Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Feb 22, 2020

...तर विचार प्रवाही होतात - भाग ५

"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ५
...तर विचार प्रवाही होतात

सर्व प्राणिमात्रांचा विचार करता केवळ मनुष्यामध्येच विचार करण्याचा अंगीभूत गूण आहे. विचार करणे हे जर मनुष्यप्राण्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असेल तर प्रत्येक मनुष्य आपापल्या कुवतीनुसार विचार करतच असतो, ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. माणसाचा चेहरा केवळ काही इंच परिघाच्या आकाराचा असूनही कोट्यवधी जनतेमध्ये परस्परभिन्न असू शकतो आणि स्वतःचे वेगळेपण राखून असतो तर अमर्याद आणि सीमांचे बंधन नसलेला विचार कोट्यवधी जनतेचा एकसारखा कसा असू शकेल? त्यातूनच "जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती" असतात तसेच "जितक्या व्यक्ती तितके विचार" हे समीकरण आपोआपच तयार होते.

प्रत्येक मनुष्याचा चेहरा, आवाज, चालणे, बोलणे इतरांपेक्षा वेगळे असते. जसा मनुष्य चेहऱ्यावरून ओळखता येतो तसेच त्याच्या बोलण्यावरून व चालण्यावरूनही ओळखता येतो. निसर्गाची विविधताच इतक्या विविध अंगाने, रंगाने व ढंगाने नटलेली आहे की या विविधतेचे कोणत्याही एका सूत्रात वर्गीकरण करणे अवघडच नव्हे तर अशक्यप्राय आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्ती हा अनन्यसाधारण असतो, असे मान्य करावेच लागते.

मनुष्याच्या काळजातील अंतरंग सुद्धा परस्परभिन्न असतात. विचार आणि विचार प्रकटीकरणाची ढबही आगळीवेगळी असते. लेखनशैली बघून त्या लेखाचा लेखक कोण असेल हे अभ्यासू वाचक सहज ओळखू शकतो. एखादी कविता वाचल्यावर ती कविता कोणत्या कवीची असेल हे जाणकार रसिक ओळखू शकतो. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा चेहरा किंवा चेहऱ्यावरील भाव बदलून जशी चेहऱ्याची ओळख लपवता येत नाही तसेच अंतरंग सुद्धा लपवता येत नाहीत. जोपर्यंत मनुष्य अबोल असतो तोपर्यंत ठीक पण एकदा बोलायला लागला की त्याच्या मनात काय दडले आहे ते उघड व्हायला लागते. विचार व्यक्तिसापेक्ष असल्याने अभिव्यक्ती सुद्धा व्यक्तिसापेक्षच असते. सुरुवातीला परस्परभिन्न विचार आपसात मेळ खात नसेल तर सर्व विचारांनी एकत्र बसून भेळ खाल्ली तर काही मुद्द्यांवर एकमत होऊन वैचारिक मेळ साधला जाऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करून परस्पर विचारांचा आदर केल्यास वैचारिक समन्वय साधने अजिबात अवघड नसते.

कोणत्याच व्यक्तीचे अंगभूत विचार कधीच बदलत नसतात पण संस्कार, प्रबोधन अथवा तत्सम मार्गाने विचारांची दिशा बदलता येते. विचाराने स्वभाव घडवता येतो. पण त्याहीपेक्षा सभोवतालच्या परिस्थितीचाच सर्वात जास्त प्रभाव विचारधारेवर पडत असतो. परिस्थितीनुसार न वागल्यास जीवन जगणेच कठीण होत असल्याने परिस्थितीशी सर्वांना जुळवून घ्यावेच लागते आणि जगण्याच्या जीवनशैलीनुसार विचार कळत-नकळत आपोआप बदलत जातात. कधीकधी आधीच व्यक्तिसापेक्ष असलेला विचार परिस्थिनुसार आणखीनच कडवे स्वरूप धारण करतो. त्यातूनच जहाल विचारांना खतपाणी मिळून विचार एकांगी होत जातात. ''मी म्हणतो तेच सत्य" इथपर्यंत ठीक असते, त्याला विचारांचा ठामपणा किंवा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असे गोंडस नाव देऊन दुर्लक्ष करता येईल पण ''मी म्हणतो तेच सत्य बाकी म्हणतात ते सर्व चुकीचे" या अतिरेकी पातळीवर जेव्हा विचार पोचतात तेव्हा त्या विचाराची जागा विचाराऐवजी हेकेखोरपणाने घेतलेली असते. एकदा का हेकेखोरपणा विचारात आला तर ती व्यक्ती स्वतःही शांतचित्ताने झोपू शकत नाही आणि इतरांनाही शांतचित्ताने झोपू देत नाही. अशा व्यक्तींची डोकेदुखी झेंडूबामने थांबत नाही आणि झोपेसाठी झोपेच्या गोळ्याही उपयोगी पडत नाही. विचार प्रवाही असल्याने परिवर्तनशील असतात. त्यामुळे चर्चा करून विचारांचे आदान-प्रदान केल्यास विचार अधिकाधिक प्रवाही व प्रगल्भ होण्यास मदत होते. चर्चेने आपण बाळगत असलेले विचार पारखता येतात, संवादाच्या पातळीवर तपासता येतात.

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्या-घेतल्याने मती शुद्ध होते

विचार हेच समाज प्रबोधनाचे साधन आणि वैचारिक उत्क्रांतीची रेशीमवाट असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असल्याने कोणताही विचार सरसकटपणे सर्वांना मान्य होऊ शकत नाही. एखादा विचार एकाला योग्य वाटेल तर तोच विचार दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतो. अमान्य असलेल्या विचारांना विचारानेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. विचाराची लढाई विचारानेच व प्रबोधनाची लढाई प्रबोधनानेच लढली पाहिजे. विचार स्वच्छ व स्पष्ट असतील तर चिडचिड न होता डोके शांत आणि शाबूत राहण्याची शक्यता आपोआपच बळावत जाते.

- गंगाधर मुटे आर्वीकर
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ५ - दि. २२ फेब्रुवारी, २०२० - " ...तर विचार प्रवाही होतात"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी https://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
  

0 प्रतिसाद:

Post a Comment

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं