचाखच भरला होता. जागेअभावी शेकडो शेतकर्‍यांना बाहेर उभे राहूनच भाषण ऐकावे लागले.

४) पावसाची सर आली तरी शेतकरी जागेवरच शांतपणे उभे होते.

५) रस्ता रोको आंदोलनाची घोषणा न करताच मा. शरद जोशींनी भाषण संपवले तेव्हा उपस्थितांमध्ये बराच हलकल्लोळ झाला. आत्ताच तातडीचा रास्ता रोको जाहीर करून आम्हाला रस्ता रोखून धरण्याची परवानगी द्या, अशा घोषणांनी शेतकर्‍यांनी सभागृह दणाणून सोडले.

६) उपस्थितांच्या भावनांचा आदर राखून मा. शरद जोशींनी तातडीचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन जाहीर केले.

                                                                                                         गंगाधर मुटे
                                                                                         महासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Pimpalgaon Basawant
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *
Rasta Roko
* * * * * * * *

लासलगाव रेल्वे रोको आंदोलन

लासलगाव रेल्वे रोको आंदोलन

             कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.

             लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.

             पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;

आसुड उगारणारा माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने

असे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.

             मा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.

             तत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.

             लासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

             आंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

             कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.

             या रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.

                                                                                                        गंगाधर मुटे
                                                                                         महासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश
------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्रवृत्तांत :

lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन - प्रचंड पोलिस बंदोबस्त
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन - शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
शिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
आंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
आंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
उपस्थित विराट आंदोलकसमुदाय
------------------------------------------------------------------------------------------------------------
lasalgaon rail roko
कानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक
------------------------------------------------------------------------------------------------------------

Aug 13, 2014

संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे

संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे
                                                                                      - शरद जोशी

             आज पिंपळगावला या बैठकीसमोर बोलताना माझ्या मनात दोन विचार येतात. पहिला विचार हा की ज्यांच्याबरोबर सगळं आंदोलन उभं राहिलं ते माधवराव मोरे जर का आज इथे हजर असते तर मोठी मजा आली असती. त्यांची प्रकृती बरी नाही, ते अगदी आजाराने झोपून असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. शेतकरी संघटनेचे आंदोलन चाकण येथे १९७८ साली सुरू झालं आणि तेव्हाच्या आंदोलनाची तत्त्व फार सोपी होती. सगळ्या शेतकर्‍यांना घामाचे दाम मिळायला पाहिजे हे तत्त्व नंबर एक आणि घामाचे दाम कसे मिळाले पाहिजे त्या साठी सोपी उपाय सांगितले ते तत्व नंबर म्हणजे दोन. पाहिली गोष्ट म्हणजे सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, हात घालता कामा नये. कांद्याला काय भाव मिळायचा तो मिळेल; कमी मिळाला तरी चालेल, जास्त मिळाला तर आनंदच आहे परंतु सरकारने भाव पाडण्यासाठी काही करू नये, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा की, शेतीमध्ये उत्पादन किती निघतं, उत्पादन किती निघतं हे जमिनीबरोबरच शेतीला तुम्ही कोणतं खत, औषध वापरता, तंत्रज्ञान कोणतं वापरता यावर सगळं उत्पादन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सरकारनं बाजारपेठेमध्ये हात घालू नये, तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये हात घालू नये आणि सरकारने एवढे जरी केले तरी शेतीमालाला आपोआपच घामाचे दाम भरून मिळेल. हे तीन तत्त्व घेऊन त्यावेळी आपण शेतकरी संघटना स्थापन केली.

               सटाण्याला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये संघटनेची राजकीय भूमिका सांगताना मी असं म्हटलं की आपल्या उरावरती एक चोर बसलेला आहे. त्याला जर उठवायचं असेल तर त्याच्यावर एक उपाय असा आहे की दुसऱ्या चोराची मदत घ्यायची आणि पहिल्याला हाकलून द्यायचं. पहिल्या चोराला उठवलं म्हणजे आपण कोलांडी उडी मारून त्या दुसर्‍या चोरालाही हाकलून लावू शकतो. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याच्यामध्ये लोकांची कल्पना अशी आहे की या मोदी सरकारला लोकांनी फार मोठ्या संख्येनी निवडून दिलं, त्याला ३००-४०० जागा मिळाल्या, त्याकाही आपोआप मिळालेल्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो की, शेतकरी संघटनेच्या सटाणा अधिवेशनामध्ये जो निर्णय झाला होता. त्या निर्णयाप्रमाणे म्हणजे एका चोराला उठवून देण्यासाठी दुसऱ्या चोराची मदत आपण केली त्यामुळे आता दुसर्‍या चोराला विजय मिळाला हे सर्वांनी कबूल केलेले आहे. पण त्याचा अर्थ असा की एका चोराला आपण बाजूला काढलं. पहिल्यांदा गोरा इंग्रज आला त्या गोर्‍या इंग्रजाला काढून त्याजागी काळा इंग्रज आला. काळ्या इंग्रजाला काढून आता तिसरा इंग्रज आला आहे, त्यालाही बाजूला काढून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करायची आहे, ते मला सांगायचे आहे.

               परंतु; हा विषय फार कठीण आहे. उदाहरणार्थ कांद्याला नव्या केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये घातलं. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा खायला मिळाला नाही तर लोकांचा जीव कदाचित कासाविस होईल हे खरं; पण कांदा न खाल्ल्यामुळे कुणाचा जीव गेला असं कधी घडलेलं नाही. याउलट माझ्याजवळ शंभरपेक्षा जास्त औषधांची यादी आहे ती औषधं जीवनावश्यक वस्तुच्या यादीमध्ये घातली असती तर उपयोगाचे झाले असते. मी पूर्वी सांगायचो की, चाकणच्या बाजारामध्ये एखादी बाई आणि तिचा मुलगा डॉक्टर कडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की पोराला ताप चढलाय, डॉक्टर मुलाला तपासतो व म्हणतो की तुम्ही पोराला आधी का नाही आणलंत? आता त्याला फार ताप चढला आहे. मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो, ती बाई चिठ्ठी घेऊन दुकानामध्ये जाते आणि औषधाची किंमत फार तर सध्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ६७ रुपये असं सांगितलं तर ती बाई म्हणते की मला ते परवडणार नाही आणि मग ती पोराला घेऊन पायऱ्या उतरून खाली जाते आणि मग ते तापाने तडफणार पोर तसंच पडलेलं असते.

               ज्या सरकारला जीवनावश्यक वस्तूमध्ये औषधं घालायचं सुचत नाही ते सरकार कांद्याला मात्र जीवनावश्यक वस्तूच्या यादीत धरते. याचा अर्थ काय? पहिलं अर्थ असा की तुम्हाला किती उत्पादन करायचं याचा अधिकार तुम्हाला नाही, सरकार ते ठरवणार. सरकारने तुम्हाला सांगितलं की कांदा इतका नाही इतका पिकवायला पाहिजे तर तो तुम्हाला पिकवावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की वाहतूक करता येणार नाही, साठवणूक करता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करता येणार नाही, एवढेच नाही तर कांद्याची निर्यात सुद्धा करता येणार नाही. कांद्यावर इतकी बंधने घातली याचा अर्थ सरकारने बाजारपेठेमध्ये हात घातला. एवढेच नव्हे तर मला असे सांगायचे आहे की डब्ल्यूटीओला विरोध करून या मोदी सरकारने केवळ देशातल्या बाजारपेठेमध्येच नव्हे तर परदेशातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा ढवळाढवळ केली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण सरकार हस्तक्षेप करत आहे आणि त्याच मूळ स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघपरिवाराच्या संघटना यांच्यामध्ये दडलेलं आहे.

               अशी कित्येक औषधे आहेत की जिच्यामध्ये जीन तंत्रज्ञान वापरलं जातं. उदा. साखरेचा त्रास कमी करण्या करिता ईन्सुलिन ज्या तंत्रज्ञानाने तयार होते तेच तंत्रज्ञान शेतीच्या बाबतीत मात्र आणायला मात्र सरकारने बंदी आणली आहे. नवीनं पंतप्रधानाला आपण निवडून दिलं, त्यांच्याकडून आपल्या काही पुष्कळशा अपेक्षा होत्या आणि आहेतही पण काही दृष्ट मंडळी त्यांच्याभोवती बसलेली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ या लोकांनी नरेंद्र मोदीला वेढून टाकलेलं आहे आणि नरेंद्र मोदीची यातून सुटका करणे हे आपलं शेतकर्‍यांचं कर्तव्य आहे आणि आपण त्यांची सुटका करणार आहोत हे नक्की.

               आतापर्यंत अनेक वेळा मी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही तो पाळलेला आहे, हे मला मान्य आहे. आता मी थोडक्यात मांडतो आहे ते येवढ्याकरिता की आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी एवढी तेजस्वी भाषणे केली आहेत की त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगावं असा मला वाटत नाही. परंतु जर का काही करायचं असेल आणि त्यांच्यामध्ये नाशिक जिल्ह्याची भीती दिल्लीला फ़ार आहे. कालच्या सभेत मी खुर्चीवर बसून बोललो. पुंजाजी गोवर्धने ज्यांनी भाताचे आंदोलन पहिल्यांदा सुरू केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते प्रकाशन करताना मी खुर्चीवर बसलेलो होतो. उभे राहून बोलण्याची माझी ताकत नव्हती. पण आज तुमच्या सगळ्या लोकांचा उत्साह पाहिला आणि असं वाटलं की खुर्चीवर बसून बोलणं काही योग्य नाही. तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर तुमच्या उत्साहाला प्रतिसाद देण्याकरिता निदान आजच्या दिवस तरी मी उभं राहून बोललं पाहिजे. मला अगदी पाहिल्यासारखं शांत स्वरात बोलता येत नसलं तरी मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल याची मला खात्री आहे.

               आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट अशी की हा प्रश्न मुंबईला सुटणारा नाही. हा प्रश्न आपल्याला दिल्लीला मांडायचा आहे आणि त्याच्याकरिता आपल्याला नाशिक मधील जास्तीत जास्त मंडळीला दिल्लीला येण्याचे मी आवाहन करतो. त्यासोबतच येत्या १० नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पिंपळगावला किंवा जवळपास जिथे कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे तिथे शेतकरी संघटनेचं अधिवेशन घेतलं जावं. संघटनेचं अधिवेशन आपण केव्हा घेतो? जेव्हा फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि निर्णय घेणं कार्यकारिणीला शक्य नसतं त्यावेळी आपण अधिवेशन घेतो. हा प्रश्न खरंच मोठा आहे. आता आपण एका चोराला छातीवरून उठवून लावलं आणि त्याच्याऐवजी आता दुसरा चोर त्याच पद्धतीने छातीवर बसतो आहे आणि त्याच पद्धतीने शेतकर्‍याचं शोषण चालू ठेवत आहे. हा प्रश्न खरंच खूप आगळावेगळा आहे, नवीनं आहे आणि तो सोडविण्याकरिता आपल्याला स्वतंत्र वेगळं अधिवेशन घ्यायला पाहिजे. त्या अधिवेशनामध्ये जो पाहिजे तो निर्णय होऊ शकतो. ते अधिवेशन पिंपळगाव, लासलगाव किंवा नाशिकच्या आसपास झालं पाहिजे. स्थानिक मंडळींना जी जागा योग्य वाटेल ती निवडावी आणि अधिवेशन १० नोव्हेंबरच्या जवळपास म्हणजे दिवाळीच्या आधी घ्यावं. १० नोव्हेंबर ही तारीख आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, त्यादिवशी अधिवेशन व्हावं आणि मग दिल्लीला जाण्यांसंबंधीचा निर्णय व्हावा. दिल्लीला जाऊन आपल्याला नरेंद्र मोदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघटनांच्या तावडीतून सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा. १० नोव्हेंबर नाशिकच्या अधिवेशनामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ती संख्या इतकी मोठी असली पाहिजे की ती संख्या पाहूनच दिल्लीला घाम सुटला पाहिजे.

                                                                                                                - शरद जोशी

(पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीला संबोधित करतांना मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणाचा सारांश. शब्दांकन – अक्षय मुटे)

----------------------------------------------------------------------------------------

Aug 11, 2014

पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

कुणी अभय, कुणी भयभीत
पैसोबाची वेगळी रीत
कुणा देतो मलमली छत
अन्
कुणाला रस्त्यावर आणतो ...॥

                           - गंगाधर मुटे ’अभय’
--------------------------------------------------------

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं